जोवर देशपांडे आणि धुरी यांना अटक होत नाही तोवर महापालिकेचा एकही अभियंता काम करणार नाही, असा इशारा कृती समितीने दिला आहे.
मुंबई- मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नाहीत म्हणून मनसेच्या नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांना खड्ड्यात उभे करून आंदोलन केले. या आंदोलनाच्या निषेधार्थ ४२०० अभियंत्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ११३० अभियंत्यांनी सामूहिक राजीनाम्यांचे निवेदन गुरुवारी महापालिका आयुक्तांना सादर केले; परंतु हे राजीनामे आयुक्तांनी फेटाळले. जोवर देशपांडे आणि धुरी यांना अटक होत नाही तोवर महापालिकेचा एकही अभियंता काम करणार नाही, असा इशारा कृती समितीने दिला आहे. या अभियंत्यांना चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी पाठिंबा दिला असून शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने महापालिकेचे कामकाज ठप्प केले जाणार आहे.
मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांना ‘मीच या खड्डय़ांना जबाबदार आहे’ असा फलक हातात देऊन रस्त्यात उभे केले. दराडे यांच्या मानहानीनंतर महापालिकेचे अभियंते एकवटले.
आपल्या एकजुटीचे प्रदर्शन बृहन्मुंबई महापालिका अभियंता कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत सकाळी वरळी येथील ‘इंजिनीअरिंग हब’ येथे निदर्शने केली. त्यानंतर दुपारी सर्व अभियंत्यांनी मुख्यालयावर मोर्चा आणत १३१० अभियंत्यांच्या सामूहिक राजीनाम्याचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले; परंतु हे राजीनामे न स्वीकारता, संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले. परंतु यामुळे त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे अभियंत्यांनी जोवर त्यांना अटक होत नाही तसेच त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द केले जात नाही, तोवर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या २४ प्रभागांसह सर्व विभागांच्या तसेच कापूरबावडी, मध्य वैतरणा येथील अभियंत्यांनी याचा निषेध म्हणून शुक्रवारपासून हे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अभियंता कृती समितीचे सुखदेव काशिद, साईनाथ राजाध्यक्ष यांना म्युनिसिपल सफाई कामगार संघटनांचे महाबळ शेट्टी आणि रमाकांत बने यांनीही पाठिंबा देऊन हे आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात जल विभागाचे कामगार सहभागी होणार नाही. मुंबईकरांना वेठीस धरण्याचा विचार नाही. पण लोकप्रतिनिधींना धडा शिकवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर आयुक्तांना खड्डयात उभे करू-संदीप देशपांडे
मुंबईतील खड्डे जर आमच्या राजीनाम्याने किंवा नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे बुजणार असतील तर आम्ही आमच्या पदाचा राजीनामे देऊ. पण खड्डे बुजून नागरिकांचा त्रास कमी व्हायला हवा. त्यामुळे आम्ही दहा दिवसांची मुदत प्रशासनाला देत आहोत. जर या कालावधीत प्रशासनाने मुंबईतील खड्डे न बुजवल्यास त्या खड्डयांमध्ये महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना उभे करू, असा इशाराही मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी दिला आहे.
खड्डयांचे फोटो भेट देऊ-अहिर
मुंबईतील रस्त्यांवर ३५ खड्डे हे हास्यास्पद आहे. परळच्या पुलावरच ५०हून अधिक खड्डे आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस आम्ही वाट पाहणार असून मुंबईतील सर्व खड्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोजले जाणार आहेत. यातील शेवटचा खड्डा ज्या क्रमांकाचा असेल त्याचे फ्लेक्स बनवून ते आयुक्तांना भेट दिले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.