व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी कॉँग्रेसने लावून धरत राज्यसभेतील कामकाज बंद पाडले.
नवी दिल्ली- ललित मोदी प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी कॉँग्रेसने लावून धरत राज्यसभेतील कामकाज बंद पाडले. कॉँग्रेसने दिवसभरात या मुद्दयावर मोदी सरकारला सळो की पळो करून सोडले.
आरोपी मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे कॉँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रश्न केले. निवडणुकीच्या काळात पारदर्शकता, जबाबदारी व भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असे मोदी सांगत होते. त्या वचनांचे काय झाले, अशा प्रश्नांच्या फैरी शर्मा यांनी झाडल्या.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ललित मोदी यांना प्रवासासाठी कागदपत्रे द्यावेत, अशी मागणी परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी ब्रिटिश सरकारला का केली असा प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी शर्मा यांनी केली. तसेच मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रावर राजे यांची स्वाक्षरी असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.
कॉँग्रेसपाठोपाठ माकप, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी स्वराज व राजे यांची मागणी उचलून धरली. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत पाचवेळा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, मरण पावलेल्या खासदारांना श्रद्धांजली अर्पण करून लोकसभेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.