रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अनुदानातून कल्याण-डोंबिवलीत सॅटिस प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र…
रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अनुदानातून कल्याण-डोंबिवलीत सॅटिस प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र सॅटिसच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी ताबा मिळवल्याने प्रवाशांना चालणेही अवघड होऊन बसले आहे. फेरीवाल्यांचे आणि पोलिसांशी आर्थिक हितसंबंध गुंतल्याने स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांना अभय मिळत असल्याची नाराजी आहे. मात्र याच स्कायवॉकमुळे प्रवाशांपेक्षा फेरीवाल्यांचे ‘कल्याण’ झाल्याचे वास्तव आहे.
लोकलमधील गर्दीचा सामना करत फलाटावर उतरल्यानंतरही प्रवाशांना स्कायवॉकवर गर्दीतून मार्ग काढतच स्टेशनबाहेर पडावे लागत आहे. कल्याण-डोंबिवलीतील स्कॉयवॉकवर चक्क फेरीवाल्यांचा बाजार मांडल्याचे चित्र दररोजचेच.
सुमारे ८४ कोटी रुपये खर्च करून कल्याणचा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. तर डोंबिवलीच्या स्कायवॉकवरही कोटय़वधी रुपये खर्च झाले आहेत. अर्धाअधिक स्कायवॉक फेरीवाल्यांनीच व्यापला असल्याने प्रवाशांना ‘बिकट वाट’ शोधून मार्गक्रमण करावे लागत आहे. गर्दीतून मार्ग काढतच प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर अथवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडावे लागते. स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी नाना वस्तूंची दुकाने थाटूनही पोलिस आणि पालिका प्रशासन डोळय़ांवर पट्टी बांधून आहे.
कल्याणमधील स्कायवॉकवर मुंबईतील एको अमराठी फेरीवाल्यांकडून वसुली केली जाते. मोठया फेरीवाल्याकडून १२०० रुपये तर छोटया फेरीवाल्याकडून महिनाकाठी ५०० रुपये हप्ता वसुली केली जाते. एखाद्या फेरीवाल्याने पैसे देण्यास नकार दिल्यास त्याला दमदाटी करून व्यवसाय करण्यास मज्जाव केला जातो. स्कायवॉकवर बसणा-या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गोळा होणा-या पैशातील वाटा रेल्वे पेालिस व पालिका अधिका-यांना पोहोचता केला जातो. त्यामुळे या फेरीवाल्यांवर आजपर्यंत ठोस कारवाई होऊ शकलेली नाही हे तितकेच सत्य आहे. डोंबिवलीच्या तुलनेत कल्याणच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे बस्तान मोठया प्रमाणावर आहे. कल्याण रेल्वे जंक्शन रेल्वे स्टेशन असल्याने हे स्थानक नेहमीच गजबजलेले असते. येथे प्रवाशांची वर्दळ सुरू असते.
स्कायवॉकची जागा जणू काय आपणच खरेदी केल्याच्या अशा आविर्भावात हे फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात. उत्तर भारतीय फेरीवाले मोठय़ा प्रमाणात असून त्यांची दादागिरी वाढली आहे. फेरीवाल्यांच्या त्रासाला प्रवासी कंटाळले आहेत. त्यामुळे स्कायवॉक प्रवाशांसाठी की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न कल्याण-डोंबिवलीकरांना सतावत आहे.