मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या विधानाबद्दल विधान परिषदेत खेद व्यक्त करावा लागला.
मुंबई- विधानसभेच्या नियमांनुसार विधान परिषद बरखास्त करता येऊ शकते, या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे गुरुवारी जोरदार समाचार घेतल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विधानाबद्दल विधान परिषदेत खेद व्यक्त करावा लागला.
मंगळवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सरकारने चार विधेयके विनाचर्चा मंजूर करून घेतल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी- विरोधकांत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली.
सरकार विनाचर्चा विधेयके मंजूर करून घेणार असेल तर विधान परिषदेत आम्ही ती हाणून पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिल्यानंतर मुनगंटीवार यांनी, ‘विधानसभेचे नियम तर खूप आहेत. त्याच नियमांच्या आधारे विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णयदेखील विधानसभा घेऊ शकते’, असे वक्तव्य केले होते.
गुरुवारी विधान परिषदेचे नियमित कामकाज सुरू होताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, घटनेच्या कलम १६८ आणि १६९ मुळे आपण सर्व जण इथे आहोत. सरकारला तसे वाटत असेल तर त्यांनी हे सभागृह बरखास्त करून दाखवावे.
काय एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की, अर्थमंत्र्यांना हे सभागृहच बरखास्त करावेसे वाटते? अशी भाषा वापरणे हा अपमान आहे. याबाबत दिलगिरी व्यक्त करायची किंवा कसे ते ठरवून मुख्यमंत्र्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे राणे म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ सभागृहाचे महत्त्व मान्य करून अर्थमंत्र्यांच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे महत्त्व सारखेच आहे. विधान परिषदेला वरिष्ठांचे सभागृह म्हटले जाते. विधानसभेत बुधवारी काही विषय उपस्थित झाले असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषद बरखास्तीचे विधान केले होते. ते योग्य नाही. त्याबद्दल मी स्वत: खेद व्यक्त करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली.