नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी आरबीआयने दिलेली मुदत संपायला अवघे काहीच तास उरले आहेत.
मुंबई- नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी आरबीआयने दिलेली मुदत संपायला अवघे काहीच तास उरले आहेत. रिझर्व्ह बँकेत ३१ मार्चला संध्याकाळपर्यंतच या नोटा बदलून देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही शेवटची संधी साधण्यासाठी आरबीआयच्या बाहेर लोकांची गर्दी दिसून येत आहे.
आरबीआयच्या मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या कार्यालयांतच जुन्या नोटा भरता येणार आहेत. नोटाबंदीदरम्यान परदेशात असणा-या भारतीयांनाच या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. तर अनिवासी भारतीयांसाठी ही मुदत ३० जूनपर्यंत आहे.
सध्या तापमानाचा पारा वाढला असून एरव्ही गारेगार एसीमध्ये एमिग्रेशनसाठी रांगा लावणारे एनआरआय तसेच घरातल्या डब्यात, पुस्तकांत नोटा जपून ठेवणारे सर्वसामान्य असे सगळे या रांगेत उभे राहिल्याचे दिसून येत आहेत. नागपुरातही कडाक्याच्या उन्हात नोटा बदलण्यासाठी रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
कोणाच्या आईला विस्मृतीचा आजार झाल्याने, कोणाच्या मुलाला लग्नात जुन्या नोटांचा आहेर मिळाल्याने तर कुणा एनआरआयला परदेशातून आणलेल्या नोटा बदलायच्या असल्याने उन्हातान्हात हे लोक रांगा लावून उभे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ३० डिसेंबरपर्यंत बँकांमधून नोटा बदलून मिळतील असे जाहीर केले होते. मात्र तरीही नोटा असतील तर त्या प्रतिज्ञापत्रासह रिझर्व्ह बँकेतूनच बदलून मिळणार होत्या. त्यासाठी ३१ मार्च ही मुदत होती. ही मुदत आज संपणार आहे.