महाड दुर्घटनेत दुस-या दिवशीही एनडीआरएफ पथके, नौदल आणि तटरक्षक दलातर्फे शोधमोहिम सुरु असून आतापर्यंत १४ मृतदेह सापडले आहेत.
महाड- महाड दुर्घटनेत दुस-या दिवशीही एनडीआरएफ पथके, नौदल आणि तटरक्षक दलातर्फे शोधमोहिम सुरु असून आतापर्यंत १४ मृतदेह सापडले आहेत.
बुधवारी सायंकाळी उशीरा मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळपासूनच बचावपथकातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) पथके, नौदल आणि तटरक्षक दलाने स्थानिक गावकरी आणि मच्छिमार यांच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
महाडच्या सावित्री नदीचा पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह गुरुवारी ३२ तासांनी सापडण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सायंकाळपर्यंत ३० पेक्षा जास्त बेपत्ता प्रवाशांपैकी १३ मृतदेह हाती लागले आहेत. या नदीत पडलेल्या दोन एसटी बस आणि दोन खासगी वाहनांपैकी एकही वाहन सापडलेले नाही. या सर्व मृतांच्या वारसांना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नौदल, तटरक्षक दल, पोलीस, एनडीआरएफच्या तपासात १३ मृतदेह सापडले. यात रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले येथे एसटी चालकाचा, हरिहरेश्वर येथे एका महिलेचा, महाड तालुक्यातील केंबुर्लीजवळ एक, म्हाप्रळ गावाजवळ दोन, दादली भागात एका तरुणाचा मृतदेह सापडला.
मात्र एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि इतर खासगी वाहनांचा थांगपत्ता लागू शकला नाही. मंगळवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष (एनडीआरएफ) व तटरक्षक दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर शोधकार्य हाती घेतले. यासाठी जिवाची बाजी लावून महाड खाडीपट्टा, म्हाप्रळ, आंबेत, हरिहरेश्वर ते अगदी रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्लेपर्यंत काहीशे किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत दुर्घटनेतील १४ जणांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफ आणि तटरक्षक दलाच्या जवानांना यश आले आहे. पूर ओसरत नसल्याने शोध मोहिमेत अडचणी निर्माण होत आहेत.
महाड दुर्घटनेत ३८ जण बेपत्ता
सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३८ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. बसमधील १८ प्रवासी, २ चालक, २ वाहक, तवेरातील आठ जण आणि खासगी वाहनाने जाणारे अन्य आठ जण असे ३८ जण बेपत्ता असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
लोहचुंबकाचा प्रयोग फसला
बेपत्ता झालेली वाहने शोधण्यासाठी बचाव पथकाने बुधवारी सुमारे ३०० किलोचे लोहचुंबक सावित्री नदीत सोडून शोध घेण्याचा प्रयत्न केला. या चुंबकाने आधी एक पत्रा बाहेर काढला. त्यामुळे एखादे वाहन यात अडकण्याची अपेक्षा होती. मात्र क्रेनचा रोप कमी क्षमतेचा असल्याने गुरुवारी सकाळी नव्या साधनांसह हे चुंबकावर घेण्यात आले. मात्र त्याच्यासह काहीही वर आले नाही.
व्हीआयपींच्या दौ-यांमुळे मदतकार्यात अडथळे
राज्यातील अनेक मंत्री व व्हीआयपींनी बुधवार व गुरुवारी महाडकडे धाव घेतली. त्यांच्या सुरक्षेसाठी एकमेव सुरू असलेल्या पुलाची वाहतूकही बंद केली जात होती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-यांचे प्रचंड हाल झाले. शिवाय मदतकार्यात मग्न सरकारी अधिका-यांनाही काम सोडून मंत्री, व्हीआयपींना माहिती द्यावी लागत होती.
हेलिकॉप्टरच्या फे-या वाया
वाहून गेलेल्या गाडय़ा व प्रवाशांच्या शोधासाठी बुधवार व गुरुवारी नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मात्र त्यांच्या हाती काहीएक लागले नाही. केंबुर्लीजवळ त्यांना एक मृतदेह वाहून जाताना दिसला. त्यावेळी हेलिकॉप्टर खाली आणण्यात आले. मात्र त्यांना मृतदेहापर्यंत पोहोचता न आल्याने हा मृतदेह दासगावपर्यंत वाहून गेला.
जयगड-मुंबई एसटीतील प्रवासी
एस. एन. कांबळे (चालक), व्ही. के. देसाई (वाहक), अविनाश सखाराम मापक, प्रशांत माने, सुरेश नेमाजी सावंत, सुनील बैकर, स्नेहल बैकर, धोंडू बाबाजी कोकरे, भूमी भूषण पाटील, अनिष संतोष बलेकर, जितेश जैतापकर.
राजापूर-बोरिवली एसटीतील प्रवासी
जी. एस. मुंढे (चालक), प्रभाकर शिर्के (वाहक), जे. एस. बाने, बाळकृष्ण बाथ्या करक, भिकाजी रामचंद्र वाघजरे, विजय विश्रांम पंडीत, विनीता विश्राम पंडीत, आवेश अल्ताफ चौगुले, असिफ अहमद चौगुले.
तवेरा गाडीतील प्रवासी
दिलीप रामचंद्र वीर (चालक), रंजना (संपदा) संतोष वाझे (४५), संतोष सीताराम वाझे (५०), दिनेश सखाराम कांबळे (४०), आदिनाथ यशवंत कांबळे (५०), दयाराम भागोजी मिरगल (५५), जयवंत सखाराम मिरगल (४०), रमेश सखाराम मिरगल (४५), शेवंती सखाराम मिरगल (६५).
हे सर्व प्रवासी गुहागरजवळील जांभारी गाव व घाटकोपरचे राहणारे आहेत. संपदा वाझे या घाटकोपरहून जांभारी येथे त्यांच्या आजारी वडिलांना पाहण्यासाठी आल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी ते मुंबईला परत निघाले होते.
आत्तापर्यंत सापडलेले मृतदेह
श्रीकांत एन. कांबळे (एसटी चालक), शेवंती सखाराम मिरगल (तवेरातील प्रवासी), रंजना (संपदा) संतोष वाझे (तवेरातील प्रवासी), आवेश अल्ताफ चौगुले (एसटी प्रवासी), पांडुरंग बाबू घाग (एसटी प्रवासी), प्रशांत माने (एसटी प्रवासी), प्रभाकर शिर्के (एसटी वाहक), स्नेहल सुनील बैकर (एसटी प्रवासी), सुनील शंकर बैकर (एसटी प्रवासी), रमेश गंगाराम कदम (एसटी प्रवासी), अनीष संतोष बलेकर (एसटी प्रवासी).
बेपत्ता प्रवाशांचा आकडा वाढणार?
अपघातग्रस्त झालेल्या दोन एसटी बसमधून आरक्षण करून प्रवास करणा-या प्रवाशांची यादी एसटी महामंडळाने जाहीर केली आहे. मात्र बसमध्ये काही प्रवासी ऐनवेळी आलेले असू शकतात. अशा प्रवाशांच्या नातेवाईकांनी एसटी प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे बेपत्ता प्रवाशांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सापडलेले मृतदेह
१) श्रीकांत एन. कांबळे (एसटी चालक)
२) शेवंती सखाराम मिरगल (तवेरातील प्रवासी)
३) रंजना (संपदा) संतोष वाझे (तवेरातील प्रवासी)
४) आवेश अल्ताफ चौगुले (एसटी प्रवासी)
५) पांडुरंग बाबू घाग (एसटी प्रवासी)
६) प्रशांत माने (एसटी प्रवासी)
७) प्रभाकर शिर्के (एसटी वाहक)
८) स्नेहल सुनील बैकर (एसटी प्रवासी)
९) सुनील शंकर बैकर (एसटी प्रवासी)
१०) रमेश कदम (एसटी प्रवासी)
११) अनीष संतोष बलेकर (एसटी प्रवासी)
याव्यतिरिक्त सापडलेल्या तीन मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.