शेतक-यांनी जेव्हा शेतातून हत्ती हुसकावून लावले. तेव्हा हत्ती मेल्यास गुन्हा दाखल करण्याची भीती वनविभागाने घातली. डिगस येथे एक मादी हत्ती तडफडून मृत झाला.
शेतक-यांनी जेव्हा शेतातून हत्ती हुसकावून लावले. तेव्हा हत्ती मेल्यास गुन्हा दाखल करण्याची भीती वनविभागाने घातली. डिगस येथे एक मादी हत्ती तडफडून मृत झाला. त्यावेळी शेतक-यांनीच याला मारले असावे, असा संशय व्यक्त करून काही शेतक-यांची चौकशी केली गेली. हत्ती पकडमोहीम निश्चितपणाने यशस्वी झाली.
शेतक-यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र राजकीय प्रभाव वाढला. हत्तीपकड मोहिमेचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी कर्नाटकातील दांडेली अभयारण्यात हत्ती सोडण्यापेक्षा ते आंबेरीच्या तळावर बंदिस्त ठेवणा-या राजकीय पुढा-यांनीच या हत्तीचा खून केला आहे, असा आरोप वन्यजीव मित्रांकडून केला जात आहे.
आता हत्ती मेल्यानंतर चुकी कोणाची आणि हत्तीच्या मृत्यूचा गुन्हा कोणावर दाखल करणार? असाही प्रश्न विचारला जात आहे. ज्यांना मोठेपण मिरविण्यासाठी हे हत्ती हवे होते असे राजकीय पुढारी आता कोठे आहेत? उरलेल्या दोन हत्तींचे जीव तरी सुरक्षित आहेत काय? न पेक्षा त्यांना दांडेली अभयारण्यात पूर्ववत सोडावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
कोणताही वन्यजीव जेव्हा बंदिस्त केला जातो, तेव्हा त्याच्या नैसर्गिक कृतीवर बंधने घातली जातात. वन्यजीवांना अशी बंधने मान्य नसतात आणि त्यामुळे ते पिंज-यात अर्धमेलेच होतात. हत्तींचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तीनही हत्ती ज्यावेळी पकडून आंबेरी तळावरील क्रॉलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी या हत्तींना पाहण्यासाठी फार मोठी गर्दी उसळली.
मनुष्यप्राण्याची ही कृती नैसर्गिक असली तरी ती वन्यप्राण्यांना मारक होती. वनविभागाला हे ज्ञात होते आणि कळतही होते. मात्र पकडमोहिमेत झटपट मिळालेले यश आणि हत्ती झटपट माणसाळण्याच्या राजकीय इच्छाशक्ती पुढे हे अधिकारीही हतबल होते.
हत्तीग्राम बनवावे, हत्ती पर्यटकांसाठी उभे करून ठेवावेत अशा स्वप्नांचे फार मोठे इमले बांधणा-या राजकीय पुढा-यांनी त्या हत्तींच्या मनाचा कधीच विचार केला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून वाढत्या उन्हाळयात भाल्याच्या टोकावर हत्तींना दिले जाणारे प्रशिक्षण त्यांच्या जीवावर बेतू लागले.
आज अशी स्थिती आहे, हत्ती प्रशिक्षित करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते ती प्रचलित पद्धती असली तरी एवढया जलदगतीने हत्ती शिकविले जात नाहीत आणि ते शिकतही नाहीत. काही काळ हत्तींनी माणसे ओळखावीत, त्यानंतर अशी माणसे त्या हत्तींच्या जगण्याचा एक भाग व्हावा आणि त्यानंतरच त्याचे प्रशिक्षण व्हावे म्हणजे ते सर्वच बाजूने योग्य ट्रेनिंग होऊ शकते.
सिंधुदुर्गातून तीन हत्ती पकडण्यात आले. माणगाव, डोंबवाडी आणि परिसरातील जंगल भागात वास्तव्य करून असलेल्या या हत्तींना पकडल्यानंतर गणेश, भीम आणि समर्थ अशी नावे ठेवण्यात आले. या हत्तींपैकी मध्यम वयोमर्यादा असलेला गणेश १० एप्रिलला मयत झाला. याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही.
लाखो रुपये खर्चून जिल्ह्यातील सर्व वनविभागाची यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा वापरून हत्तीपकड मोहीम यशस्वी केल्यानंतर त्यातील एका हत्तीचा मृत्यू होणे म्हणजेच या पकडमोहिमेत मिळविलेल्या यशावर पाणी फेरण्यासारखेच आहे.
वन्यजीवाचे मोल या ठिकाणच्या प्रत्येक शेतक-याला कळलेले आहे. म्हणूनच गेली दहा वर्षे सातत्याने हत्ती नुकसान करत असतानासुद्धा या जीवांचे पालन केले. पकड मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या चुकीमुळे हत्ती मरत असेल तर त्याची नैतिक जबाबदारीही त्या अधिका-यांनी घेणे गरजेचे आहे.
मुळात हे हत्ती प्रशिक्षित करण्यासाठी सिंधुदुर्ग योग्य जागा आहे का? याचा विचार आजही होणे गरजेचे आहे. कोणाच्या तरी आग्रहास्तव आणि सत्ताधिका-यांच्या दबावाखातर प्रशिक्षण देण्यास वातावरण प्रतिकूल नसतानाही हत्तींचा छळ होत असेल आणि एकेक करून हत्ती मरत असतील तर असे प्रशिक्षण या ठिकाणी न देता ते दुस-या ठिकाणी द्यावे व प्रशिक्षित झाल्यानंतर याच हत्तींना मुक्त संचार करण्यासाठी किंवा पर्यटनदृष्टया हत्तीग्राम बनविण्यासाठी आणावे.
राजकीय आकांक्षेपोटी यापुढे एकाही हत्तीचा बळी जाता नये. दहा वर्षे सिंधुदुर्गाच्या वातावरणात ऊन, वारा, पाऊस असे तिन्ही ऋतू अंगावर झेलत वावरणा-या या तिन्ही हत्तींच्या जीवाला धोका पोहोचला नाही. मात्र डॉट मारून क्रॉलमध्ये बंदिस्त केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात एक हत्ती मरण पावतो. यातून वातावरणाचा दोष नाही किंवा वाढत्या उष्म्याचा दोष नाही तर ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते ते निर्धोक म्हणता येणार नाही. त्यामुळे उर्वरित दोन्ही हत्तींच्या प्रशिक्षणाची पद्धती बदलणे गरजेचे आहे.