राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडतील असे विचार मांडल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
नवी दिल्ली- देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडतील असे विचार मांडल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
कोविंद यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरू किंवा काँग्रेसशी संबंधित कोणा अन्य नेत्यांचा उल्लेख केला नाही. राष्ट्रपती म्हणून आपले भाषण केवळ पक्षीय विचारांमध्ये बांधून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरदार पटेल आणि आंबेडकर या जवाहरलाल नेहरूंच्या कॅबिनेट मंत्र्यांचा नामोल्लेख केला. पंडित दिनदयाल उपाध्याय यांची महात्मा गांधींशी तुलना केली आहे तर जवाहरलाल नेहरू यांचा संपूर्ण भाषणात कुठेही उल्लेख केला नसल्याचे काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच नेहरू केवळ पंतप्रधान नव्हते तर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. देशाचे राष्ट्रपती असलेल्या कोविंद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची तुलना करणे दुर्दैवी असल्याचेही आझाद यांनी म्हटले आहे.
कोविंद आता देशाचे राष्ट्रपती आहेत, भाजपचे सदस्य नाहीत. तेव्हा आता त्यांनी पक्षीय राजकारणापलिकडे विचार करुन भारतीय संविधानाचे रक्षण करायला हवे, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी हा मुद्दा बुधवारी राज्यसभेत उपस्थित केला. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली आणि शर्मा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.