गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांच्या बहरलेल्या कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीवरील पकड मजबूत केली.
वेलिंग्टन- गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांच्या बहरलेल्या कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीवरील पकड मजबूत केली. मधल्या फळीतील अजिंक्य रहाणेचे (११८) शतक, सलामीवीर शिखर धवनला(९८) शतकाने दिलेली हुलकावणी आणि कर्णधार महेंद्रसिंग ढोणीच्या (६८) झटपट अर्धशतकी खेळीमुळे पाहुण्यांनी पहिल्या डावात ४३८ धावा केल्या. तसेच पहिल्या डावात २४६ धावांची आघाडी घेतली. दुस-या दिवसअखेर शनिवारी सलामावीर पीटर फुल्टनला (१) लवकर गमवावे लागल्याने यजमान अडचणीत आलेत.
पहिल्या दिवसाच्या (१२ विकेट) तुलनेत दुस-या दिवशी कमी (९ विकेट) पडल्या. मात्र ३६२ धावा निघाल्या. यजमानांच्या गोलंदाजांच्या तुलनेत पाहुण्यांचे फलंदाज सरस ठरले. भारताने उर्वरित आठ विकेटच्या बदल्यात शनिवारी ७४.४ षटकांत ४.२६च्या सरासरीने ३३८ धावा फटकावल्या. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. भरीव फलंदाजीनंतर त्यानंतर न्यूझीलंडची एक विकेट घेत भारताने सामन्यावर वर्चस्व मिळवले. डावाचा मारा टाळण्यासाठी यजमानांना आणखी २२२ धावा करण्याची आवश्यकता आहे. त्यांचे नऊ विकेट अद्याप शिल्लक आहेत.
दोन बाद १०० धावांवरून पुढे खेळणा-या भारताला पकड मजबूत करण्यासाठी किमान चारशे किंवा त्याहून अधिक धावा करण्याची आवश्यकता होती. शिखर धवनने ‘नाइट वॉचमन’ इशांत शर्मासह तिस-या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करताना संघाला तिस-या दिवसाचा पहिला तास खेळून काढला. धवनने एक बाजू लावून ठेवताना शतकाच्या दिशेने कूच केली तरी ‘नव्र्हस नाइन्टीज’चा तो बळी ठरला. नवद्दीत तो थोडा उतावीळ दिसला. परिणामी धवनला शतकापासून वंचित ठेवण्यात टिम साउदीला यश आले. वास्तविक पाहता त्याच षटकात चोरटी धाव घेताना धवन बालंबाल बचावला होता. धवनने १२७ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ९८ धावांची संयमी आणि उपयुक्त खेळी केली.
कोहलीने एक बाजू सांभाळली तरी धवनपाठोपाठ दोनच षटकांनंतर रोहित शर्मा (०) परतल्याने (५ बाद १६५) भारत किती आघाडी घेणार, याबाबत साशंकता होती. मात्र सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने सहाव्या विकेटसाठी विराट कोहलीसह ६३ आणि ढोणीसह सातव्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी करताना संघाला मोठय़ा आघाडीच्या दिशेने नेले. रहाणे आणि ढोणीने प्रत्येक षटकामागे जवळपास पाच धावा काढल्या. चहापानानंतर झटपट धावा करताना दोघांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना जेरीस आणले. स्थिरावलेला कोहलीच्या (३८) अचूक चेंडूवर फसला तर ढोणीला यष्टिरक्षक बी. जे. वॉल्टिंगकरवी झेलबाद करत ट्रेंट बोल्टने शतकी भागीदारी संपुष्टात आणली.
रहाणेने पहिलेवहिले शतक झळकावतानाच रवींद्र जडेजा आणि झहीर खानसह आठव्या आणि नवव्या विकेटसाठी अनुकमे ३७ आणि ३८ धावांची भागीदारी करताना भारताला ४३८ धावांपर्यंत पोहोचवले. जडेजा (२६) आणि झहीरने (२२) ‘वनडे स्टाइल’ फलंदाजी करताना रहाणेला चांगली साथ दिली. अजिंक्यने १५८ चेंडूंत १७ चौकार आणि एका षटकारासह ११८ धावांची उल्लेखनीय खेळी केली. न्यूझीलंडतर्फे बोल्ट, साउदी आणि वॅग्नर या वेगवान त्रिकुटाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. नीशॅमला एक विकेट मिळाली. वॉल्टिंगने यष्टय़ांमागे झेल घेण्याचा सपाटा कायम ठेवताना पाच झेल घेतले.
एका डावात पाच झेल घेणारा वॉल्टिंग यजमानांचा तिसरा यष्टिरक्षक आहे. त्याने रॉय हरफर्ड (वि. भारत, १९६७-६८) आणि वॉरेन लीस (वि. श्रीलंका, १९८२-८३) यांच्यात स्थान मिळवले. मात्र ऑकलंड आणि वेलिंग्टन अशा सलग कसोटीत एका डावात पाच झेल टिपणारा वॉल्टिंग न्यूझीलंडचा पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. विद्यमान कसोटी मालिकेत १४ झेल घेत त्याने भारताविरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम केलाय. वॉल्टिंगने इयन स्मिथ यांना मागे टाकलेय.
न्यूझीलंड : पहिला डाव – १९२. दुसरा डाव – १ बाद २४.
भारत : पहिला डाव (२ बाद १०० वरून पुढे) शिखर धवन झे. वॉल्टिंग गो. साउदी ९८, इशांत शर्मा झे. वॉल्टिंग गो. बोल्ट २६, विराट कोहली झे. रुदरफर्ड गो. वॅग्नर ३८, रोहित शर्मा त्रि. गो. नीशॅम ०, अजिंक्य रहाणे झे. बोल्ट गो. साउदी ११८, महेंद्रसिंग ढोणी झे. वॉल्टिंग गो. बोल्ट ६८, रवींद्र जडेजा झे. फुल्टन गो. वॅग्नर २६, झहीर खान झे. वॉल्टिंग गो. वॅग्नर २२, मोहम्मद शामी नाबाद ०, अवांतर – २१ (लेगबाइज ८, लेगबाइज ४, वाइड ७ नोबॉल २), एकूण : १०२.४ षटकांत सर्वबाद ४३८ धावा.
बादक्रम : १-२, २-८९, ३-१४१, ४-१६२, ५-१६५, ६-२२८, ७-३४८, ८-३८५, ९-४२३, १०-४३८.
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट २६-७-९९-३, टिम साउदी २०-०-९३-३, नील वॅग्नर २२.४-३-१०६-३, कोरी अँडरसन १६-२-६६-०, जिमी नीशॅम १८-२-६२-१.
कसोटी शतक ठोकणारा ७६वा फलंदाज
वेलिंग्टनच्या बसिन रिझव्र्हच्या खेळपट्टीवर शतक ठोकणारा अजिंक्य रहाणे भारताचा ७६वा फलंदाज ठरला. न्यूझीलंडआधी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौ-यातील दुस-या कसोटीत (डर्बन) त्याला पहिले शतक झळकावण्याची संधी होती. मात्र दुस-या डावात ९६ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात अजिंक्यने नाबाद ५१ धावांची खेळी केली होती.
अजिंक्यने मानले तेंडुलकर, द्रविडचे आभार
पहिल्यावहिल्या शतकानंतर अजिंक्य रहाणेने विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह त्याचा ‘रोल मॉडेल’ आणि महान फलंदाज राहुल द्रविडचे आभार मानले. ‘‘लहानपणापासून मी द्रविडचा चाहता आहे. तो माझा आदर्श आहे. भारतीय संघात त्याच्याबरोबर खेळण्याचे मला भाग्य लाभले. त्यानंतर आयपीएलमध्येही आम्ही एकत्र खेळलो. द्रविडची फलंदाजी आणि कारकीर्द आदर्शवत आहे. त्याच्याकडून मैदानाबाहेरही मला खूप काही शिकायला मिळाले. सचिनचेही मार्गदर्शन मला लाभले आहे. कारकीर्दीतील शेवटच्या दोन कसोटींदरम्यान सचिनने मला फलंदाजीच्या अनेक महत्त्वपूर्ण ‘टिप्स’ दिल्या. द्रविड आणि तेंडुलकर या दोन फलंदाजांनी घेतलेले परिश्रम तसेच त्यांची खेळाप्रति असलेली निष्ठा आणि त्यांची तंदुरुस्ती या सर्व गोष्टी मला अंगी बाणवायला आवडतील. वेळो वेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी दोघांचाही आभारी आहे,’’ असे रहाणेने शनिवारी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डर्बन कसोटीत अजिंक्यचे शतक चार धावांनी हुकले. मात्र न्यूझीलंडमध्ये पहिले शतक ठोकता आल्याने तो भारावला आहे. ‘‘पहिल्या शतकानंतर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला कळत नाही. कसोटी शतक हे नेहमीच ‘स्पेशल’ असते. मात्र कारकीर्दीतील पहिले शतक मला कायम स्मरणात राहील. शनिवारी भारतासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. गोलंदाज सातत्य राखतील, असा मला विश्वास वाटतो. भारत जिंकला तर शतकाचे मोल अधिक असेल,’’ अजिंक्यने म्हटले.