मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला अजून चार महिने शिल्लक राहिलेत. महापालिका प्रभागांची रचना, आरक्षण जाहीर व्हायचे आहे. तेही येत्या महिन्याच्या पहिल्या- दुस-या आठवडयात होईल.
प्रभागरचना आणि आरक्षण एकदा जाहीर झाले की निवडणुकीची धामधूम सुरू होईल. या माध्यमातून निवडणुकीची तोफ डागली जाणार आहे. त्यानंतर जे काही होईल त्या आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून फोडले जाणारे राजकीय फटाके आणि अॅटमबॉम्बचा आवाज आपल्याला अनुभवायला मिळेलच. पण यंदाची निवडणूक ही इतर महापालिका निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी असेल, असे न राहून आम्हाला सारखे, सारखे वाटते.
युद्धाची तयारी करताना ज्याप्रमाणे दोन्ही देश शस्त्र, दारूगोळा साठा जमा करून ठेवतात तसेच निवडणुकीच्या प्रचारात प्रतिस्पध्र्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना-भाजपासह काँग्रेस, मनसेनेही आपल्याकडे साठा करून ठेवला आहे. कोणत्या शस्त्राचा आणि दारूगोळ्याचा कधी वापर करून प्रतिस्पर्ध्याला चित करायचे याची सारी रणनिती निश्चित झालेली आहे. फक्त प्रतीक्षा राहिलेली आहे ती म्हणजे प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर करून निवडणुकीच्या प्रारंभाचे बिगूल वाजवले जाण्याची.
निवडणुकीचा शंखनाद व्हायचा असला तरी मुंबईत निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. एखादा चित्रपटाचे मार्केटिंग हे त्याच्या प्रोमोज अथवा ट्रेलरच्या माध्यमातून केले जाते. तसेच वातावरण भाजपाकडून तयार केले जात आहे. महापालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण त्याच दिवशी खार रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण आणि वांद्रे भाभा रुग्णालयातील बायोगॅस प्रकल्प आदींचेही उद्घाटन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. पार्ले-जी बिस्कीटच्या पाकिटावर ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे एकाच बाळाचा फोटो पाहायला मिळतो तसेच या महापालिका विकासकामांचे झाले आहे.
शिवसेनापक्षप्रमुख आणि महापौर यांचेच चेहरे पाहायला मिळतात. तो बदल शनिवारी पाहायला मिळाला. उद्घाटन करणारे चेहरे बदलले होते. आता ही उद्घाटने अधिकृत की अनधिकृत यावर चर्चा होईल. किंबहुना ते बरोबर की चूक याचीही विचारणा होईल. परंतु निवडणूक म्हटली म्हणजे आपली खेळीच खेळावी लागते. फासे बदलावे लागते. तेच भाजपा करत आहे. भाजपाच्या खेळीपुढे शिवसेनेचे नेते हतबल झाले आहेत.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही महापौर आणि त्यांच्या सहका-यांना महापालिका विकास निधीतून तयार झालेल्या जलतरण तलावाच्या उद्घाटनाची कल्पना नसावी. यावर कुणी विश्वास ठेवावा. सरकार आणि महापालिका यांच्यामध्ये प्रशासन म्हणून आयुक्त दुवा आहेत. त्यांना याची कल्पना नाही असे कसे म्हणता येईल. आयुक्तांनी याची कल्पना महापौरांना कशी दिली नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘महापौर क्या चिज है,’ असे जर या आयुक्तांना वाटत असेल तर अशा आयुक्तांना त्यांनी घरचा रस्ता दाखवायला हवा. महापौरपद हे कुणा व्यक्तीचे मालकीचे पद नाही.
किंबहुना ते साधेही पदही नाही. ते या शहराचे सर्वोच्चपद आहे. मुख्यमंत्री हे नगरविकास खात्याचे प्रमुख असले तरी महापौरही या शहराचे मुख्यमंत्रीच आहेत. त्यांना अधिकार नसले तरी मान-सन्मान आहे. त्यामुळे महापौरांना डावलायचे आणि आपल्या पक्षाच्या उपमहापौरांना सोबत घेऊन उद्घाटन करत फिरायचे असे जर भाजपाला वाटत असेल तर एका घाणेरडया राजकारणाला ते जन्माला घालत आहेत. याचा शेवट काय होईल याचा जरी विचार आता केला नाही, तरी तो सर्वच राजकीय पक्षांसाठी घातकच आहे. कारण आज भाजपा सत्तेवर आहे. सत्तेच्या अमरत्वाचा आशीर्वाद घेऊन ते काही जन्माला आलेले नाही. आज ना उद्या सत्तेवरून पायउतार व्हावेच लागेल. मग आपण केलेल्या चुकांचे प्रायश्चित करत या सर्वाची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
राजशिष्टाचार न पाळत मुख्यमंत्र्यांनी आपला अपमान केल्याची उघडपणे नाराजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केली. तसे लेखी पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले. महापौरांनी व्यक्त केलेली नाराजी योग्य असली तरी ज्याप्रकारे या पत्रामध्ये भाषा वापरण्यात आली आहे, ती भाषा योग्य नाही. मुळात राज्यात भाजपा-सेनेचीच सत्ता असताना तुमच्याच मुख्यमंत्र्यांकडून जर महापौरांचा अपमान केला जात असेल तर दाद कुणाकडे मागणार आणि बोंब कुणाच्या विरोधात ठोकणार, हा प्रश्न होता.
कालपर्यंत काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी महापौरांचा कधीही अशाप्रकारे अपमान केला नाही. तो अपमान भाजपाकडून केला गेला. त्यामुळे ‘दिलदार मित्रापेक्षा कपटी शत्रू बरा’ असे म्हणण्याची वेळ महापौरांवर आली असेल. भाजपाचा कपटीपणा हा आजचा नाही. विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ते दाखवून दिले. नव्हे तर त्यांचा कपटीपणा प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे. महापौरांचा जर अपमान झाला तर त्याचे एक मुंबईकर म्हणून कुणीही समर्थन करणार नाही.
परंतु जेव्हा महापौरांना अपमान होण्याची जाणीव होते, तेव्हा मग इतर विकासकामांमध्ये स्थानिक नगरसेवक हा त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असायला हवा. ते अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून स्थानिक नगरसेवकाला बाजूला सारले जाते, तेव्हा त्या नगरसेवकांचा अपमान नाही का? दहिसरच्या जलतरण तलावासाठी तत्कालीन शिवसेना नगरसेवक सुजाता उदेश पाटेकर आणि तत्कालीन आमदार विनोद घोसाळकर यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज हे जलतरण तलाव उभे राहिले आहे. त्यामुळे ज्याच्या कामाचे श्रेय त्याच व्यक्तीला जायला हवे, ही सर्वसाधारण भावना आहे.
पाच उद्यानांच्या विकासकामांच्या उद्घाटनातही अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करत स्थानिक काँग्रेस नगरसेविका नयना शेठ यांना बाजूला सारले होते, तेव्हा त्यांचा अपमान झाला नव्हता का? आजही ज्या कामांची उद्घाटने आणि भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते किंवा अन्य मंत्र्यांच्या हस्ते होतात, तिथे महापौर उपस्थित असल्यास त्याच कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतात. त्यामुळे स्थानिक नगरसेवकाला कार्यक्रमाचे अध्यक्षपद मिळत नाही.
मग अशा विकासकामांमध्ये ज्या ज्या नगरसेवकांना अध्यक्षपद मिळाले नाही, त्यांचा अपमान झाला नाही. अपमान आणि राजशिष्टाचाराच्या गप्पा महापौर म्हणून स्नेहल आंबेकर यांनी मारू नये. ज्यावेळी तुम्ही समोरच्याला मान द्याल, तेव्हाच समोरचा तुम्हाला मान देईल. त्यामुळे भाजपाकडून किंबहुना मुख्यमंत्र्यांकडून पदाला नसला तरी स्नेहल आंबेकर म्हणून मान दिला नाही. याला कारण तुमचा स्वभावधर्म हाच आहे. मागील तीन महिन्यांपूर्वीचे जर उदाहरण घेतले तर वरळी आगाराच्या विकासकामाचे उद्घाटन युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्थानिक शिवसेना नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी हे उद्घाटन करताना बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांना निमंत्रित केले नाही. मग हा बेस्ट समितीचा अध्यक्षांचा अपमान नव्हता का? महापौरांनी हे पत्र लिहून एकप्रकारे चूकच केली आहे. यापूर्वी रस्ते कंत्राट कामांची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहून त्यांनी अशीच खळबळ माजवून दिली होती.
आता पुन्हा अपमानाबाबत पत्र लिहिल्यामुळेही खळबळ माजली आहे. पण या पत्रातील मजकुराला खुद्द महापौर, त्यांचे महापालिकेतील नेते किंवा पक्षाचे प्रमुख सहमत आहे का? की पुन्हा एकदा गेम केला जाणार आहे. शिवसेनेच्या कुठल्या प्रधानाच्या सांगण्यावरून महापौरांनी हे पत्र लिहिले हे उघडच होईल. पण हा लेटरबॉम्ब त्यांच्या अंगावर उलटला नाही म्हणजे पावले.
शिवसेना-भाजपाची युती होईल की नाही याबाबत ज्योतिषवेत्त्यांची आकडेमोड चालू आहे. या दोन्ही पक्षातील कुंडल्यांचा अभ्यास पंडित मंडळी करत असली तरी कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या भाजपाने दोन्ही शक्यता लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळेच रस्ते, नालेसफाई, टँकर आदी घोटाळे बाहेर काढून अप्रत्यक्ष सत्ताधारी शिवसेनेच्या चेहऱ्यावर काळे फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांची प्रतिमा जेवढी मलिन करता येईल, तेवढा प्रयत्न मुंबई भाजपाचे अध्यक्ष शेलार यांच्याकडून सुरू आहे.
पण आता विकासकामांचीही उद्घाटने स्वत:च करून शिवसेनेला डिचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम शेलार करत आहेत. त्यामुळे युती झाली काय किंवा नाही झाली काय? आज आरोप करून शिवसेनेला डॅमेज करायचेचा हाच छुपा अजेंडा आहे. त्यातूनच भाजपाची रणनिती चालू आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना आज वाटतेय की युती व्हावी म्हणून. पण जेव्हा प्रत्यक्ष जागा वाटपांची चर्चा होईल, तेव्हाच युतीचा निर्णय घेतला जाईल.
युती झाली तरीही आरोप करून भाजपाकडून शंभरहून अधिक जागा खिशात घालणार आहे. युती झाली नाही तर २२७ जागांवर उमेदवार उभे करायला मोकळे. स्वतंत्र लढायचे. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करायचे आणि निवडणुकीत सत्तेसाठी पुन्हा स्वत:चे कल्याण करून घ्यायचे आहे. युती नाही झाली तर शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी फोडायचे आणि युती झाली तर केवळ काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक फोडायचा हीच भाजपाची खेळी आहे.
निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागांचा स्वतंत्र मॅप तयार करताना उमेदवारांच्या याद्याही तयार करून ठेवल्या आहे. युती होऊ नये अशी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची इच्छा असली तरी मुख्यमंत्र्यांसह अनेकांना वाटते युती व्हावी. कारण जास्त जागा पारडयात पाडून घेऊन जास्त उमेदवार निवडून आणत आपला महापौर बसवण्याची स्वप्ने मुख्यमंत्र्यांसह इतर धुरिणांची आहेत. पण स्वतंत्रपणे लढून जास्त जागा एकहाती सत्ता आणण्याचीही स्वप्न बघितली जात आहेत.
इतर महापालिकांचा विचार करता युती करण्याशिवाय भाजपापुढे पर्याय नाही. तरीही इतर महापालिकांच्या तुलनेत मुंबई महापालिका सर्वाच्या बरोबरीची असल्यामुळे ही एकच महापालिका ताब्यात आली तरीही चालेल, असाही तर्क लढवला जात आहे. कल्याण-डोंबिवलीत जे झाले तेच पुन्हा मुंबईत घडवून काँग्रेस-मनसे आणि राष्ट्रवादीचे सूप वाजवण्याचा विचार आहे. त्यामुळे काँग्रेस-मनसे, सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पेटून उठवण्याची गरज आहे.
प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याची गरज आहे. सेना-भाजपाच्या लढाईकडे न पाहता याकडे दुर्लक्ष करूनच या पक्षांना पुढे जावे लागेल. दोन्ही पक्षांनी कितीही एकमेकांवर आरोप केले तरी त्यांना महत्त्व न देता महागाई आणि विकासकामांमधील भ्रष्टाचार याचाच समाचार घेत महापालिकेतील या दोन्ही पक्षांना उघडे पाडायची गरज आहे.
भाजपा, काँग्रेससह प्रादेशिक पक्षांना संपवायची स्वप्न पाहत आहे. त्यामुळे याच भाजपा विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची गरज आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढणे म्हणजे भाजपाची स्वप्ने साकार करणे असेच ठरेल. त्यामुळे भाजपापुढे संपायचे की त्यांनाच पुरून उरायचे हे आता विरोधी पक्षांनीच ठरवायला हवे. यावर विरोधी पक्ष विचार करतील का?
——————————–