दिवाळी मग ती सामान्यांची असो वा संपादकांची, राजकीय नेत्यांची असो वा कलाकारांची, साहित्यिकांची असो वा खेळाडूंची.. प्रत्येकाच्या सेलिब्रेशनची एक खासियत असते.. आणि ही खासियत जाणून घेताना कलाकारांची अन् साहित्यिकांची दिवाळी कशी साजरी होते.. याची ही दिवाळी भेट खास दै. प्रहारच्या वाचकांकरिता..
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाणतो मराठी.. असे आजच्या युगातही तन्मयतेने म्हणणा-या मराठी वाचकांची संख्या आजही लक्षणीय आहे.. गत काही दिवसांत महाराष्ट्रातील परंपरा जपणारी उल्लेखनीय पुस्तकांची दुकाने बंद करण्यात आली आहेत, तर अनेक संस्थांनी आपल्याकडील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. याचबरोबरीने कुसुमाग्रज प्रतिष्ठानसारख्या संस्थांनी ग्रंथ आपल्या दारी उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी ग्रंथसंपदेची पताका फडकावली आहे..
महाराष्ट्राला जसा पराक्रमी मराठय़ांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे, तसाच संत साहित्याचा, एक से एक दिग्गज संतांचा इतिहास लाभला आहे.. याच साहित्यिक परंपरेचे पाईक असणा-या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड, ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे आणि कोकणी साहित्यिक महेश केळुस्कर या साहित्यिकांची दिवाळी सेलिब्रेशन जाणून घेतानाच, त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीवर टाकलेला एक कटाक्ष..
याचबरोबरीने घराघरांत रोजच्या रोज न चुकविता पाहिल्या जाणा-या मराठी मालिका हा तसा सामान्यांसह अगदी ज्यांना मनोरंजन हवे आहे, अशांच्या विरंगुळय़ाचा भाग असतो. अनेकदा एखादी मालिका काही महिन्यांतच बंद करावी लागते तर एखादी मालिका अवघ्या काही एपिसोडमध्येच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते.. अशावेळी मग उत्सुकता राहते की, १२-१२ तास व्यस्त शूटिंगमधून या कलाकारांना दिवाळीत सुट्टी मिळते का.. जर मिळालीच सुट्टी तर ते कशाप्रकारे आपली दिवाळी साजरी करतात.. अभिनयातली प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात तर जात नाही ना.. आपली नाती, बहीण-भाऊ, आई-वडिलांची नाती ते तितक्याच आपुलकीने जपतात ना.. हेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न..