राजकारणात वावरताना अनेक शह- कटशह देत पुढे जावे लागते. संघर्ष करावा लागतो. सतत लोकांच्या संपर्कात राहावे लागते. अशा धकाधकीच्या जीवनात ही राजकीय मंडळी आपली दिवाळी कशी साजरी करतात. त्यांचा दिवाळीतला दिनक्रम कसा असतो आणि दिवाळीबद्दलच्या त्यांच्या काय आठवणी आहेत, हे जाणून घेण्याचा ‘प्रहार’ने केलेला हा प्रयत्न!
दिवाळी आपल्या संस्कृतीची ओळख
दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण आहे. प्रकाश ज्ञानाचा, विकासाचा आणि समृद्धीचा निर्माण होऊन त्यात अज्ञान, अहंकार आणि दारिद्रय़ाचा अंधार नाहीसा व्हावा, असा प्रयत्न मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यापासून करीत असतो. विशेषत: कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात सुखाचे काही क्षण यावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात आम्ही दिवाळीतच करून शेतक-यांना ख-या अर्थाने दिवाळीचा निर्भेळ आनंद घेता यावा, असा प्रयत्न केला. कर्जमाफी हा शेतक-यांच्या उत्कर्षाचा खरा मार्ग नाही, तर त्यांच्या जीवनातील कायमस्वरूपी अस्थिरतेचा आंधार दूर व्हायचा असेल तर शेतीचा शाश्वत विकास झाला पाहिजे, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच आज कितीही राज्यावर आर्थिक संकटे असली तरी आम्ही शेतीविषयक योजनांमध्ये कपात केली नाही. शेतीमध्ये ही राज्य सरकारची गुंतणूक आहे आणि ती ख-या अर्थाने शेतक-यांच्या जीवनात दिवाळी आणणारी आहे, असे मला वाटते. म्हणून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत.
बाकी सार्वजनिक जीवनात आल्यानंतर आपली दिवाळीही सार्वजनिक होऊन जाते. त्यामुळे दिवाळीच्या काळात येणा-या लोकांशी भेटणे, त्यांच्या जीवनातील सुख-दु:ख जाणून घेणे हाच दिवाळीचा उपक्रम असतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर माझी दिवाळी मुंबईत ‘वर्षा’वरच जाते. राज्यभरातून लोक येत असतात. त्यांच्या भेटी-गाठी होत असतात. पाच दिवसांतला एखादा दिवस मग नागपूरच्या घरी जात असतो.
या वर्षीही दिवाळी मुंबईतच आहे. गेली तीन वर्षे आई इथे माझ्यासोबत दिवाळीला होती. या वर्षी ती नागपूरला आहे. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी दिवाळीत आईसोबत राहता यावे म्हणून नागपूरला जाणार आहे. त्याच वेळी नागपूर येथील कार्यकर्ते आणि बालमित्रांच्याही भेटी-गाठी होत राहतील.
दिवाळी ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. दिवाळी आली की त्यात फराळाची जशी चंगळ असते, तशीच फटाक्यांची आतषबाजीही असते. हा आनंद घेत असताना, फटाके वाजवत असताना लोकांनी कमी आवाजाची, कमीत कमी प्रदूषण होणारे फटाके निवडावेत, असे माझे राज्यातील जनतेला आवाहन आहे. सर्वाच्या जीवनात दिवाळीचा आनंद कायम राहावा, यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी प्रयत्न करीत राहीन.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
जनतेचा आनंद हीच दिवाळी..
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. परंतु आजही दिवाळीत अनेक कुटुंबांच्या घरांत दिवाळीचा प्रकाश पोहोचलेला नाही. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना वंचितांच्या घरात आनंद फुलेल तो दिवस ख-या अर्थाने दिवाळीचा दिवस आहे, असे मला वाटते. म्हणूनच जे लोक आपल्याकडे येतील, त्यांच्या समस्या दूर करून त्यांच्या चेह-यावर आनंद पाहण्याचा मी प्रयत्न करीत असतो. त्यांच्या चेह-यावर दिसणारे समाधान मला दिवाळी असल्याचा आनंद देते.
आता दिवाळी सुरू असली तरी या काळातही अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येतात. तेव्हा त्या शासनदरबारी पोहोचवून सोडवून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. अगदी उदाहरण द्यायचे झाले तरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे वसू बारशीच्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एका सैनिकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. महाराष्ट्रातील अनिल गौंडगे हे सैनिक अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना त्यांची पत्नी व मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी अरुणाचल प्रदेशात पोलीस तक्रार नोंदवूनही अद्याप तपास लागत नसल्याने गौंडगे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. मी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सैनिकाच्या कुटुंबीयांचा शोध लावावा यासाठी विनंती केली. हे उदाहरण सांगितले. अशी अनेक उदाहरणं आहेत. सार्वजनिक जीवनात आल्यानंतर आपण वैयक्तीक राहात नाही.
लहापणाची दिवाळी मात्र खूप वेगळी होती. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथ्रा हे आमचे गाव. आमचे मोठे कुटुंब असल्याने सर्वजण दिवाळीला एकत्र असतात. तो आनंद काही वेगळाच होता. एकत्र फटाके आणले जायचे. ते आम्हा मुलांमध्ये वाटले जायचे. सर्वाच्या अगोदर माझे फटाके फोडून व्हायचे. बाकीचे जपून वापरायचे. दिवाळीमध्ये नातेवाईक एकमेकांकडे जात असत. संपूर्ण गावातील लोकांना नव्या कपडय़ात पाहण्याचा योग फक्त दिवाळीत यायचा आणि अनेक घरात गोडधोडही फक्त दिवाळीलाच व्हायचे. आकाश कंदील घरीच बनविले जायचे. तो बनविण्याची तयारी दोन-तीन दिवस अगोदर सुरू असायची. आता दिवस बदलले आहेत. ग्रामीण भागातही आता शहरी वारे वाहू लागले आहेत, हा सकारात्मक बदल असला तरी. आजूनही काही घरात दिवाळीचा उजेड पोहोचला नाही, त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत.
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता
तो उत्साह आज नाही!
दिवस बदलत आहेत, तसे आपले सण-उत्सवही आता बदलू लागले आहेत. त्यात निर्भेळ आनंद दिवसेंदिवस कृत्रिम होत चालला आहे. दिवाळीबाबतही तसेच घडताना दिसत आहे. आमच्या लहानपणाच्या दिवाळीची नुसती आठवण जरी झाली तरी तो निर्भेळ आनंद नेमका कुठे गेला, असा प्रश्न आता पडत असतो.
माझगाव ताडवाडीत माझे बालपण गेले. हा भाग तसा संमिo्र लोकवस्तीचा असला तरी मराठी माणसांचाच इथे आवाज होता. त्यामुळे सगळे सण-उत्सव दणक्यात साजरे व्हायचे. फार आर्थिक संपन्नता नव्हती, पण मनाची o्रीमंती खूप लोकांमध्ये होती. दस-याबरोबरच दिवाळीच्या सणाची सुरुवात व्हायची. घराघरात दिवाळीची तयारी सुरू व्हायची. बहुतेक कामगार-कष्टक-यांच्या चाळी होत्या. सर्वाची घरे दिवसभर उघडीच असायची. वेगवेगळय़ा घरात होणा-या फराळाची देव-घेव व्हायची. घरात फराळांची तयारी चालायची तेव्हा आम्हा मुलांमध्ये किल्ले बनविण्याची तयारी सुरू व्हायची. प्रत्यक्ष पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात अगोदर आंघोळ करून पहिला फटाका कोण फोडणार यासाठी चुरस लालेली असायची.
अगदी पहाटे तीन वाजल्यापासून फटाक्यांचा दणदणाट सुरू होत होता. आता दिवाळी फार बदलली आहे. मुंबई कष्टक-यांची राहिली नाही. चाळीच्या जागी आता टॉवर उभे राहिले. चाळीत रात्रीही दरवाजे लावलेले नसायचे, आता दिवसाही दरवाजा उघडा पाहायला मिळत नाही. फराळ घरी करणेही खूप कमी झाले आहे. रेडीमेड फराळ आणले जातात. जगणेच एकप्रकारे रेडीमेड होऊ लागले आहे. त्यात सर्वच सणांवर निर्बंध येऊ लागले आहेत. या वर्षी फटाक्यांच्या विक्रीवर न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. एका एका सणांवर निर्बंध येत आहेत. गणपतीला दहानंतर मिरवणुकीत वाद्य वाजवायचे नाही, नवरात्रोत्सवात गरबा दहाच्या आत बंद करायचा, दहीहंडीमध्ये आमके-तमकेच थर लावायचे आहेत, असे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत. आता ते फटाक्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे निर्भेळ आनंद हरवत चालला आहे. मुंबईतील चाळ संस्कृती गेली आणि फ्लॅटची संकुचित संस्कृती आली. चाळीमधील घरे लहान होती, पण लोकांची मने मोठी होती. तर आता घरे मोठी झाली आणि लोकांची मने लहान झाली आहेत. त्याबरोबर दिवाळीचा निर्भेळ आनंदही लोप पावत चालला आहे.
बाळा नांदगावकर, माजी राज्यमंत्री, मनसे नेते
दिवाळी – दसरा तोचि आम्हा सण
दिवाळी दसरा
तोचि आम्हा सण
सखे संतजण भेटतील
असा एक तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना त्यात थोडासा बदल करून मला एवढेच म्हणावेसे वाटते की, लोकांच्या अडी-अडचणी दूर करून त्यांच्या चेह-यावर ज्या दिवशी समाधान दिसेल तोच दिवस आमच्यासाठी दिवाळीसारखा असतो. हे काम दिवाळीतही अखंडपणे सुरू असते. माझ्या मतदारसंघात एक ‘झिकझ्ॉक’ पार्क आहे. सकाळी तिथे लोक चालण्यासाठी येत असतात. परंतु या वर्षी झालेल्या पावसामुळे त्या पार्कमधील चालण्याचा ट्रॅक खचला होता. भिंतीलाही तडे गेले होते. इथे येणा-या वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने याची दुरुस्ती आवश्यक होती. दिवाळीची सुरुवात या दुरुस्त केलेल्या पार्कच्या लोकार्पण सोहळय़ाने केली.
सुप्रसिद्ध सतारवादक पंडित शिवकुमार यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. मंत्रालयात मुंबईच्या डीपी संदर्भात नितीन करीर यांच्याशी तर आर्थिक विषयासंदर्भात एस बँकेचे राणा कपूर यांच्याशी चर्चा केली. मतदार संघातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतादेताच माझा दिवाळीचा पहिला दिवस संपला. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येक दिवस दिवाळीसारखा आनंदाचा असतो आणि तितका संघर्षाचा असतो. आनंदात फार हुरळून आणि खचून न जाता वाटचाल करावी लागते. दिवसभर लोकांना दिल्यानंतर दिवाळी दिवशी मात्र रात्रीची वेळ कुटुंबासाठी राखीव ठेवतो.
आशीष शेलार, आमदार, मुंबई भाजप अध्यक्ष
आनंदाची देवाण- घेवाण!
माझी दिवाळी मी नेहमी कार्यकर्त्यांमध्ये, सार्वजनिक कामात साजरी करतो. वर्षातून एकदाच येणारा हा सण आनंद देणारा असतो. यानिमित्ताने अनेक धर्माच्या, पंथाच्या लोकांना एकत्र आणता येते, त्यांना या आनंदात सहभागी करून घेता येते, त्यातून नवे ऋणानुबंध विणता येतात. माणसाला पुढे जाताना याचीच खूप गरज असते. भारतीय संस्कृतीमधून आपल्याला हेच शिकायला मिळते.
बहुजन हिताय बहुजन सुखाय, हाच मूळ हेतू या सणांमागे असावा. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक उत्सवांची प्रथा सुरू करून, स्वातंत्र्यासाठी आणि समाजहितासाठी त्याचा खुबीने उपयोग करून घेतला. दीपावलीचा उपयोग सामाजिक हितासाठी करता आला पाहिजे. दिवाळी साजरी करताना ती प्रदूषणमुक्त साजरी व्हावयास हवी. दिवाळी सणातून कौटुंबिक नातीही घट्ट करता आली पाहिजेत. सामाजिक एकोपा साधता यावा.
सचिन अहिर, माजी राज्यमंत्री, अध्यक्ष, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस
गिरण्या बंद झाल्याने मराठीपण हरवले!
मुंबईतील गिरणगाव ही खरी या शहराची ओळख होती. गिरण्यांचे साचे धडधडत होते. ते केवळ साचे नव्हते तर इथल्या संस्कृतीचे हृदय धडधड होते. चोवीस तास मुंबई एकाच उत्साहात वावरत होती. मुंबईतील गिरण्या, कारखाने कमी झाले आणि इथे मराठी टक्का घसरला. त्याबरोबर दिवाळीसह सर्वच सणांचा उत्साह कमी होत गेला.
माझे बालपण तर गिरणगावचा आत्मा असलेल्या नायगावमध्ये गेले. माझे वडीलही गिरणीमध्ये टाईम ऑफिसर होते. मी आमदार झाल्यानंतरही जवळपास २२ वर्षे चाळीतच राहात होतो. या संस्कृतीशी एक घट्ट नाते तयार झालेले आहे. मुंबईत गिरणी कामगार होते, त्यात मराठी संस्कृतीचा जिवंतपणा होता. दिवाळीची चर्चा सुरू व्हायची ती दिवाळीच्या बोनसवरून. साडेतीन लाख गिरणी कामगारांच्या बोनसचा विषय गाजायचा. तोडगा निघून दस-याच्या सुमारास कामगारांना बोनस मिळायचा. बोनस झाला की दिवाळीची खरेदी सुरू व्हायची. मुलांना नवीन कपडे, फटाके यांची खरेदी व्हायची. कोकणातील आणि देशावरील कामगार मुंबईत काम करीत असले तरी ब-याच कामगारांचे कुटुंब गावाला असायचे.
बोनस झाला की खरेदी करून ते गावाला जायचे किंवा खरेदी करून गावाला जाणा-या व्यक्तीकडे द्यायचे. दिवाळीत फटाक्यांबरोबरच प्रत्येक गल्लीत रस्त्यावर पडद्यावर चित्रपट दाखविले जायचे. मी आमदार झाल्यापासून लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. लोकांत मिसळून त्यांच्या समस्या सोडविणे हीच माझ्यासाठी दिवाळी असते. आज एका दिवशी बावीस इमारतीत पूजा आहे. तितक्या ठिकाणी जावे लागते. ही जनता हे आपले पाठबळ आहे. त्यांना जपले की ते आपल्याला जपतात. या लोकांच्या सुख-दु:खात मी सहभागी होत असल्यामुळे गेली तीस वर्षे तेही मला जपत आहेत. अनेक वादळे आली, गेली पण ही जनता माझ्यासोबत आहे. भविष्यातही या जनतेशी असणारी नाळ तुटू द्यायची नाही, हाच माझा संकल्प आहे. हीच माझ्यासाठी दिवाळी आहे.
कालिदास कोळंबकर, आमदार, माजी राज्यमंत्री
माझी दिवाळी माझ्या लोकांसोबत
लहानपणापासून आमची दिवाळी ही लोकांसोबत साजरी होत आलेली आहे. माझे वडील आदरणीय दत्तात्रय तटकरे हे सार्वजनिक जीवनात होते. घरी कायम लोकांची वर्दळ असायची. दिवाळीमध्ये ही गर्दी अधिक वाढायची. लोक जसे आमच्याकडे यायचे तसेच वडीलही लोकांकडे जायचे. तोच वारसा आम्ही तटकरे कुटुंबीयांनी पुढे जपला आहे. रायगड जिल्ह्यातील छोटय़ा खेडेगावातून आमच्या कुटुंबाला सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. या विभागातील लोकांनी इतके दिवस अखंड प्रेम दिले. त्यांच्या प्रेमाची पोच-पावती देण्याच्या संधी या अशा सण आणि उत्सवाच्या निमित्ताने मिळत असतात. म्हणून मी दिवाळीत माझ्या मतदारसंघातील लोकांना भेटत असतो. त्यांच्यासोबतच माझी दिवाळी असते.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी मात्र मी बारामतीला जात असतो. तेथे शरद पवारसाहेब यांची भेट घेऊन आशीर्वाद घेत असतो. गेली सातरा वर्षे मी बारामतीला जाणे चुकू दिले नाही. ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या राजकाणात उभे राहू शकलो, तेच आपले प्रेरणास्थान. म्हणूनच पाडव्याच्या दिवशी त्यांना भेटून आशीर्वाद घेतले की वर्षभर काम करण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळत असते. आजही पाडव्यानिमित्ताने बारामती येथे जाऊन शरद पवारसाहेब यांचे आशीर्वाद घेणार आहे.
सुनील तटकरे, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष