मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) शहरवासीयांना सुखदायी प्रवासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ ते अगदी बदलापूपर्यंत स्कायवॉकचे जाळे उभारले. मात्र हा स्कायवॉक नेमका कुणासाठी, असा प्रश्न मागील काही वर्षात आ वासून उभा राहिला आहे. भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले, प्रेमीयुगुल वगळता या स्कायवॉकचा पादचा-यांकडून कितपत वापर होतो, त्याच्यावर नेमका ताबा कुणाचा, अशा नाना प्रश्नांची उत्तरे देणारे हे वास्तवादी चित्र.
गर्दुले, भिका-यांना आंदण
ठाणे पूर्व परिसरात केवळ शोभेचे बाहुले ठरलेला स्कायवॉक हा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नसून तो प्रेमीयुगुलांना आंबट चाळे करण्यासाठी हक्काचे ठिकाण बनला आहे. ज्या हेतूंसाठी हा अगडबंब स्कायवॉक बांधण्यात आला, त्याचा वापर नागरिकांकडून कमीच मात्र गर्दुले, भिकारी यांचे निवासस्थान आणि फेरीवाल्यांना दुकान थाटण्यासाठी फुकटात जागा झाली आहे. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी काहीसे ठाण्यातील स्कायवॉकचे चित्र आहे.
ठाणे पूर्वेकडे दलदलीचा परिसर असल्याने नव्याने वसाहत होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे या परिसरात वाहतूक वाढणे अशक्य असताना ‘एमएमआरडीए’ने २००७ रोजी हा प्रकल्प ठाणे महापालिकेच्या माथी मारला. ठाणे रेल्वे स्थानक ते अष्टविनायक चौक असा स्कायवॉकचा मार्ग आहे. तब्बल ८०० मीटरच्या स्कायवॉकसाठी तेव्हा ३२ कोटींचा खर्च नियोजित करण्यात आला होता. मात्र या स्कायवॉकमुळे ठाणे स्थानकाकडून मीठबंदर रोडकडे जाणारा रस्ता अरुंद होत आहे. तसेच या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नसताना अशा प्रकल्पाची आवश्यकता काय, असा सवाल करत या परिसरातील नागरिकांनी त्याला सुरुवातीला प्रचंड विरोध केला. त्यामुळे काही वर्ष या स्कायवॉकचे काम पुढे सरकलेच नव्हते. पण हळूहळू विरोध मावळल्यानंतर स्कायवॉकचे काम सुरू झाले. या स्कायवॉकच्या सांगाडयाखाली सध्या मात्र गॅरेजवाल्यांनीही बस्तान बसवल्याने आधीच अरुंद झालेला रस्ता आणखीनच बिकट झाला आहे.
मंगला हायस्कूलसमोर उच्च दाबाच्या वाहिन्या या स्कायवॉकला अडसर ठरत असल्याने या परिसराचे काम काही वर्ष थांबले. अखेर अनंत अडथळयांची शर्यत पार करत या स्कायवॉकचे मंगला हायस्कूलपर्यंतचे काम संपले आहे. पण जेवढा हा प्रकल्प पूर्ण झाला आहे, त्याचा वापर नागरिकांकडून मात्र कमीच होतो. गर्दुले, भिकारी, फेरीवाले यांनी या स्कायवॉकवर अतिक्रमण केले आहे. त्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत महाविद्यालयीन मुले-मुली यांचा वावर, त्यांचे चाळे यामुळे अनेक जण या स्कायवॉकचा वापर टाळत आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या खर्चाने बांधण्यात येणारा हा स्कायवॉक परिसरातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.