साधारण वर्ष-दीड वर्षापूर्वी, सहज जिज्ञासा म्हणून, शलाकाची आयक्यू टेस्ट केली. तिच्या वयाच्या मानाने तिला जरा जास्त कळतं, हे मला त्यातून समजलं. तिचा आयक्यू चांगला आहे याचा मलाच अभिमान वाटायला लागला. मी एका बुद्धिमान मुलीची आई आहे, यात माझा पराक्रम तो काय? पण, तरीही मला आपलं छान, अगदी हवेत तरंगल्यासारखं वाटायला लागलं. तिला काय शिकवू आणि काय नको असं झालं. त्याबरोबर तिला सारखं, ‘तू हुशार आहेस’ असं सांगितलं जाऊ लागलं. थोडय़ाच काळात तिच्या डोक्यात हवा जाऊ लागली आणि मी जमिनीवर आले.
आपलं मूल इतर मुलांच्या मानाने हुशार आहे, असं समजल्यावर किंवा जाणवल्यावर आई-वडिलांचं सर्वसामान्यपणे असंच होतं. मग त्या हुशार मुलांवर सगळ्या खानदानाच्या अपेक्षा केंद्रित होतात. त्याच्या भविष्याबद्दल चिंतेऐवजी खात्री बाळगली जाते. त्याला सगळ्या सोयी उपलब्ध व्हायलाच हव्यात, असा जणू नियमच बनून जातो. सगळ्या गोष्टींमध्ये त्याचंच कौतुक होऊ लागतं. परिणामी कौतुकाची सवय व्हायला लागते. आपण इतरांपेक्षा जरा जास्त हुशार आहोत, ही भावना मुलांना इतर मुलांपासून, आजूबाजूच्या लोकांपासून दूर करू शकते. लहानपणी नाही, पण मोठं झाल्यावर मात्र याचे परिणाम जाणवू लागतात. एखाद्या माणसाशी आपणहून बोलताना, काय बोलावं हे सुचतच नाही. समोर कुणीतरी रडतंय त्याला समजून कसं घ्यायचं हे कळतंच नाही. आपल्या हुशारीचा काय उपयोग? असं एखाद्यालाच वाटतं. काही जण मात्र लोकांपासून तुटतच जातात.
दुसरी गोष्ट म्हणजे, या मुलांकडून गुणांच्या बाबतीत भरपूर अपेक्षा बाळगल्या जातात. खरं तर शाळा-महाविद्यालयात घेतल्या जाणा-या परीक्षा या तुमच्या ज्ञानावर आधारित असतात. त्या बुद्धीच्या क्षमतेपेक्षा तुमच्या लिहिण्या-वाचण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या क्षमतेचे एकक असतात. पण तरीही, आपल्याकडे हुशारी गुणात्मकरीत्या मोजली जाते. चांगले गुण मिळवणा-या आणि हुशार असणा-या मुलांना परीक्षेतले गुण म्हणजेच सगळं जग असं वाटू लागतं. मग अगदी दोन गुणांचं लिहायचं राहिलं म्हणूनसुद्धा ही मुलं अस्वस्थ होतात. आई-वडिलांना त्यांच्या या झोकून देण्याच्या वृत्तीचं खूप कौतुक वाटतं. त्यांच्या सांत्वनासाठी आई-बाबा तयार असतातच. पुढे जेव्हा त्रासदायक परिस्थितीतून जायचं असतं, तेव्हा ही मुलं अशीच चिडचिडी होतात. लवकर नाराज होतात. मेहनतीला यश आलं नाही म्हणून दु:ख कुरवाळत बसतात. ‘खूप हुशार असूनही तो मागे पडला,’ ‘खूप हुशार आहे, पण नैराश्यामुळे काहीच करत नाही,’ ही वाक्यं हुशार मुलांच्या बाबतीत बरेचदा कानावर येतात.
हुशार मुलं असण्यापेक्षा सर्वसामान्य मूल असावं, असं काही आई-बाबा बोलून जातात. कारण, हुशार मुलांना भरपूर समस्या असतात असं म्हटलं जातं. हुशार मुलांना असणा-या समस्या फक्त त्यांच्या हुशारीमुळे नसतात. त्यांच्या हुशारीमुळे त्यांना मिळणा-या झुकत्या मापामुळेसुद्धा असतात.
मुलं हुशार आहेत हे जाणवल्यानंतर, आई-बाबांनी काही गोष्टी स्वत:लाच समजवायला हव्यात. मुलगा/मुलगी हुशार आहे, म्हणून आपण किंवा त्याने/तिने जग जिंकलेलं नाही. त्याची हुशारी ही फक्त अनेक क्षमतांपैकी एक क्षमता आहे. त्याला स्वतंत्र बनवणं, अडचणींना तोंड द्यायला लावणं, त्याच्या विकासाच्या संधी देणं हे आपलं काम आहे. काही वेळेस मात्र, या संधी त्याच्या त्यानेच शोधायला हव्यात. हुशारी म्हणजे यशाची गॅरंटी नाही, त्याच्यासाठी मेहनत करावीच लागणार आहे, प्रतीक्षा करावीच लागणार आहे. मुलांना लहान लहान गोष्टींमधून आनंद घ्यायला प्रोत्साहन देणं जास्त महत्त्वाचं आहे, त्याच्याशी हुशारीचा काहीही संबंध नाही.
शलाकाच्या बाबतीत मी स्वत:ला आणि मिहिकालाही जमिनीवर आणलं आहे. आणि तसंच ठेवण्याचा प्रयत्न करेन. तिची हुशारी, तिने स्वत:चा विकास साधण्यासाठी एक साधन म्हणून वापरायला हवी. हुशार आहोत म्हणून जग जिंकल्याच्या धुंदीत न राहता, पुस्तकांबरोबर माणसंही वाचायला शिकायला हवीत म्हणून हे आवश्यक वाटतं.