नवी दिल्ली – देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बुधवारी जाहीर केले. मतमोजणी २० जुलै रोजी होणार आहे.
राष्ट्रपतीपदासाठी १४ जूनपासून अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ जून आहे. २९ जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. १ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान होईल. २० जुलै रोजी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
भारताचे सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, ही निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी खासदारांनी संसदेमध्ये; तर आमदारांनी त्यांच्या राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. याशिवाय, आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्यांना १० दिवसांची नोटीसही देता येईल, असे झैदी यांनी सांगितले. तसेच १० दिवसांची नोटीस दिल्यास कोणत्याही राज्यातील आमदारास दिल्लीमध्येही मतदान करता येणार आहे. या निवडणुकीनंतरची मतमोजणी अर्थातच राजधानीमध्ये केली जाईल. निवडणूक आयोगाच्या या औपचारिक घोषणेनंतर विविध राजकीय पक्षांकडून आता राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेस निश्चितच वेग येईल, असे मानले जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत ७७६ खासदार व सर्व राज्यांतील मिळून ४१२० आमदार मतदान करणार आहेत. आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य १०,९८,८८२ इतके आहे. देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी आहे. ७७६ खासदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४०८ आहे. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान ५ लाख ४९ हजार ४४१ मतांची आवश्यकता आहे.