एरवी लडाखमध्ये घुसखोरी करणा-या चिनी सैन्याने उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.
नवी दिल्ली- भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत. एरवी लडाखमध्ये घुसखोरी करणा-या चिनी सैन्याने उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच चिनी हेलिकॉप्टरने भारताच्या हवाई सीमेचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. भारत व चीनचे सैनिक एक तासभर एकमेकांवर समोर उभे होते. भारतीय सैनिकांनी हटकल्यानंतर चिनी सैनिक पुन्हा आपल्या हद्दीत गेले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी बाराहोती भागात ही घटना घडली. या भागात भारताच्या सुरक्षा चौक्या आहेत. याद्वारे भारत-चीनदरम्यानच्या ३५० किलोमीटर सीमेचे संरक्षण केले जाते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक बाराहोती भागात घुसले. ही बाब इंडो-तिबेट सीमा पोलीस व उत्तराखंड सरकारच्या अधिका-यांनी प्रत्यक्षात पाहिली. या चिनी सैन्याने या भारतीय कर्मचा-यांना हटकले. हा भूभाग आमचा असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर काही वेळाने चिनी हेलिकॉप्टर या भागात घुसले. जवळपास पाच मिनिटे ते भारतीय हद्दीत होते. त्यानंतर ते चिनी हद्दीत गेले. या हेलिकॉप्टरने या परिसरात टेहळणी करून छायाचित्रे काढली आहेत. आयटीबीपीच्या अधिका-यांनी या घटनेची माहिती केंद्रीय गृहखात्याला दिली आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या मध्यवर्ती भागात बाराहोती येथे सुरक्षा चौकी आहे. बाराहोती हा ८० चौरस किलोमीटरच्या या विवादास्पद भागात कोणीही सैन्य ठेवू नये, असा निर्णय १९५८ मध्ये भारत व चीनने घेतला आहे. १९६२ च्या युद्धातही चिनी सैन्याने लडाखच्या पश्चिम भागात व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागातील ५४५ किलोमीटर परिसरात चीनने प्रवेश केला नव्हता. मात्र, १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर या भागात इंडो-तिबेट सीमा पोलीस सशस्त्र गस्त घालतात. मात्र, या आयटीबीपीचे जवान आपल्या बंदुकीचे टोक जमिनीच्या दिशेने ठेवतात. जून २००० मध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. उत्तराखंडमधील बाराहोती व हिमाचल प्रदेशातील कौरील व शिंपकी भागात शस्त्र ठेवली जात नाहीत. या भागात आयटीबीपीचे जवान साध्या वेशात गस्त घालतात. या भागात याकला चरायला तिबेटमधून नागरिक येतात.
जेएनयूतील चीन विषयक तज्ज्ञ श्रीकांत कोंडापल्ली म्हणाले की, ही घुसखोरी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. पश्चिम व पूर्व विभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्यानंतर चीनने आता मध्य भागावर लक्ष केंद्रित केले आहे. ही बाब गंभीर आहे. बाराहोती येथे चिनी सैनिकांचा छोटा तळ आहे. चार ते पाच सैनिक भारतीय हद्दीत घुसले. हे प्रकरण सामंजस्याने मिटवले. अवघ्या पाच मिनिटात तणाव निवळला, असे लष्कराने सांगितले.
दरम्यान, ही घुसखोरी झाल्याची कबुली लष्कराने दिली आहे. केवळ चार ते पाच चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर विविध कारणांनी घुसखोरी होत असते. हे फारसे गंभीर नाही, असे लष्कराने स्पष्ट केले.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून दुजोरा
चमोली जिल्ह्यात चिनी सैन्याची घुसखोरी झाली, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले. मात्र, चिनी सैन्याने आपल्या कालव्याला हात लावला नाही ही बाब चांगली आहे. मात्र, चिनी सैन्याची कृती चिंताजनक आहे. ही सीमा कायम शांत असते. मात्र, आम्ही सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारने अहवाल मागवला
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, केंद्र सरकार या घुसखोरीची चौकशी करत असून याबाबतचा अहवाल मागवला आहे.