कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतासहित विकसनशील देशांवर दबाव आणणे ‘नैतिक’दृष्टय़ा अयोग्य आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगत देशांवर केली.
पॅरिस- कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतासहित विकसनशील देशांवर दबाव आणणे ‘नैतिक’दृष्टय़ा अयोग्य आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगत देशांवर केली. आर्थिक विकास साधण्यासाठी विकसनशील देशांना कार्बन उत्सर्जन गरजेचे आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी येथील आर्थिक दैनिकात लिहिलेल्या लेखात आपले मत व्यक्त केले. विकासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणा-या देशांची संधी हिरावून घेणे योग्य नाही. विकसित देशांनी इंधनाचा भरमसाट वापर करून आपली प्रगती साधली आहे. आता हवामान बदल विरोधातील लढय़ात त्यांचे कर्तव्यही तितकेच मोठे आहे, असे मोदी म्हणाले.
हवामान बदल हे मोठे आव्हान, तातडीने कृती गरजेची
येथील परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, हवामान बदल हे मोठे आव्हान असून त्यावर तातडीने कृती गरजेची आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी र्सवकष, सर्वासाठी समान व वास्तविकतेवर आधारित करार होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्रीमंत देशांनी आपल्या जीवनशैलीत बदल करून पृथ्वीवरचा भार कमी करावा. हवामान बदल हे जागतिक आव्हान असून ते आम्ही तयार केलेले नाही. मानवता व निसर्गात संतुलन साधणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.