भारतात २०१७ पर्यंत जीडीपी वाढीचा दर आठ टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.
वॉशिंग्टन- इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ८० टक्के आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा फायदा मिळणार आहे. यामुळे विकास प्रक्रियेला वेग येऊन २०१७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ८ टक्के विकासदर गाठेल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेमुळे दक्षिण आशियाच्या विकासाला चालना मिळेल, असेही बँकेने म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्के विकासदर राखेल, असे सांगतानाच २०१६ ते २०१८ या तीन आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूक १२ टक्के दराने वधारेल, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. देशामध्ये बाजारपेठआधारित विकासाचे गुंतवणूकआधारित विकासाकडे संक्रमण सुरू झाले आहे. त्याच वेळी चीनचा मात्र उलट दिशेने प्रवास सुरू झाला असल्याचे अर्ध-वार्षिक अहवालात बँकेने नमूद केले आहे. वर्षभरात दोनदा प्रसिद्ध होणा-या साऊथा एशिया इकॉनॉमिक फोकस अहवालामध्ये २०१५तील ७ टक्के विकासदरावरून २०१७ मध्ये ७.६ टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला आहे.
परदेशातून पैसे हस्तांतरात भारत अव्वल
परदेशातून होणा-या पैसे हस्तांतराच्या बाबतीत भारताने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. जगभरात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी २०१४मध्ये ७० अब्ज डॉलर भारतात पाठवल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. याबाबतच्या अहवालामध्ये युरोपमधील मंदी, रशियाच्या अर्थव्यवस्थेतील पेच आणि युरो, रुबलचे अवमूलन यामुळे अनेक कर्मचारी आणि व्यावसायिकांना मायदेशी परतावे लागत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, २०१५मध्ये विकसनशील देशांमध्ये होणा-या पैसे हस्तांतराचा आकडा ४४० अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज बँकेने वर्तवला आहे. भारतापाठोपाठ चीन, फिलिपिन्स, मेक्सिको आणि नायजेरिया पैसे हस्तांतरात आघाडीवर आहेत. २०१४मध्ये एकूण हस्तांतर ५८३ अब्ज डॉलरवर पोहोचल्याचे बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू म्हणाले.