‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांचा खिसा मात्र रिकामा करत आहे.
नवी दिल्ली – ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांचा खिसा मात्र रिकामा करत आहे. एक जून म्हणजे आजपासून १४ टक्के सेवा कर लागू झाल्याने सर्वसामान्यांची जीवनशैली महाग झाली आहे.
आजपासून बाहेर खाणे, संपत्ती खरेदी करणे, हॉटेलमध्ये मुक्काम करणे, प्रवास, मोबाईल बिल, विमा पॉलिसी महाग झाली आहे. १२.३६ टक्के असणारा सेवा कर मोदी सरकारने १४ टक्के केला आहे.
एचआरएडब्लूआय या हॉटेल चालकांच्या संघटनेचा सेवा कर वाढीला विरोध आहे. यामुळे हॉटेलमध्ये खाणे महागले असून, याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भिती व्यक्त केली आहे. ग्राहकांवर ही दरवाढ लादण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. केंद्र सरकार नागरीकांना चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापासून रोखत असून, त्यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे ढकलत आहे असे मत काही हॉटेलमालकांनी व्यक्त केले.
बांधकाम क्षेत्रानेही या सेवाकर वाढीवर टीका केली आहे. सरकार परवडणा-या घराचा मुद्दा मांडते पण दुस-या बाजूला करवाढ करते. अनेक प्रकारचे कर भरल्यानंतर आम्ही परवडणारी घरे कशी बांधायची ? असा सवाल विकासकांनी केला.
पर्यटन क्षेत्रालाही या वाढत्या सेवाकराचा फटका बसला आहे. आधीच पर्यटनस्थळे महाग झाली आहेत आणि अशा दरवाढीमुळे परिस्थिती अधिकच वाईट बनतेय असे मत एका पर्यटन संस्थेच्या प्रमुखाने व्यक्त केले. सेवाकर वाढीला नेहमीच सर्व क्षेत्रांनी विरोध केला आहे. सेवाकर वाढीमुळे ग्राहकांवर भार वाढतो आणि त्याचा व्यवसाय वृध्दीवर परिणाम होतो.