मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दैनिक प्रहारचे कार्यकारी संपादक नारायण राणे यांनी लिहलेला हार आणि प्रहार…
मुंबई महानगरपालिकेसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुका राज्यात 16 फेब्रुवारी, 2012 रोजी होत आहेत. सर्वच पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाने आपली ध्येयधोरणे, जनतेसाठी केलेले काम आणि भविष्यातील योजना लोकांसमोर प्रचाराद्वारे मांडतांना उच्च वैचारिक व बौद्धिक पातळी राखणे अपेक्षित आहे. या निवडणुकीमध्ये मात्र प्रचाराची पातळी पार रसातळाला गेलेली दिसते. काही पक्षांकडून दुस-या पक्षाच्या नेत्यांबाबत अत्यंत हीन दर्जाची, अश्लील भाषेतील टीका करून होळीच्या आधीच शिमगा केला जात आहे. दस-याला शिवाजी पार्कवर शिव्यांची लाखोली वाहून शिमगा साजरा करणा-यांना या वर्षी आणखी एक शिमगा साजरा करण्याची संधी या निवडणूक प्रचारामुळे मिळाली. ही खालच्या दर्जाची टीका सभ्यतेला तर धरून नाहीच, परंतु ती निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि आचारसंहितेमध्ये बसते काय, हासुद्धा प्रश्न आहे.
मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर, देशाची आर्थिक तर राज्याचे मर्मस्थान असलेली राजधानी. मुंबई महानगरपालिका मोठी, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मोठा आणि या शहराची लोकसंख्याही मोठी. या शहराच्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची अस्मिता व महाराष्ट्राची संस्कृती याचे भान सुटलेली काही नेतेमंडळी ऐतिहासिक परंपरेचे वैभव लाभलेल्या या राज्याच्या नावाला काळिमा फासत असल्याचे लोक पाहत आहेत. अशा प्रकारची कमरेखाली वार करणारी, वैयक्तिक अपमान करणारी व शिवराळ भाषेतील टीका यापूर्वी कधीही, कोणत्याही नेत्याने निवडणूक प्रचारामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर केल्याचे आठवत नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली तब्बल सोळा वष्रे शिवसेना-भाजप सत्तेवर आहेत. सत्तेवर असलेल्या या पक्षाच्या नेत्यांनी विकासाच्या व जनतेच्या प्रश्नावर
एक उच्च वैचारिक पातळी राखून निवडणुकीचा प्रचार करणे आवश्यक होते. पराभवाची धास्ती घेतलेल्या शिवसेना व भाजपकडून दुर्दैवाने ही किमान अपेक्षासुद्धा पुरी होऊ शकलेली नाही.
गेल्या वीस वर्षात जगातील अनेक शहरांचा वेगाने विकास झाला. ही विकसित शहरे पर्यटकांसाठी आकर्षण झाली. पर्यटन उद्योगामुळे त्या शहरांचाच नव्हे तर त्या देशांचाही विकास झाल्याची उदाहरणे सिंगापूर, क्वालालंपूर, शांघाय या शहरांनी आपल्यासमोर ठेवली आहेत. वीस वर्षात जर या शहरांचा कायापालट होऊ शकतो तर आमच्या मुंबई शहराचा मागील सोळा-सतरा वर्षात त्यांच्यासारखा विकास करण्याचा प्रयत्न का झाला नाही? दिवसेंदिवस ही मुंबई बकाल होत चालली आहे. प्रत्येक फुटपाथवर झोपड्या, वाढती दरुगधी, वाढती रोगराई असेच आपल्या मुंबईचे चित्र आपल्यापुढे येते. ना आरोग्याची व्यवस्था, ना शिक्षणाची आणि रस्त्यांची तर पार दुर्दशा! सोळा वर्षे सत्तेवर असलेल्यांनी ही परिस्थिती बदलण्याचे काय प्रयत्न केले? नागरी सुविधांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना पालिकेतील सत्तेचा वापर करदात्या मुंबईकरांसाठी झाला, की वैयक्तिक स्वार्थासाठी? आपल्या हातून सत्ता जाणार असे लक्षात येताच आता शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफडणा-या माशासारखी झाल्याचे दिसते. वैयक्तिक स्वार्थासाठी मुंबई महापालिकेतील सत्तेचा वापर केल्यामुळे हातून सत्ता जाणार या नैराश्याच्या भावनेतूनच जाहीर सभांमधून आणि सामना दैनिकामधून मुख्यमंत्र्यांवर आणि विरोधकांवर द्वेषाने आणि आकसाने भरलेली टीका होत आहे.
सामनाने 12 फेब्रुवारी, 2012 च्या अग्रलेखामध्ये अत्यंत हीन पातळीवर जाऊन मा. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे अस्तित्व संपेल, असे जे वक्तव्य मा. मुख्यमंत्र्यांनी केले त्यात वावगे काय? गेली काही वर्षे शिवसेनेची वाटचाल वेगाने अधोगतीकडेच होत आहे. मागील विधानसभेच्या किंवा नुकत्याच संपलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकींचे निकाल पाहिले तर शिवसेना-भाजप यांचा महाराष्ट्रातील प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे स्पष्ट दिसते. शिवसेनेने मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून महापालिकेचा कारभार केला, चांगला कारभार केला नाही, यावर जनतेचे लक्ष आहे. आपल्यावर जनतेचे लक्ष असल्याचे शिवसेनेचे कार्यकत्रे व नेते मात्र विसरल्याचे दिसते. या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील भांडवली खर्च दिवसेंदिवस कमी होत जाऊन विकासासाठी पैसे न मिळणे आणि पालिका व बेस्ट आर्थिक संकटात सापडल्यामुळे शासनाकडे कर्ज उभारण्यासाठी परवानगी मागणे यावरून ही परिस्थिती स्पष्ट होते. या परिस्थितीकडे जनतेचे लक्ष असून, येत्या निवडणुकीत जनता योग्य तो निर्णय घेणार आहे. मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवून जनतेला दर्जेदार नागरी सुविधा देण्याची क्षमता शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये नसल्यामुळे, त्यासंबंधी त्यांचा अभ्यासही नसल्यामुळे आणि त्यांना प्रशासनाचीही माहिती नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मुंबईच्या दिवसेंदिवस वाढणा-या बकालपणाला शिवसेनाच जबाबदार आहे.
मुंबई महापालिकेचा हा कारभार पाहूनच मा. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतर शिवसेनेचे अस्तित्व दिसणार नाही, असे विधान केले. पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर आज त्यांच्याकडे असलेले पुढारी अस्वस्थ होऊन सरावैरा इकडे-तिकडे पळतील, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. मा. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाचा मान राखणे व त्या पदाची शान वाढविणे या राज्यातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीची हेटाळणी करणे, मानहानी करणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला धक्का लावणे ठरेल, असे मला वाटते. सामनाच्या
12 फेब्रुवारीच्या अग्रलेखातील हीन दर्जाची भाषा, शब्दप्रयोग व इतिहासातील दाखल्यांचा आपल्या सोयीने वापर करून मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा झालेला प्रयत्न निदनीय आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आपण एकटेच धनी आहोत, असे कोणी समजण्याचे कारण नाही. शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशावर संपूर्ण महाराष्ट्राचा अधिकार आहे. मुंबई महापालिकेवर शिवरायांचा भगवा फडकत ठेवा, असे आवाहन करण्यात येत असले तरी पक्षीय स्वार्थासाठी भगव्या झेंडय़ाचा वापर करणा-या या पक्षाने आपल्या भ्रष्टाचारामुळे शिवरायांच्या पवित्र झेंड्याचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या तिरंग्यामध्येही भगवा आहे आणि काँग्रेसने त्याची खरी शान राखून मान ठेवला आहे. काँग्रेसच्या तिरंग्यातील भगवा हाच खरा शिवरायांचा भगवा! छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगून आपण त्यांच्या जागी आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी समजण्याचे काहीही कारण नाही. शिवरायांच्या नखाचीही सर त्यांना नाही, हे दाखविण्यासाठी इतिहासाचे अनेक दाखले देता येईल. यांना महापालिकेत जे करता आले नाही तेच आम्ही ‘करून दाखवले’ असे म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मुंबई महापालिकेच्या आजच्या स्थितीवरूनच यांचे कर्तृत्व आणि मर्दुमकी दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास आज जगासमोर आहे. त्यांचे कर्तृत्व ‘करून दाखवले’ म्हणून जाहिरात करण्याची गरज कोणालाही वाटली नाही. खरोखरी केलेली विकासकामे जनतेला दिसत असतात, ती सांगावी लागत नाही. त्यामुळे ‘करून दाखवले’ या फक्त थापा आहेत आणि तो मनोरंजनाचा एक विषय आहे.
मुंबई महानगरपालिकेचा कारभार शिवसेना-भाजप कार्यक्षमतेने करू शकत नाही, हे जनता सोळा वष्रे पाहत आली आहे. वेगवेगळ्या कामांसाठी दिलेल्या टेंडर्समध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. व्हेरिएशनच्या नावाखाली 2,752 कोटी रुपयांच्या कामांसाठी 4,447 कोटी रुपये मोजून 1,694 कोटी रुपयांचा गरव्यवहार यांच्याच काळात झाला. दोन कोटी 16 लाख रुपये किमतीच्या पुलाच्या कामासाठी 146 कोटी म्हणजे 6,671 टक्के या प्रमाणात वाढीव किंमत देण्यात आली. पावसाळी पाण्याच्या गटारासाठी 728 कोटी रुपयांचे टेंडर काढून आजवर 1,577 कोटी रुपये ठेकेदाराला दिले. व्हेरिएशन 116 टक्क्यांचे. मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या कामात व ब्रिमस्टोवॅड प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आल्याचे कालच मा. मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. ‘करून दाखवले’ म्हणणा-यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची ही उदाहरणे. महापालिकेकडे कररूपाने जमा होणारा पैसा नागरिकांच्या घामातून आलेला आहे, याचेही यांना भान नाही. आपल्याला मुंबई शहराचा अभिमान आहे, ती आमची अस्मिता आहे, असे म्हणणा-यांच्या राजवटीतच रोजी-रोटीसाठी मुंबईत अन्य राज्यांतून लोक येण्याचे थांबले. यांच्या राजवटीतच या महानगराच्या लोकसंख्येत घट झाली. हे या शहराच्या भरभराटीचे लक्षण नाही.
मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेने आतापर्यंत महापालिकेतील सत्तेचा उपभोग घेतला. त्या सत्तेतूनच आपला उदरनिर्वाह करून यांनी आपली भरभराटही करून घेतली. तोच मराठी माणूस या मुंबईतून हद्दपार झाला व होत आहे, याबद्दल या ‘करून दाखवले’ मध्ये चकार शब्दही नाही. मुंबईतील बेकार मराठी तरुणांच्या नोकरी-व्यवसायांसाठी महापालिकेच्या माध्यमातून काही योजना राबविल्याचासुद्धा त्यामध्ये उल्लेख नाही. या बेकार मराठी तरुणांची शिवसेनेला काही चिंता नाही. अशा मराठी माणसाने शिवसेनेमध्ये फक्त दगड मारण्यासाठीच राहायचे काय? सुज्ञ मराठी माणसाने या सर्व परिस्थितीचा विचार केल्यामुळेच तो शिवसेनेपासून दूर गेला. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेचा एकही खासदार नाही आणि आमदारांची संख्याही पूर्वीपेक्षा कमी झाली. यावरून तरी या पक्षाच्या नेत्यांनी बोध घेतला पाहिजे व आपल्या वर्तनाचे, आचरणाचे, बोलण्याचे आणि लिखाणाचे भान ठेवले पाहिजे, असे मला वाटते. आपल्यावर टीका करणा-यांना शिव्या दिल्या, त्यांचा अपमान केला, अश्लील शब्दांत त्यांची हेटाळणी केली म्हणून शिवसेनेच्या नेत्यांना कोणी चांगले म्हणेल, अग्रलेख लिहिणा-याचे कौतुक करेल, अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राला व मुंबईकरांना अशी हीन दर्जाची व हेटाळणी करणारी टीका आवडणारसुद्धा नाही. म्हणूनच मराठी माणसाला हद्दपार करणा-या शिवसेनेला जनता या वेळी मुंबई महापालिकेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो.
या निकालानंतर आणि शिवसेना मुंबईतून हद्दपार झाल्यानंतर शिवसेनेचे काय अस्तित्व राहील, यांच्या नेत्यांना कुठे परदेशातील आपल्या डबोल्यासारखा आसरा घ्यावा लागेल की, उदरभरणासाठी दुसरे साधन शोधावे लागेल, याबद्दल त्यांनी आतापासूनच ज्योतिषांचा सल्ला घेतलेला बरा. येत्या 17 फेब्रुवारीनंतर काँग्रेसच्या नेत्यांना आणि मा. मुख्यमंत्र्यांना मुंबईचा जागतिक दर्जाच्या शहराप्रमाणे विकास करण्याची जबाबदारी स्वीकारून या महानगराचे परिवर्तन करावे लागेल. त्याचप्रमाणे या निकालानंतर व पालिकेतील सत्ता हातातून गेल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांना शहरात तोंड दखविणे आणि फिरणेसुद्धा कठीण झाल्याशिवाय राहणार नाही.