विधानसभा निवडणुकीत मूर्खपणा केला, आता तो महागात पडेल. हे सेना- भाजपावाल्यांना कळतंय आणि जे सेना-भाजपाला कळतंय ते मुंबईतल्या काँग्रेसच्या प्रमुखांना का व कसे कळत नाही?
मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. २४ वर्षे या महापालिकेत सेना-भाजपावाले मलई खात आहेत. या मलईने ते कसे गुबगुबीत झालेत. तो गुबगुबीतपणा त्यांच्या चेह-यावर दिसतोय. बाहेर एकमेकाला शिव्या घालून निवडणुकीत युती करण्यासाठी संध्याकाळ झाली की सगळ्या सरंजामसह चारित्र्यावर भाषण देणारे चर्चेला बसले आहेत. नाटक अतिशय छान वठवीत आहेत. त्या नाटकाचे फोटो प्रसिद्ध होतायत. गालिच्यावर खुर्च्या आहेत. त्या खुर्च्यांवर दोन्ही बाजूचे पहलवान स्थानापन्न आहेत. १५ दिवस हे गु-हाळ चालवायचे. या ‘गु-हाळाचा रस’ सायंकाळी घ्यायचा. मग १० वाजेपर्यंत चर्चा घडवून वाटाघाटी सकारात्मक झाल्या, असे सांगत उठायचे. सकारात्मक व नकारात्मक म्हणजे काय? कोणालाही सांगता येत नाही.
भाजपावाले म्हणतात, मुंबईत आमचे १५ आमदार म्हणजे मग आम्हाला किमान ६० जागा हव्यात. सेनेचे आमदार १४, त्यांचा हिशोब ५६ जागांचा. ६० आणि ५६ झाले ११६. राहिलेल्या जागा निम्या निम्या. तडजोडीचा हा प्रथम प्रस्ताव. दुसरा प्रस्ताव अडीच वर्ष महापौरपद भाजपा व अडीच वर्ष सेनेला. तिसरा प्रस्ताव किमान १२० जागा भाजपाला द्या. टोलवाटोलवीसाठी अशा कवडय़ा टाकतात. सायंकाळ झाली की घरी जातात. अशा या वाटाघाटी ३ दिवस सुरू आहेत आणि अजून १० दिवस सुरू राहतील. भाजपाने एक तंत्र ठरविले आहे. सेनेला झुलवत ठेवायचे, वाटाघाटीत गुंतवायचे. शेवटी ६०-४० अशी तडजोड होणार हे आधीच ठरवलंय. युती होणार नाही म्हणतात. त्यांना मलईची गोडी समजत नाही. युती झाली तरच भूखंडाचे श्रीखंड खाता येईल. ४ जागांसाठी युती तोडायला ते काय काँग्रेस-राष्ट्रवादीवाले थोडेच आहेत. विधानसभा निवडणुकीत मूर्खपणा केला, आता तो महागात पडेल. हे सेना- भाजपावाल्यांना कळतंय आणि जे सेना-भाजपाला कळतंय ते मुंबईतल्या काँग्रेसच्या प्रमुखांना का व कसे कळत नाही? मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणून कोणी आहे. त्यांनी परस्पर जाहीर करून टाकले आहे की, मुंबईत राष्ट्रवादी आघाडी होणार नाही. का होणार नाही? तर राष्ट्रवादीची मुंबईत शक्ती नाही.
काँग्रेसची किती शक्ती आहे? काँग्रेसचे मुंबईत आमदार किती? इनमीन ४, बाकी वॉर्ड पातळीवर संघटना किती? ५२ नगरसेवक आहेत हे खरे, पण वर्षानुवर्षे सत्तेत बसलेल्या भाजपा-सेनेचा पराभव करायचा असेल, तर एक एक मत जोडावे लागेल आणि एकाही मताची विभागणी होणार नाही. त्याची काळजी घ्यावी लागेल. खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीखेरीज जे जे कोणी सेना-भाजपाच्या विरुद्ध आहेत, त्या प्रत्येकाचे काही मूल्य आहे आणि त्या प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या विभागात शक्ती आहे. अशा छोटय़ा छोटय़ा शक्तींना जोडून काँग्रेस-राष्ट्रवादी जर आघाडी करतील आणि मनाने खरोखर एकत्र येतील तर दोन्ही पक्षांना मुंबईत १०० जागा मिळवणे कठीण नाही. आता मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचे ५२ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आहेत. ही एकत्रित संख्या ६६ आहे. ती कमी नाही. थोडय़ाशा शहाणपणाने वागले तर आणखी २५-३० जागा मिळवणे अवघड नाही. पण त्याकरिता एकमेकाला आतून सुरुंग लावण्याचे धंदे बंद करून मनापासून एक व्हायला हवे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. नारायण राणे यांनी मुंबईत आघाडी झाली पाहिजे, या भूमिकेचे प्रभावी समर्थन केलेले आहे. ती त्यांची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हिताची आहे. जे निरुपम किंवा पृथ्वीराज चव्हाण आघाडी नको असे म्हणतात आणि स्वबळाचा नारा देतात, ते काँग्रेस पक्षाचे नुकसान करतात. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन मनापासून लढल्यानंतरही निदान मुंबईत तरी सेना-भाजपाचा पराभव करणे इतके सोपे आहे, असे समजण्याचे कारण नाही. अति आत्मविश्वासात राहणे धोक्याचे ठरेल. विधान परिषद निवडणुकीत साता-याची एक जागा जिंकली, एवढय़ा एका गणितावर काँग्रेसचे जे नेते आघाडीला विरोध करीत आहेत, तेच काँग्रेसच्या नाशाला २०१४ साली कारणीभूत ठरले होते. त्यांच्यामुळेच सत्ता गेली हे महाराष्ट्रातील प्रत्येक काँग्रेसवाला खासगीत सर्रास बोलतो. पण उघडपणे घाबरतो. पण हेच काँग्रेसवाले खासगीत असेही बोलतात. अशोक चव्हाण यांचा राजीनामा झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर कऱ्हाडचे चव्हाण आणण्याऐवजी कोकणाचे नारायण राणे यांना बसविले असते, तर महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच नसता. कारण नारायण राणेंनी आघाडी तोडलीच नसती. तीच चूक काँग्रेसला भोवते आहे. तरीही आघाडी न करण्याची भूमिका काँग्रेसचे काही नेते घेताहेत. पक्षाला पराभूत करण्यासाठीच हे निवेदन आहे.
श्री. नारायण राणेसाहेब यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी केवळ मुंबई महानगरपालिकेत व्हावी एवढय़ापुरतेत त्या आघाडीचे समर्थन केलेले नाही, तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली पाहिजे, ही त्यांची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही आघाडी हवी याच मताचे आहेत. तसे त्यांनी अनेक वेळा त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. अशोक चव्हाण हे थोडेसे कुंपणावर असले तरी नांदेड सोडून त्यांनाही आघाडी हवीच आहे. एकदा आपल्या शक्तीच्या मर्यादा समजल्या आणि भाजपाला पराभूत करायचे निश्चित असेल तर कोणताही शहाणा माणूस महाराष्ट्रात आघाडी हवी असेच म्हणेल. मात्र केवळ चर्चेत वेळ न घालवता ही आघाडी करण्यात पुढाकार घेणार कोण? तो पुढाकार राष्ट्रवादीतर्फे पवारसाहेब स्वत: घेतील.
काँग्रेसतर्फे आता नारायण राणे यांनी दिल्ली पातळीवर पुढाकार घेऊन आघाडीचे महत्त्व श्रेष्ठींना पटवून द्यावे. ते पटले तरच मुख्य शत्रू कोण? याचा शोध लागला असा त्याचा अर्थ होईल. केवळ मुंबईपुरती नव्हे, तर महाराष्ट्र पातळीवर आघाडीचा निर्णय होऊन पक्षश्रेष्ठींकडून तसा आदेश निघायला हवा. तरच ही आघाडी गांभीर्यपूर्ण घेतल्याचे जाणवेल. जिथे सोयीचे तिथे आघाडी करा, ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. ‘मैत्रीपूर्ण लढत’ हा गोंडस शब्द तर आणखी घातक आहे. महाराष्ट्रात भाजपा-सेनेचे राज्य उलथवून टाकायचे असेल तर आघाडी व्हायलाच हवी. शरद पवारसाहेब व राणेसाहेबांनी पुढाकार घेऊन मुंबई महाराष्ट्रासाठी एक नवीन राजकीय चित्र तयार करावे. भाजपाची घसरण झालेली असताना, मोदी बदनाम झालेले असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन लढाई लढवली तर कोण हे फडणवीस? कोण तावडे? कोण मुनगंटीवार? पुरोगामी महाराष्ट्रात या असल्या भुक्कड लोकांच्या हातात राज्य जावे हा पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव आहे. यासाठी आघाडी ही हवीच.