मुंबईत सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई- मुंबईत सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी सायन-माटुंगा-कुर्ला दरम्यान रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.
दुपारनंतर रुळांवर साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी तिन्ही मार्गावरील लोकल सध्या उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
पहाटेपासून कोसळणा-या मुसळधार पावसाने सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधा उडवली. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे सेवा कोलमडली होती. मुंबईतील दादर, परळ आणि वरळीमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर बोरीवली, कांदिवली, अंधेरी, वांद्र्यासह ठाणे कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मिलन सबवे, हिंदमाता, शीव, किंग्ज सर्कल, एलफिस्टन रोड, नॅशनल कॉलेज वांद्रे परिसरात पाणी साचले.
कुर्ला, चेंबूर, घाटकोपर या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूकही मंदावली आहे.
अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. सखल भागात पाणी साचू लागल्याने काही बसचा मार्गही बदलण्यात आला.
पालघर, वसई, विरार, ठाणे कल्याण, नवी मुंबई भागात शुक्रवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला. मुसळधार पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि लो व्हिजीबिलिटीमुळे सर्व विमानांची उड्डाण तूर्त रद्द करण्यात आली.
सायंकाळी मुंबईतील पावसाचा जोर मंदावला. साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
मुंबईत विविध ठिकाणी १५ झाडे कोसळल्याचे वृत्त आहे. यापैकी पूर्व उपनगरात ५ झाडे तर पश्चिम उपनगरात १० झाडे पडली. त्यातच रस्त्यांवर खड्ड्यांची भर आहे. त्यामुळे मुलुंड टोलनाका ते कांजूर मार्ग, मुलुंड ते घाटकोपर, एलबीएस रोड, जेव्हीएलआर रोड, पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, लिंक रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.