संपूर्ण युरोपमध्ये सध्या काय सुरू आहे? दहशतवाद हा एकटय़ा भारताचा प्रश्न नाही तर हा आता जागतिक पातळीवरील सर्वच राष्ट्रांचा चिंतेचा विषय झालेला आहे. असे असूनही या दहशतवादाविरोधात केवळ एखाद्या जागतिक परिषदेसाठी त्या त्या राष्ट्रांचे नेते एकत्र येतात, भाषणे करतात, ‘दहशतवाद संपवला पाहिजे’ म्हणतात आणि तरीही प्रत्येक दिवशी दहशतवाद उग्र होत आहे.
हल्ल्यांचे नवे नवे मार्ग शोधले जात आहेत. यासाठी दहशतवादी संघटनांच्या टोळ्यांमध्ये डोके चालवणारी बरीच माणसे हा विषय किती क्रूरपणे हाताळत आहेत, त्याचे प्रत्यंतर ट्रक चालकाने ८२ जणांना चिरडून ठार केले, हे या हल्ल्याच्या नव्या प्रकाराने उघड झाले आहे. हे दहशतवादी क्लृप्त्या लढवत आहेत त्यांच्या पासंगालाही जगातील सर्व पोलीस यंत्रणा पु-या पडत नाहीत. दहशतवादी टोळय़ा जे मार्ग अवलंबतात त्याचा अंदाजही या पोलीस यंत्रणेला येत नाही. परिणामी एकेका हल्ल्यात दहशतवादी भारी ठरतात आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरते. हे सर्व देशांना लागू आहे. युरोपमध्ये तर गेल्या १५-१६ वर्षात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. अमेरिकेलाही त्याचा प्रत्यय आला. बुश राजवटीतील हल्ला अमेरिकेच्या सगळय़ा व्यवस्था उद्ध्वस्त करून गेला. पाकिस्तान हे सगळय़ात मोठे दहशतवादी राष्ट्र. पण पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांचीही हत्या दहशतवाद्यांनीच केली. बांगलादेशातील ढाक्याचा हल्ला हाही त्याच पद्धतीचा. दक्षिण आशियामध्ये बगदाद असो की, पाकिस्तानचे लाहोर-कराची असो. त्या राज्यव्यवस्थेविरुद्ध दहशतवादी पथके मोठय़ा प्रमाणात संघटित झालेली आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी ‘इसिस’सारख्या संघटना सज्ज आहेत. आपल्याला माहीत असलेली नावे मर्यादित आहेत. तालिबान किंवा इसिस याच्याही पलीकडे युरोमध्ये वावरणा-या संघटना खतरनाक आहेत. गेल्या १६ वर्षात स्वित्झर्लंड, लंडन, माद्रीद, पोटोया, नॉर्वे, ब्रसेल, पॅरिस अशा युरोपमधील अनेक राष्ट्रांत दहशतवाद्यांनी हल्ले करून ४००पेक्षा अधिक लोकांना ठार केले आहे. आता परवाच्या ट्रक हल्ल्यामध्ये सुरुवातीला असे भासवण्यात आले की, हा ट्रक ड्रायव्हर माथेफिरू आहे आणि कौटुंबिक वैफल्यामुळे त्यांनी ८२ जणांना चिरडून टाकले आहे. परंतु फ्रान्सचे अध्यक्ष पोलँड यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ‘हा अतिरेक्यांचाच हल्ला आहे’. फ्रान्समध्ये झालेले गेल्या काही दिवसांतील हल्ले आफ्रिकेतून स्थलांतरीत होऊन फ्रान्समध्ये नागरिकत्व मिळवलेल्यांनीच केलेले आहेत. नागरिकत्व मिळाल्यानंतर सरकारने त्यांना नागरिक म्हटले तरी फ्रान्समधील मूळची जनता त्यांना आपले मानायला तयार नाहीत. त्यातून हे अंतर पडलेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे स्थलांतरीत झालेले नागरिक फ्रान्सच्या लोकजीवनाशी समरस होऊ शकलेले नाहीत. बांगलादेशातही तीच स्थिती आहे. आज जगभर जे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यात दहशतवादी संघटनांची भीती जगाला वाटते आहे. फ्रान्सच्या हल्ल्यानंतर ओबामांपासून मोदींपर्यंत सर्वानी ‘निषेध निषेध’ असा धिक्कार केला. ‘भ्याड हल्ला’ असेही त्याला नाव दिले. असे शब्दच्छल करून हल्ले थांबत नाहीत. उलट दहशतवादी संघटना अधिक आक्रमक झालेल्या आहेत आणि हल्ल्याचे नवनवीन मार्ग शोधले जात आहेत.
१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर जो हल्ला झाला त्या हल्लेखोरांनी संसदेच्या सुरक्षा अधिका-यांसारखेच वेष परिधान केले होते. त्यांच्यासारखीच लाल दिव्याची गाडी घेऊन त्यांनी संसदेच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला होता. त्यामुळे हे सुरक्षाकर्मी आहेत, असा क्षणभर संभ्रम निर्माण होऊन संसदेचे द्वार उघडले गेले. आता फ्रान्समधील ज्या माथेफिरूने ट्रकचा वापर करून ८२ जणांना चिरडले आहे, ती कल्पना पुण्यातील एका माथेफिरूने पीएमटीची बस पळवून काही लोकांना चिरडून टाकले होते त्यातून सुचली असावी. आता इथून पुढे काही हल्लेखोर अशा कल्पना राबवू शकतील. ट्रकचा वापर करून ब-याच जणांना एकाचवेळी मारता येईल, हे या माथेफिरूने दाखवून दिले. शिवाय यात चालकाची जेव्हा हत्या केली जाईल ती एका माणसाची हत्या आहे.. तिथपर्यंत होणारी हानी ही कल्पनेच्या पलीकडची आहे. आता एखाद्या हिंदी चित्रपटातसुद्धा हे दृष्य दिसू शकेल. थोडे मागे गेलो तर ‘जंजीर’ चित्रपटात ट्रकने मुलांना चिरडून टाकण्याचे एक दृष्य चित्रित केले होते. एकाचवेळी १०-१५ मुलांना गुंड टोळीचा एक ट्रक ड्रायव्हर चिरडतो, असे ते दृष्य होते. फ्रान्समध्ये वापरण्यात आलेले हे सगळे तंत्र आता अतिरेकी जगाला नवी युक्ती सापडल्यात जमा आहे. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, प्रामुख्याने भारतीय चित्रपटात त्यातही दाक्षिणात्य म्हणजे तामिळ, मल्ल्याळम चित्रपटात आणि हिंदी चित्रपटांत ज्या पद्धतीचा हिंसाचार प्रतिष्ठित केला जातो ते अत्यंत घातक आहे. गुंडांचे अड्डे पोलीस ठाण्यावर थेट हल्ला करतात. पोलीस अधिका-याला ठार मारले जाते. ‘घायल’चे कौतुक खूप झाले. पण त्या ‘घायल’मध्ये पोलीस आयुक्तांना नायकाच्या टोळीने घरात ‘बंदी’ करण्याचा एक शॉट दाखवला आहे. त्याचीही कॉपी कुठे तरी दहशतवादी करू शकतात.
फ्रान्सच्या ट्रक हल्ल्यानंतर वृत्तसंस्थांनी ज्या बातम्या सोडल्या त्या बातम्यांनीही ब-याच संभ्रम निर्माण केला. शेवटी फ्रान्सच्या अध्यक्षांनी खुलासा केला आणि तो ‘दहशतवादी हल्ला होता,’ असे जाहीर करण्यात आले. आगोदर असे सांगण्यात येत होते की, कुटुंबातील पत्नी कलहामुळे आलेल्या नैराश्येतून या ट्रकचालकाने हे कृत्य केले आहे. अशा संभ्रम निर्माण करणा-या बातम्यासुद्धा कदाचित दहशतवादी टोळीकडूनच सोडून दिल्या जात असतील.
फ्रान्सचा हा हल्ला हा नुसताच भयानक नाही तर सगळय़ा जगाला हादरवून टाकणारा आहे. यात वापरलेले तंत्र हे अधिक भयावह आहे. केवळ दहशतवादीच नव्हे तर गावगुंडांच्या टोळय़ासुद्धा या पद्धतीने प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न करू शकतील. पोलीस खात्यामध्ये गुप्तहेर नावाची एक संघटना असते. या गुप्तहेर संघटनेला अशा टोळय़ांमध्ये काय चालले आहे, याच्या मागावर राहून ती माहिती काढायची असते. आज तरी असे दिसते आहे की, अशी माहिती काढून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे हे या यंत्रणेला फारसे जमलेले नाही. अर्थात इसिस सारख्या संघटनांना जागतिक पातळीवरून मोठय़ा प्रमाणात मदत मिळत नाही. अनेक वेळा हस्ते-परहस्ते पैसा आणि आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली जातात. एखाद्या देशाची राजधानी जेवढी सुंदर वसवली जाईल, तसे इसिसचे हे संकुल अद्ययावत वसवलेले आहे. अशा स्थितीत हल्ला झाल्यानंतर विविध देशांनी केवळ निषेधाचा सूर लावणे हा दिसायलाही विरोधभास दिसतो. अमेरिकेने इराक नष्ट करायचे आणि अमेरिकेनेच त्याची पुन्हा उभारणी करायची, हा जेवढा विरोधाभास आहे तितकाच दहशतवादाचा शाब्दिक निषेध आणि आतून दहशतवादाला मदत हाही विरोधीभासच आहे.