सावंतवाडी तालुक्यात आजमितीपर्यंत एक हजार ६५९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
सावंतवाडी – संततधार पडणा-या पावसामुळे आता शेतीकामांना वेग आला असून शेतकरी व्यस्त झाला आहे. सावंतवाडी तालुक्यात आजमितीपर्यंत एक हजार ६५९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर या पावसामुळे जिल्ह्यातील २३पैकी आठ धरणे भरून वाहू लागली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उर्वरित १५ धरणेही पूर्ण क्षमतेने भरून आगामी उन्हाळी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या धरणांची देखभाल दुरुस्ती करणा-या चराठा येथील उपविभागीय कार्यालयातील पुरेशा मनुष्यबळाअभावी या कार्यालयाची हेळसांड होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
पावसाने जोर धरल्याने सावंतवाडी तालुक्यातील आंबोली धरणात १.७८४ द.ल.घ.मी. इतका जलसाठा झाला आहे. हरकुळ-कणकवली (२.६५२ द.ल.घ.मी.), माडखोल-सावंतवाडी (२.२५० द.ल.घ.मी.), निळेली-कुडाळ (१.८४३ द.ल.घ.मी.), सनमटेंब-सांगेली (२.४५० द.ल.घ.मी.), पावशी-कुडाळ (३.२५६ द.ल.घ.मी.), शिरवल-दोडामार्ग (३.७५२ द.ल.घ.मी.), आडेली-वेंगुर्ला (१.३३० द.ल.घ.मी.) आदी आठही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून पाणी ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी तालुक्यातच पावसाचे प्रमाण अधिक असल्याने सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील ही धरणे काठोकाठ भरलेली दिसत आहेत. तर कुडाळ तालुक्यातील चोरगेवाडी या धरणाच्या पाणीसाठय़ाची क्षमता १०१.४५
द.ल.घ.मी. इतकी आहे. धामापूर-मालवण धरणाची २.८६७ द.ल.घ.मी., हातेरी-कुडाळ २.१०९ द.ल.घ.मी., ओसरगाव-कणकवली धरणाची १.३७७ द.ल.घ.मी., पोईप- १.१११ द.ल.घ.मी., शिरगाव-देवगड २.६०८ द.ल.घ.मी., तळेवाडी-डिगस २.५२० द.ल.घ.मी., दाबाचीवाडी-कणकवली २.४४१ द.ल.घ.मी., पुळास १.५३५ द.ल.घ.मी., वाफ ोली-सावंतवाडी २.३९४ द.ल.घ.मी., लोरे-कणकवली २.८३६ द.ल.घ.मी.,कारीवडे-सावंतवाडी १.५२६ द.ल.घ.मी. इतकी क्षमता आहे. अद्याप ही धरणे भरलेली नसून पावसाचा जोर कायम राहिल्यास ही धरणेही भरतील, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, शेती-बागायतींना उन्हाळी हंगामात पाणीपुरवठा करणा-या या २३ धरणांत पुरेसा पाणीसाठा राहावा, यासाठी पाटबंधारे विभाग धरणांची डागडुजी, गाळ उपसणे आदी कामे करत असते. चालू वर्षी उन्हाळी हंगामात निळेली-कुडाळ धरणाचे पिचिंग करण्यासाठी पाटबंधारे विभागाने तीन कोटी ८५ लाख रुपयांचे काम केले. शिरवल-दोडामार्ग येथील धरणाचे पिचिंग करण्यासाठी ५० लाख, माडखोल-सावंतवाडी धरणावरील सांडवा-बांध उभारण्यासाठी तीन कोटी ८५ लाख इतका निधी खर्च झाला. या तिन्ही धरणांसाठी मिळून आठ कोटी २० लाख इतका निधी या विभागाने खर्ची घातला.
मात्र, माडखोल धरणाचा सांडवा-बांध हा निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आल्याने या वर्षी ऐन पावसात हा बांध वाहून गेला होता. त्यामुळे माडखोल धरणाच्या बांधकामाबाबत चौकशी करण्याची मागणी पं. स. सदस्य प्रमोद सावंत यांनी केली आहे. संततधार पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उर्वरित धरणात पाणीसाठा होणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आगामी उन्हाळी हंगामात शेती-बागायतींना पुरेसा पाणीपुरवठा होईल.