महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे सोमवारी तब्बल तीन तास चर्चा झाल्याचे समजते.
मुंबई- नांदेड महापालिकेत भाजपला आलेले अपयश, मुंबईत शिवसेनेकडून केलेली मनसे नगरसेवकांची फोडाफोडी, शिवसेनेकडून रोज होणारी टीका याबाबत चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करून आक्रमक चेहऱ्यांना संधी देण्याबाबत विचारविनियम झाला असून मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांना संधी दिल्यास शिवसेनेला चोख उत्तर देणारी एक तोफ मिळू शकते, यावरही चर्चा झाल्याचे समजते.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा सध्या अहमदाबाद येथे तळ ठोकून आहेत. तेथेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. नांदेड महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. स्वत: मुख्यमंत्र्यांसह १० मंत्री तेथे तळ ठोकून होते, तरीही अपेक्षित यश मिळाले नाही. एकंदर राज्यात भाजपाच्या विरोधी वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी संघटनात्मक पातळीवर आणि सरकारी पातळीवर काय फेरबदल करावेत यावर या बैठकीत चिंतन झाल्याचे समजते.
भांडुपमधील प्रभागाच्या पोट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला. शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांत फक्त दोनचा फरक उरल्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर बसविण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र शिवसेनेने रातोरात मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडले. त्यामुळे सर्व गणिते बदलेली आहेत. सत्तेत राहून शिवसेनेकडून भाजपावर वारंवार टीका केली जात आहेत. या फोडाफोडीनंतर तर शिवसेना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार करणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या आरोपांना तितक्याच कडक शब्दांत प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात एनडीएमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांना सहभागी करून घेतले तर ते शिवसेनेला ते खंबीरपणे उत्तर देऊ शकतात, यावर विचार विनिमय झाल्याचे समजते. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून त्यात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे, तर काही निष्क्रिय मंत्र्यांना घरी पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यातील चर्चेला विशेष महत्त्व असल्याचे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.
[EPSB]
[/EPSB]