संघातील फूट जरी गोव्यापुरती मर्यादित असली तरी आता तिची लागण देशभर जाईल. कारण संघाच्या नेत्यांनी संघाला आणि त्यांच्या स्वयंसेवकांना वापरून घेतलेले आहे. आणि हे ‘वापरणे’ आता संघ स्वयंसेवकांच्या लक्षात आलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फूट पडली आहे. संघ ९१ वर्षाचा आहे. २०२५मध्ये संघाची जन्मशताब्दी होईल. या देशातील कम्युनिस्ट पक्षही ९१ वर्षाचा आहे. संघ आणि कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२५मध्ये म्हणजे एकाच वेळी झाली. कम्युनिस्ट जगातून कालबाह्य झाले. अगदी रशिया आणि चीनलाही बदलावे लागले. काळाच्या रेटय़ात ते अपरिहार्य आहे. त्यामुळे कम्युनिस्टांची मूळ विचारधारा साम्यवादी ठेवून जगातील बदल रशिया आणि चीनने स्वीकारले. दिसायला कम्युनिस्टांची राजवट, पण भांडवलशाहीचा तिथे नकळत स्वीकार केला गेला. तो अपरिहार्य होता. संघातील फूट आणि त्याचे कारण काहीसे वेगळे असले, तरी ९१ वर्षे ज्या पद्धतीने संघ दबलेल्या अवस्थेत आहे आणि तो ‘दक्ष आणि आराम’मधून बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचे पडसाद वेगवेगळ्या कारणांनी उमटणे अगदी अपरिहार्य आहे. संघातील फूट जरी गोव्यापुरती मर्यादित असली तरी आता तिची लागण देशभर जाईल. कारण संघाच्या नेत्यांनी संघाला आणि त्यांच्या स्वयंसेवकांना वापरून घेतलेले आहे. आणि हे ‘वापरणे’ आता संघ स्वयंसेवकांच्या लक्षात आलेले आहे. या सशस्त्र फौजेचा उपयोग निवडणुकीपुरता करायचा, भाजपाला त्यातून मदत द्यायची आणि त्यानंतर संघाच्या स्वयंसेवकांना दुय्यम, तिय्यम वागणूक द्यायची, यामुळे संघ स्वयंसेवक दडपले जात होते. आता संघचालक वेलिंगकर यांच्या रूपाने या दडपशाहीविरुद्ध संघात आवाज उठला आहे. गोवा राज्याच्या निवडणुका तोंडावर आहेत. वेलिंगकर यांना मानणा-या संघ स्वयंसेवकांनी भाजपा उमेदवारांना पराभूत करण्यासाठी कंबर कसलेली आहे. गोव्यातील बंडखोर संघ स्वयंसेवकांच्या मेळाव्यात तशी घोषणाच करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून संघाची फूट चव्हाटय़ावर आली.
संघ ही राजकीय संघटना नाही, असे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी ठामपणे सांगितले होते. संघामध्ये स्वयंसेवक म्हणून फक्त हिंदूंना प्रवेश आहे, असेही सांगण्यात आले; तर मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध यांना संघ शाखेमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे हे सशस्त्र संघटन एका धर्मापुरते मर्यादित झाले. शिवाय संघाचे विचार पहिल्या दिवसापासून एका धर्माच्या भोवती फिरत राहिले. हा देश एका धर्माचा कधीच होऊ शकत नाही. ज्यांनी ज्यांनी तसा प्रयत्न केला ते ते धर्मवादी ठरले आणि असहिष्णूही बनत गेले. ज्यांना हा देश एका धर्माचा करायचा आहे, आणि हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना ज्यांच्या डोक्यात बसलेली आहे त्यांना या देशात एका धर्माचे राज्य करणे कधीही शक्य होणार नाही. कारण या देशाचे मुख्य शक्तिस्थान ‘विविधतेमध्ये दडलेली एकता’ हेच आहे. या देशातील विविध धर्म, विविध जाती, पोटजाती, विविध प्रांतांची रचना, आहार-विहार, पोशाख, चालीरीती, सण-वार हे इतके भिन्न आहेत की, या भिन्नतेमध्येच एक अभिन्नताही दडलेली आहे. त्यामुळे केरळचा ओणम्, तामिळनाडूचा पोंगल किंवा राजस्थानचे करवाचौथ हे सण एका प्रांताचे न राहता देशाचे होतात; हेच या देशाचे सामर्थ्य आहे. संघाला ते कधी कळले नाही. संघाने इतका संकुचित विचार केला की, सर्व हिंदुधर्मासाठी संघ शाखा खुल्या असल्याचे वरवर भासवण्यात आले तरी प्रामुख्याने संघ शाखा आणि संघप्रमुख ही उच्चवर्णीयांसाठीच निर्माण केलेली संघटना आहे, हे काही लपून राहिलेले नाही. त्यामुळे संघाचा प्रमुख हेडगेवार, गोळवलकर, सुदर्शन, देवरस आणि भागवत या जातींच्या पलीकडे कोणी होऊ शकला नाही. शिवाय संघाचे वळण असे की, त्यांचा या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. स्वातंत्र्याची चळवळ जोरात असताना हेडगेवार आणि गोळवलकर लहान नव्हते. वाजपेयी किंवा अडवाणीही नव्हते. पण संघ स्वयंसेवक बनवणा-या यापैकी कुणीही स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला नाही आणि त्या लढाईत या संघ स्वयंसेवकांना ओरखडाही आला नाही. शिवाय संघाने त्यांच्या शाखेवर राष्ट्रीय दिवस पाळण्याची तसदी कधीही घेतली नाही. संघ शाखेवर देशाचा राष्ट्रध्वज कधीही फडकला नाही. ९ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनाला संघाने कधीही मान्यता दिलेली नाही. भारताचे राष्ट्रगीत संघ शाखेवर कधी घुमले नाही.
‘नमस्ते सदावत्सले’च्या बाहेर संघ शाखा कधी आली नाही. संघ स्वयंसेवकांसाठी जे प्रात:स्मरण म्हटले जाते, त्या प्रात:स्मरणातसुद्धा या देशाचे मानबिंदू असलेले महात्मा गांधी यांचा उल्लेख नाही. समानतेचे लढाऊ नेते शाहू, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचा उल्लेख नाही. त्यामुळे संघाने आपली विचारसरणी अत्यंत संकुचित आणि मर्यादित ठेवली. शिवाय या देशाच्या सामाजिक ऋणाचे भानही संघाने ठेवले नाही. पाच-पाच, सात-सात वर्षे उच्चशिक्षण घेऊन इंजिनीअर झालेले, वैज्ञानिक झालेले, वैद्यकीय क्षेत्रात निष्णांत झालेल्या अशा उच्चविद्याविभूषित स्वयंसेवकांच्या शिक्षणाचा या देशाला कधीही उपयोग झाला नाही. असे उच्चशिक्षित अनेक स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले. पण मी ज्या सामाजिक व्यवस्थेतून सिव्हिल इंजिनीअर बनलो त्या माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजाला मी विनावेतन करून देतो. राज्यांतील पुलांची डिझाईन मी करून देतो, असे म्हणायला एकही इंजिनीअर संघ प्रचारक पुढे आला नाही.
अशा या संघात धुसफूस वाढणे अत्यंत स्वाभाविक आहे. शामाप्रसाद मुखर्जीनी १९५२मध्ये जनसंघाची स्थापना केली तेव्हा त्यांची निशाणी पणती होती. पण त्या राजकीय पक्षामागे गोळवलकर गुरुजींचे तत्त्वज्ञान होते. संघ राजकारणात नव्हता आणि जनसंघ राजकीयदृष्टय़ा वाढत नव्हता. त्याच वेळी आणीबाणीचा फायदा घेऊन जनसंघाचा भाजपा झाला आणि तो जनता पक्षात घुसला; आणि मग संघवाल्यांच्या लक्षात आले की, राजकारणातही धर्मवादाचा आश्रय घेतला पाहिजे. त्यातून मग गंगा उगवली. राजकारणात गाईला महत्त्व दिले गेले. ‘देश धर्म का नाता है.. गाय हमारी माता है..’ या घोषणांचा उपयोग राजकारणासाठी केला गेला.. देशातील हिंदू, साधू आणि बैरागींना रस्त्यावर उतरवले गेले. गंगेच्या पाण्याच्या बाटल्या दहा रुपयांना विकल्या गेल्या. मग वनवासात गेलेल्या रामाची आठवण त्यांना झाली. त्यातून ‘वही बनायेंगे’ आले. लोकांच्या भावनेशी खेळ खेळून भाजपाच्या आड दडलेल्या संघवाल्यांनी उत्तर प्रदेश जिंकला. पण तिथल्या भोळ्या जनतेला हे भाजपावाले किती लबाड आहेत हे कळून चुकले. मग बाबरी मशीद पाडण्यात आली. एका टोकाच्या अराजकाची परिस्थिती या देशात संघ-भाजपावाल्यांनी निर्माण केली आणि त्यातूनच २०१४ मध्ये भाजपाची मंडळी सत्तेवर आली. पण लोकांना काही वेळ मूर्ख बनवता आले तरी सर्व वेळ मूर्ख बनवता येत नाही. हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्याचाच भाग म्हणून संघामध्येच बंडाचे वारे सुरू झाले; आणि संघाचे स्वयंसेवक आता भाजपाला पराभूत करणार आहेत. एक दिवस हे होणारच होते. ज्या पोर्तुगिजांची राजवट गोव्यातील जनतेने उलथून टाकली, त्याच गोव्यातील जनता संघ स्वयंसेवकांच्या रूपाने आता भाजपाचे राज्य उलथवून टाकायला सिद्ध झाली आहे. संघातील हे बंड देशभर पसरेल. तिकडे गुजरात पेटले आहे.. तिकडे गोव्यात वणवा भडकला आहे.. भाजपाचे दिवस भरत आले आहेत.