‘ट्रेकलव्हर्स’ ग्रुपचा गेल्या वर्षातला शेवटचा ट्रेक ठरवला जात होता, त्यामुळे काहीतरी वेगळं करावं हे खूळ नेहमीप्रमाणे डोक्यात होतंच. पावसाळ्यात प्रबळगड – कलावंतीणगड असे दोन ट्रेक एका दिवसात केले होते. आता म्हटलं, थोडं एक पाऊल पुढे जाऊन ट्रेक हॅटट्रिक करू आणि मग ठरली – ‘कळसुबाई – अलंग – मदन’ मोहीम!
याचसाठी केला होता अट्टहास
शेवटचा ट्रेक, हटके व्हावा
तुकाराम महाराजांचा हा अभंग (अर्थात दुसरी ओळ थोडी बदललीय)आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी खरंच, अगदी समर्पक आहे. या आणि याच निभ्रेळ आनंदासाठी आम्ही ‘हॅटट्रिक ट्रेक’चा अट्टहास केला होता. झालं असं की, डिसेंबर आला, वर्षातला शेवटचा महिना हा! आणि या वेळी थोडी मोठी मोहीम करावी असं सर्वाच्याच मनात होतं. मग ठरलं की या वेळी तिहेरी ट्रेक करायचे. आमचं पहिलं लक्ष्य होतं-कळसुबाई. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर! ५४०० फूट उंच. नुसत्या विचारानेच जग जिंकल्यासारखं वाटत होतं. कसा-यापर्यंतचा दोन तासांचा रेल्वे प्रवास, पुढे दीड तासांचा जीप प्रवास करून आम्हा १६ जणांचं उत्साही टोळकं १३ डिसेंबरला रात्री ११.३० वाजता ‘बारी’ गावात पोहोचलं आणि मोहिमेची सुरुवात झाली. टॉर्चच्या उजेडात चालत, पाठीवरच्या जड बॅगा सांभाळत, शिवरायांच्या घोषणा देत आम्ही चढाई करत होतो. चालून घामाघूम होत होतो. एकमेकांची टांग खेचत, ‘एवढय़ात दमला का रे?’ असे एकमेकांना खिजवत होतो. वर जाऊ तसतशी थंडी वाढत होती. लोखंडी जिन्याच्या पायरीवर (पायरी कसली, फक्त लोखंडी पट्टी होती ती) तोल सावरत, मजल दरमजल करत आम्ही ‘वर’ पोहोचलो. पोहोचलो बुवा एकदाचे! या आविर्भावात सगळ्यांनी एकच जल्लोष केला. वर मरणाची थंडी होती आणि त्यात भर म्हणून जोराचा वाराही होता. सगळे गारठून गेले. आधी शेकोटी केली. थोडी ऊब मिळाल्यावर झोपण्याचा प्रयत्न केला, पण कसलं काय! एवढी हुडहुडी भरली की विचारता सोय नाही. पुन्हा बसलो शेकोटी भोवती! हळूहळू उजाडायला लागल्यावर पुढचा तासभर आम्ही जे काही पाहत होतो त्यावर विश्वासच बसत नव्हता.
क्षितिजावर होणारं सूर्याचं आगमन, आकाशात होत असलेली रंगांची उधळण, निळ्या-तांबूस-काळ्या रंगाच्या कितीतरी छटा, पांघरलेल्या धुक्यातून आपली डोकी वर काढणा-या डोंगररांगा.. सूर्याच्या त्या तांबूस-सोनेरी प्रकाशात आम्ही न्हाऊन निघत होतो. स्वर्ग काय म्हणतात ना, तो असाच असावा बहुतेक! कळसुबाईचं दर्शन घेऊन थोडी पोटपूजा करून साडेसात वाजता आम्ही उतरायला सुरुवात केली. आता मात्र आम्ही सुसाट निघालो. बारी गावात पोहोचेपर्यंत सॉलिड भूक लागली होती. त्यामुळे आवस्कर दादांच्या घरी जेवणावर तुटून पडले सगळे.
आता म्हटलं आराम करू थोडा, तर नाही! जीप हजर होती, पुढच्या प्रवासासाठी. सूर्यास्ताआधी ‘अलंग’ वर पोहोचायचं असल्यामुळे थांबून चालणार नव्हतं. पुन्हा दीड तासाचा जीप प्रवास करून घाटघर धरणाजवळ आलो. यापुढे आमच्यासोबत असणार होते, आमचे गाइड – दत्ता भाऊ! तो कुठचं घड्याळ वापरतो कुणास ठाऊक, कारण ‘थोडं-थोडं’ म्हणत या माणसानं तब्बल पाच तास चालवलं आम्हाला. दुपारी पोटभर जेवल्यावर भर उन्हात एक पाऊलही टाकणं जीवावर येत होतं. पण गेला बुवा, दत्ता घेऊन आम्हाला! अलंगची वाट खरंच थोडी खडतर होती. रॉक पॅचेस दमछाक करणारे होते. मुळात जिथं पोहोचायचंय तो पॉइंटच दिसत नव्हता. कुठल्याशा डोंगररांगेला पूर्ण वळसा घातला आम्ही आणि मग कुठे ती गुहा आली. एव्हाना सूर्यास्त व्हायला लागला होता. सूर्य अस्ताला जाताना पाहणं नेत्रसुखद असलं तरी ब-याचदा काहूर निर्माण करतं मनात, आताही असंच काहीसं वाटत होतं. हे काहूर बहुधा, ३ पैकी २ ट्रेक संपले आणि उद्या पुन्हा रोजच्या त्याच त्या आयुष्यात परतावे लागणार या कल्पनेनं मनात उठतं.
एकतर आदल्या रात्री झोप नाही आणि परत सलग ट्रेकमुळे सगळेच थकले होते. तासाभराच्या विसाव्यानंतर चहा घेऊन थोडं फ्रेश वाटायला लागलं. रात्री चुलीवर बनवलेल्या पीठलं-भाकरीवर पुन्हा सगळे तुटून पडले. दिवसभर एवढं चालूनही, जेवणानंतर शतपावली करण्याची कल्पना कुणाच्या तरी सुपीक डोक्यात आली आणि अर्धी ‘भुतं’ बाहेर पडली. शेकोटी करण्यासाठी वाटेत प्रत्येकाने आपापली साधनसामग्री जमा केली. तासा-दीड तासाच्या गप्पा-टप्पांनंतर सगळे पुन्हा गुहेत परतले. एव्हाना ११.३० झाले होते. झोप कधी लागली कळलंच नाही आणि पुन्हा एका क्षणात सकाळ झाल्यासारखं वाटलं.
पंधरा डिसेंबरची सकाळ, आमची गुहा विरुद्ध दिशेला असल्याने आज सूर्योदय दिसला नाही, पण ‘अलंग’च्या मागून सूर्य उगवल्यामुळे ‘अलंग’ची सावली पुढच्या डोंगरांवर पडून त्यांची फक्त शिखरं सूर्यकिरणांनी तांबूस झाली होती. असलं मनोहारी दृश्य पाहत सकाळचा पहिला चहा घेण्यात काय सुख आहे म्हणून सांगू! एरवी आम्हा मुंबईकरांची सकाळ ही ट्रेनमागे धावण्यात फुकट जाते.. पुन्हा तासाभरात नित्यकर्म आटोपून सकाळी सात वाजता मोर्चा वळवला मदन गडाकडे. झोप चांगली झाल्यामुळे आणि पोटात पोंची भर पडल्यामुळे ताजेतवाने वाटत होते. आणखी एक गड, मग बस्स, मोहीम फत्ते होणार!! या विचाराने पुढचा रस्ता जास्त इंटरेस्टिग वाटत होता. या मार्गावरच्या पायवाटाही चिंचोळ्या होत्या. एका ठरावीक जागी तर एकावेळी एकच पाय ठेवता येईल, अशी स्थिती होती. थोडाही तोल गेला तर दरीत नाही, डायरेक्ट ढगात!! इथं रोप आडवा बांधून त्याच्या आधाराने पुढे गेलो आम्ही. याव्यतिरिक्त, दोन रॅपिलगचे पॅच आणि एकदा रोप क्लायिबग. एकवेळ रॅपिलग परवडले पण रोप क्लायिबग नको रे बाबा. स्वत:चं वजन हातांवर सावरत रोपच्या सहाय्याने वर जाणं म्हणजे ब्रम्हांड आठवतं. सर्व पहिलटकरांची आम्ही या वेळी मजा घेत होतो. सकाळी ११ वाजता मदन गडावर पोहोचलो. इथून आजूबाजूच्या डोंगररांगा पाहताना महाराष्ट्राला साद्रीचा सखा-दगडांच्या देशा का म्हटलंय, याची प्रचिती येते. इथंही तासभर फिरून आम्ही परतीची वाट चालू लागलो. मोठमोठे कातळ असलेली दरी पार करून आंबेवाडी गावात येई तोपर्यंत संध्याकाळचे ४.३० झाले. मग पुढे टेम्पो पकडून कसारा स्टेशन गाठलं.
निघताना संमिश्र भाव होते. मनात एकीकडे ट्रेकचे दिवस सगळ्यांसोबत भरकन निघून गेले म्हणून वाईट, तर दुसरीकडे ट्रेक हॅटट्रिक पूर्ण करू शकलो म्हणून आनंदही वाटत होता. ही खरं तर स्पर्धा होती आमची, आमच्याशीच! आमच्या क्षमतांचा अंदाज घेत होतो आम्ही. ज्यातून विश्वास दुणावत होता. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून गणले जाणारे कळसुबाई शिखर आणि साद्री रांगामधले अतिशय कठीण समजले जाणारे अलंग-मदनगड अशी एकूण तीन ठिकाणं सलग दोन दिवसांत पूर्ण करण्याचं आव्हान आम्ही स्वत:लाच दिलं होतं. ते आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करू शकल्याचा आनंद शब्दातीत आहे. होय! अगदी या आणि ‘या’साठीच केला होता ‘हा’ अट्टहास आणि या अट्टहासामुळे शेवटचा ट्रेक ‘भन्नाट’ झाला.