चीन, पाकिस्तान आणि रशिया या तीन देशांचा विरोध डावलून संयुक्त राष्ट्र महासभेने सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याच्या चर्चेला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली – चीन, पाकिस्तान आणि रशिया या तीन देशांचा विरोध डावलून संयुक्त राष्ट्र महासभेने सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याच्या चर्चेला मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे.
भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणेच्या चर्चेला लवकरच सुरुवात होईल अशी आशा असून, संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७० व्या सत्रामध्ये ठोस निर्णयाप्रत ही चर्चा येईल अशी अपेक्षा आहे.
या चर्चेमध्ये सर्व सदस्य देशांनी रचनात्मकदृष्टया सहभागी व्हावे जेणेकरुन ब-याच काळापासून प्रलंबित असलेले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणेचे लक्ष्य पूर्ण होईल असे भारताने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
महासभेचा निर्णय ऐतिहासिक आहे अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रातील भारताचे दूत अशोक मुखर्जी यांनी दिली. हा प्रस्ताव योग्य नसून, पारदर्शक नाही अशी टीका चीनने केली आहे. रशिया, पाकिस्तानचा सुध्दा या प्रस्तावाला विरोध आहे. भारताला संयुक्त राष्ट्राचे कायमस्वरुपी सदस्यत्व बनवायला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचा प्रमुख विरोध आहे.