जोपर्यंत मुंबई मेट्रोचे स्पेशल ऑडिट होत नाही तोपर्यंत मुंबई मेट्रोची भाडेवाढ कुठल्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
मुंबई- जोपर्यंत मुंबई मेट्रोचे स्पेशल ऑडिट होत नाही तोपर्यंत मुंबई मेट्रोची भाडेवाढ कुठल्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले..
मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत बैठक सुरु आहे. या बैठकीला केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, एमएमआरडीएचे अध्यक्ष यूपीएस मदान हे उपस्थित आहेत. या बैठकीचा निर्णय होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत जाहीर केले.
‘दर निश्चित समिती’च्या अंतिम अहवालानुसार मेट्रोचे तिकीट दर ११० रुपयांपर्यंत वाढवण्याची मोकळीक ‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड’ला (एमएमओपीएल) मिळाली आहे. ही भाडेवाढ नोव्हेंबरपासून प्रस्तावित आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.
दर निश्चित समितीचे सदस्य असलेल्या जयंतकुमार बांठिया यांनी मात्र या भाडेवाढीला नकार दिला होता. मात्र त्यांचे अल्पमत असल्याने अंतिम भाडेवाढ अहवाल ११० रु. या बहुमताने सादर केला गेला. केंद्र सरकारने २००९ रोजी मेट्रोला ‘मेट्रो अॅक्ट’ लागू केला आहे. वेळीच या ‘मेट्रो अॅक्ट’मध्ये आवश्यक तरतूद केल्यास आगामी भाडेवाढ टाळणे सरकारला शक्य आहे, असे जयंतकुमार बांठिया यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
आता दिल्लीतील बैठकीत काय निर्णय घेतला जातो आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.