राजकारणात किंवा आयुष्यात सर्वच काळ वाईट कधीच नसतो. जेव्हा तुमचे वाईट दिवस होते तेव्हा राणेसाहेब उभे राहिले. आता पक्ष पुन्हा उभा करण्याच्या कामाला लागा.
कणकवली – राजकारणात किंवा आयुष्यात सर्वच काळ वाईट कधीच नसतो. जेव्हा तुमचे वाईट दिवस होते तेव्हा राणेसाहेब उभे राहिले. आता पक्ष पुन्हा उभा करण्याच्या कामाला लागा. मी माझ्या पद्धतीने हा पक्ष बांधणार असून, स्वाभिमान संघटना बांधणीचा जो काय अनुभव आहे तो १०० टक्के वापरून गावागावात घराघरातील प्रामाणिक कार्यकर्ता उभा करण्यासाठी २४ तास देणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत सांगितले.
२०१९ ला पुन्हा काँग्रेसची आणि राणेसाहेबांची ताकद दाखवून देऊया, असे आवाहनही यावेळी आमदार राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. १९९० च्या काळात आम्हा कार्यकर्त्यांना कोण ओळखत नव्हतं, तेव्हा राणेसाहेबांनी ओळख निर्माण करून दिली. आज ती ओळख, तो नावलौकिक तुम्हाला मिळालेला आहे. येत्या ग्रामपंचायत आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिद्दीने काम करून विरोधकांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारणे गरजेचे आहे. ते काम तुम्ही कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील बडय़ा नेत्यांनी नारायण राणेसाहेबच वांद्रेसारख्या निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देऊ शकतात, हे मान्य केले. मुख्यमंत्र्यांना परदेश दौ-यातही वांद्रे पोटनिवडणुकीची दखल घ्यावी लागली. पोलिसांना फोन करून सांगावे लागले. माझ्या नेत्याच्या कार्याची दखल घेऊन सेनेच्या पक्षप्रमुख, गटप्रमुख, खासदार, आमदाराला बुथवर जाऊन काम करण्याची पाळी आली.
ही माझ्या नेत्याची खरी ताकद आहे. खाली मान घालून फिरण्याची गरज नाही. आपण मर्दाचे कार्यकर्ते आहेत. ज्या मर्दाने पुरी शिवसेना कामाला लावली. त्या नेत्याचे आपण कट्टर कार्यकत्रे आहोत. उद्धव ठाकरेंना मी पाहिलं पत्नीला राणीची बाग दाखविण्याचे सोडून भारतनगरची झोपडपट्टी दाखवत होते, रात्र-रात्र फिरत होते.
आजचा काळ माझ्या आयुष्यात चांगला आला असेच म्हणावे लागेल. या दिवसांमुळे खूप काही कळले. आम्हालाही माणसे ओळखायला मिळाली. अशा माणसांची नोंदही ठेवली आहे. ज्या नेत्यामुळे आपण मोठे झालो त्यांच्याविरुद्ध कोण बोलत असेल तर अध्यक्षांकडे तक्रारी करण्यापेक्षा त्याला तेथेच उत्तर द्या आणि मग आमच्याकडे या. असे उत्तर देण्याची क्षमताही तुमच्यात आहे.
तिला जागृत करण्याचे काम मी करेन. मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे. ज्यांना यायचं आहे त्यांनी सहभागी व्हावे, असेही यावेळी आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले. या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी आगामी ग्रामपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुकीचा आढावा घेतला.
तालुकानिहाय चाललेल्या कामकाजाचीही माहिती दिली. जिल्हा बँकेत निर्विवाद वर्चस्व मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलका ऊर्फ प्रज्ञा ढवण या काँग्रेस पक्षाच्या नाहीत. दादांचे नाव वापरून किंवा काँग्रेस पक्षाचे नाव वापरून जिल्हा बँकेत मते मागत असतील तर त्यांच्या प्रचाराला कोणी बळी पडू नये, असेही सतीश सावंत यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संदीप कुडतरकर, मागास सेलचे अध्यक्ष संदीप कदम यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी जि. प.चे उपाध्यक्ष रणजीत देसाई, सुदन बांदिवडेकर, अशोक सावंत, अॅड. राजू परुळेकर, अंकुश जाधव, विकास कुडाळकर आदी तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.