बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी भाजपा आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली- बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी भाजपा आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गौरी लंकेश यांनी आरएसएस आणि भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर आज त्या जीवंत असत्या, असे भाजपा आमदार आणि माजी मंत्री डी. एन. जीवराज म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले. त्यांच्या हत्येनंतर गौरी लंकेश यांनीही त्यांच्याविरोधात लिखाण केले. तसे लिखाण त्यांनी केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या. गौरी लंकेश या माझ्या बहिणीसारख्या आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी भाजपा आणि संघाविरोधात लिखाण केले ते साफ चुकीचे होते, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जीवराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जीवराज अशा प्रकारचे वक्तव्य कसे काय करू शकतात? गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, हेच त्यांना सांगायचे आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शृंगेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी ‘मी असे वक्तव्य केले नाही’ असे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. सिद्धरामय्या सरकारने याआधी झालेल्या हत्यांच्या प्रकरणांत योग्य तपास करून आरोपींना गजाआड केले असते तर लंकेश यांची हत्या झालीच नसती. मागील काळात झालेल्या हत्यांचा छडा लावण्यात सिद्धरामय्या सरकार अपयशी ठरले आहे, हेच मला म्हणायचे होते. उलट लंकेश यांच्या हत्येचा मी निषेधच केला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी ‘द हिंदू’ या वृत्तांशी बोलताना दिली.