देशभरात पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे आता महाराष्ट्र, राजस्थान येथील पर्यटनाला हजारो कोटींचा फटका बसला आहे. असोचेमने सादर केलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे.
मुंबई – देशभरात पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे आता महाराष्ट्र, राजस्थान येथील पर्यटनाला हजारो कोटींचा फटका बसला आहे. असोचेमने सादर केलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे.
स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि समाजात याविषयी जगजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यापूर्वी राजस्थानमध्ये हिवाळ्यात परदेशी पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी व्हायची.
मात्र, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्वाईन फ्लूच्या भीतीमुळे ही संख्या रोडावलेली दिसून येते. मात्र २०१५मध्ये हे चित्र बदलेल असे वाटत होते. परंतु स्वाईन फ्लूचा वाढता प्रकोप पाहून फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजस्थाननंतर महाराष्ट्राचा पर्यटनात दुसरा क्रमांक लागतो. हिवाळ्यात महाराष्ट्रासह मुंबईत परदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. मात्र, स्वाईनच्या भीतीने राज्य सरकारने पर्यटकांना काळजी घेण्याचा सल्ला दिल्याने काही महिन्यांपासून अनेक पर्यटन स्थळे ओस पडू लागली आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थानात अत्यंत बिकट परिस्थिती आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थानमध्ये अनेक पर्यटक स्वाईन फ्लूमुळे प्रभावित झालेले आहेत. बहुतांश परदेशी पर्यटक जयपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर यांसारख्या शहरांना आवर्जून भेट देतात. त्यामुळे या शहरातून स्वाईन फ्लूच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हिवाळ्यात अंदाजे दोन ते अडीच लाख परदेशी पर्यटक दिल्ली-आग्र्यातील सुप्रसिद्ध गोल्डन ट्रँगलला न चुकता भेट देतात.
दरम्यान, दिल्ली विमानतळावर उतरणा-या परदेशी पर्यटकांमुळे देशातील अंतर्गामी वाहतूक संख्या सुमारे ३० टक्के म्हणजे प्रत्येक महिन्याला जवळपास ८ लाख इतकी आहे. यातील बहुतांश लोक गोल्डन ट्रँगल पाहण्यासाठी आलेले असतात. मात्र, स्वाईन फ्लूचे पडसाद उमटू लागल्यानंतर पर्यटकांच्या वाहनांची संख्या खूपच कमी झालेली आहे.
त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम हॉटेल व्यवसाय, विमान प्रवास, टॅक्सी, रेस्टॉरंट यांच्यावर दिसून येत आहेत. याआधी परदेशी पर्यटकांची वाढती संख्या पाहून मोठय़ा प्रमाणात परकीय चलन भारतात येत होते. मात्र, स्वाईन फ्लूमुळे या संख्येत आता घट झाली आहे. त्यामुळे याचा फटका महाराष्ट्र आणि राजस्थान पर्यटनाला बसला आहे.
राज्यात १८७ स्वाईन फ्लू रुग्णांवर यशस्वी उपचार
राज्यातील स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यात यश येत असून आतापर्यंत १८७ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. याशिवाय रविवारी १० रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती मंत्रालयाच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यात एकूण ४१५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यातील ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात १६८ स्वाईन फ्लू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी १० जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.