मूलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत बंदोबस्तावर असलेले पोलीस आत्महत्येची माहिती दिल्यानंतर तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाले.
चंद्रपूर- चंद्रपूरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मूलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत बंदोबस्तावर असलेले पोलीस आत्महत्येची माहिती दिल्यानंतर तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे तीन तास शेतक-याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता, अशी धक्कादाय माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या मारोडा-भादूर्णी परिसरात उमेश चहाकाटे नावाच्या शेतक-याने आत्महत्या केली. गरिबी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूलमध्ये सुरु होती. माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ही सभा ठेवण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री राज्याचा वाढलेला कृषी विकास दर आणि शेतक-यांसाठी राबवलेल्या योजनांवर पोटतिडिकीने भाषण देत होते.
त्याच वेळी सभास्थळापासून दहा किलोमीटरवर असलेल्या मारोडा-भादूर्णीच्या एका शेतक-याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ५० वर्षीय उमेश चहाकाटे यांच्याकडे फक्त एक एकर शेती होती. तीही तिघा भावांमध्ये मिळून. कुटुंबात तीन मुली, एक मुलगा आणि बायको.
दोन वर्ष आधी मोठय़ा मुलीचं त्यांनी लग्न लावलं. या लग्नामुळेच कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतक-यांच्या आत्महत्या हा सर्वांच्याच चिंतेचा विषय असला तरी त्याबद्दल प्रशासन किती असंवेदनशील आहे, याचा अनुभव यावेळी आला. ही आत्महत्या गावाच्या अगदी जवळ झाल्यामुळे गावच्या उपसरपंचाने लगेच पोलिसांना फोन करून याची वर्दी दिली.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तात व्यस्त असलेले पोलीस तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे मूलपासून या गावचं अंतर अवघं २० किलोमीटर असतांना पोलिसांना पोहचायला तीन तास लागतात यातच प्रशासन किती असंवेदनशील आहे हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गावकरी पोलिसांना घटनास्थळी पोहचायला तब्बल तीन तास लागल्याचे सांगत या प्रकरणावर रोष व्यक्त करत आहेत. मात्र पोलिस त्यांना उशीर झाल्याचं अमान्य करत आहेत. आत्महत्येची तक्रार एक ते दीड वाजता आल्याचं पोलीस सांगत असले तरी मोबाईलच्या जमान्यात ही गोष्ट पटण्यासारखी नाही. तरी उशीर झाल्याच्या आरोपाची चौकशी करु असं सांगून पोलीस प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकरी आत्महत्या हा जरी फार गुंतागुंतीचा विषय असला तरी या प्रकरणावर किमान प्रशासनाने संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. फक्त मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे पोलिसांना एका शेतक-याचा मृतदेह झाडावरुन काढायला तीन तास लागणार असतील तर समाजासाठी ही लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया या भागात व्यक्त होत आहे.