महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेला, ख-या अर्थाने लोकांचा उत्सव असलेला गणेश उत्सव शांततेत, आनंदात पार पडला. अर्थात उत्साहात पार पडला. मुंबईतील गणेश उत्सवाच्या विसर्जन दिवशी खुद्द वरूणराजा गणेशराजासाठी हजर झाले. कदाचित या वरूणराजाला प्रचंड उत्साह झालेला पाहायचा असावा म्हणून आकाशातून जलधारा कोसळू लागल्या.
अगदी गुरुवारच्या सकाळी आषाढाप्रमाणे पाऊस बरसला. ‘परतीचा पाऊस’ असे त्याला म्हटले गेले आणि विसर्जन मिरवणूक उत्साहावर या पावसाने पाणी फिरले, असे म्हटले गेले. पण दुस-या अर्थाने विचार केला, तर गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगळे १० दिवस हे भाद्रपदी पावसाळा याचेच आहेत. पुढच्या वर्षी तर आणखी ११ दिवस लवकर गणेश चतुर्थी येते. जसा श्रावण आणि भाद्रपद पावसाचे होते, कोकणात तुडुंब पाऊस. अलीकडच्या काही वर्षात रेल्वे धावली, विमानसेवा झाली, रस्ते झाले, पण ५०-१०० वर्षापूर्वी धो धो पावसात गणपती उत्सव साजरे व्हायचे. अनेक गावांना संपर्काचे साधन रस्ते नव्हते.
अनेक गावे होडय़ांनी पार करावे लागत. गणपतीसुद्धा होडीत प्रवास करे. आगमन आणि विसर्जनात धो धो पाऊस असायचा. अलीकडे पाऊसच कमी झाला. लोकांची अपेक्षा अशी की, आपल्या आनंदात पावसाचे विघ्न नको. पण ते कोणाच्याच हातात नाही. मुंबई, पुणे विसर्जनाचा दिवस हा तर विलक्षण दिवस असतो. घराघरांतील बालगोपाळ मंडळी आपल्या आई-बाबांचे बोट धरून उत्सव जत्रेत सामील होतात. मुंबईचे सागर किनारे फुलतात. शिटय़ा, फुगे, टोप्या, रेवडी, मक्याची कणसं याची चौपाटीवर रेलचेल असते. सागराला लाजवेल एवढा जनसागर. या वर्षी सकाळपासून पाऊस असून सायंकाळी थोडी उघडीप झाली. पण या उत्सवातला उत्साह एवढा मोठा की पावसाची पर्वा कोण करतो. पाऊस असतानाही मुंबईचे सागर किनारे ‘हाऊसफुल्ल’, रस्ते फुल्ल, पावसामुळे छत्र्यांचे संमेलन भरले. प्लास्टिक पिशवीत गणेशमूर्ती झाकल्या गेल्या. अडचणीत लोक मार्ग बरे काढतात.ढोलताशांची थोडी पंचाईत झाली. पण वाजवणा-यांचा उत्साह एवढा की ढोलताशांच्या चामडय़ांना पाणी लागले तरी यात फरक नाही पडला.
कौतुकाचा आणखी एक भाग म्हणजे या सगळ्या उत्सवात बाप्पाला निरोप द्यायला पुरुषांबरोबर भगिनी गिरगाव, दादर, वांद्रे, जुहू चौपाटीच्या किना-यांवर प्रचंड उत्साहात सामील झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय होऊन जातो. आता सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले. दिवस किंचित लहान होऊ लागला. दिवस मावळल्यावर मुंबई, पुणे, ठाण्यात उजाडू लागल्याचा भास होतो. अनेक मंडळांच्या गणपतींसमोर ट्रक, टेम्पोमधून बॅटरीवर चालणारी प्रकाशयंत्रणा, रोषणाई. दशदिशा उजळून झाल्यावर इतके प्रभावी वाटत होते. फटाकेवाले थोडे निराश झाले. भूईनळे, भूईचक्र फिरत होती. लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, वरळी हा खरा कामगार भाग. या भागातील सर्व गणेश राजे, मग लालबागचा राजा, परळचा राजा, वरळीचा राजा, सगळीकडे राजेच राजे. शिवाय यातले बहुसंख्य राजे आता मंडळातल्या जाहिरातीत तरी ‘नवसाला पावणारे’ राजे ठरलेले आहेत. त्यामुळे जणू काही सगळी मुंबई लालबाग, परळच्या रस्त्यावर उतरली होती. एवढय़ा प्रचंड गर्दीत सर्व श्रद्धाळूंच्या नजरा सागराकडे मंद पावले टाकत निघालेल्या गणरायाकडे लागलेल्या होत्या. कोण तांदूळ, कोण फुलं, कोण पैसे उधळी. वाद्यांच्या गजरात हळूहळू सागराकडे सरकत होत्या.
चौपाटीवरचे विलोभनीय दृश्य तर हजारो मनांना अचंबित करून टाकणारे. पावसातील आकाशात फुटणारे फटाके, सिंधुसागराच्या फुटणा-या लाटा, लांबलचक पसरलेली पुळण आणि आपल्या गणरायाला शिरोभागी घेऊन विसर्जनासाठी सागरतीरी पडणारी पावले. त्या प्रचंड गर्दीला स्वयंशिस्त. पोलिसांची चोख व्यवस्था. माईकवर दिल्या जाणा-या सूचना. संध्याकाळी, तर विद्युत दिव्यांनी न्हाऊन निघालेला चौपाटी किनारा. या भक्तिमय उत्सवातही केवढे मोठे काव्य दडलेले आहे.
अशा या १० दिवसांच्या उत्साही उत्सवाची सांगता अखेर शुक्रवारी पहाटेपर्यंत झाली. हा जो काही अवर्णनीय उत्साह आहे. त्याचा सचित्र वृत्तांत वाचकांपर्यंत पोहोचवायला शुक्रवारच्या सकाळी वृत्तपत्रे नव्हती हे गणरायाला खटकतच होते. पण काही विषयांवर औषध आणि उपास नसतो. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सारा महाराष्ट्र, कोकण आता वाहिन्यांमुळे पाहता आला तरी वृत्तपत्रांना तो २४ तासांनी द्यायचाय ही खंत मनोमन राहते.
पावसाची पर्वा न करता, हा जनतेचा उत्सव शांततेत, आनंदात पार पडला. या वर्षी सुदैवाने मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये गणेशाच्या कृपेने पाऊस उत्तम बरसलेला आहे. गेले पाऊण महिना पावसाने हात आखडता घेतला होता. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेला घास कोणी दुष्टपणे हिरावून घेतो काय, अशी भीती निर्माण झाली होती.
गणेशाच्या कृपेने त्या गणेशाचा उत्सव चालू असतानाच महाराष्ट्रात सर्वदूर अतिउत्तम पाऊस झाला आणि सारा महाराष्ट्र आणखी आनंदी झाला. गणेशाच्या कृपेने व अवकृपा होते ती त्याच्या शापाने. ‘जो करे, सो हरी करे’ असे श्रद्धाळू मनांना वाटतच असते, परतीच्या पावसाने मजा आणली. आता भरभरून पिके येतील. ज्वारी असो, कापूस असो, सोयाबिन, कोकणातले भात, विदर्भातील धान, बरोबर महिन्यांनी नवान्न पौर्णिमा येईल आणि शेतातील पिकांच्या लोंब्या दाराला तोरण म्हणून बांधल्या जातील. काय सुंदर कल्पना आहे ना. बघता बघता विसर्जन झाले. पितृपक्षही सुरू होणार. सोनेरी आश्विन या धरतीवर अलगद पाऊल ठेवेल. नवरात्र उजाडेल, नवरात्रीच्या नवरात्री एक वेगळा आनंद, वेगळा उत्साह, जीवनातली सर्व दु:खे, अडचणींची ओझी डोक्यावर असतानाही त्या सगळ्या उत्सवांमध्ये सामान्य माणसाला येणारा उत्साह कुठून येतो?
बघता बघता दसरा, दिवाळी येईल. नाताळ येईल, वर्ष संपेल. सूर्याभोवती फिरणा-या पृथ्वीचा आणखी एक फेरा कराल कालचक्राच्या दाढेत लुप्त होईल, आणि नव्या वर्षाचे स्वागत तर करण्यास आपण पुन्हा सिद्ध होऊ.