ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब जनतेला कमी दरात धान्य पुरवठा करणा-या नव्या अन्न सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.
रत्नागिरी – ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब जनतेला कमी दरात धान्य पुरवठा करणा-या नव्या अन्न सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. या नव्या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुमारे साडेअकरा लाख लोकांना मिळणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी दिली.
अंत्योदय आणि दारिद्रय़रेषेखालील पिवळय़ा कार्डधारकांसाठीच्या पूर्वीच्या योजना सुरूच राहणार आहेत. त्यांचा या नव्या योजनेत समावेश करण्यात आलेला नसून, केशरी कार्डधारकांसाठी अन्न सुरक्षा विधेयकानुसार कमी दरात धान्य पुरवठा केला जाणार असल्याचेही जाधव म्हणाले.
अंत्योदय व दारिद्रय़रेषेखालील पिवळय़ा कार्डधारकांना २ रुपयांत गहू तर ३ रुपयांत तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे. आता केशरी कार्डधारकांना नव्या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. ग्रामीण भागातील ज्या केशरी कार्डधारकाचे उत्पन्न ४४ हजारांच्या आत आहे आणि शहरी भागातील उत्पन्न ५९ हजारांच्या आत आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेत सामावून घेतले जाणार असल्याचे जाधव म्हणाले.
२०११ मध्ये बोगस कार्डधारकांविरोधात मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले होते. त्यात उत्पन्नाची माहिती सादर करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्या अर्जातील उत्पन्न विचारात घेऊन या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.