भारताचा कर्णधार विराट कोहलीसह १०० भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयने नोक-या सोडण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली- भारताचा कर्णधार विराट कोहलीसह १०० भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयने नोक-या सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नोक-या न सोडल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा इशाराही बीसीसीआयने दिला आहे.
‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’मुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंना त्या-त्या नोक-या सोडण्यास सांगा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला होता.
त्यानुसार क्रिकेट प्रशासक समितीने कोणताही क्रिकेटर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे कोणतेही पद भूषवणार नाही, असे बोर्डाला स्पष्ट शब्दात सांगितले होते.
त्यामुळे बीसीसीआयने कोहलीसह अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, इशांत शर्मा यांच्यासह, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या जवळपास १०० भारतीय क्रिकेटपटूंना नोकरी सोडण्याचा आदेश दिला आहे.
‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’च्या मुद्द्यावरुन यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यासारखे दिग्गजांनाही अडचणीचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर आता विराट कोहलीचा नंबर आला आहे. बीसीसीआयने कोहलीला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी)चे मॅनेजरपद सोडण्याचे आदेश दिले आहेत.