९०च्या दशकात भारतात आयटी कंपन्यांचा उदय झाला. उदारीकरणाच्या पर्वात आयटी कंपन्यांना इतके वलय प्राप्त झाले की, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना कमालीचे महत्त्व आणि ग्लॅमर आले. कारण भारतात तेव्हा इंटरनेटचा वापर कमालीचा वाढला. तो आजही थांबलेला नाही.
संगणकीकरणाचे युग आले आणि सॉफ्टवेअर इंजिनीअरना भाव आला. ते शिकवणा-या महाविद्यालयांनाही भाव चढला आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर झालेला २१-२२ वर्षाच्या तरुण-तरुणीही एकदम ६० हजार इतके वेतन घेऊ लागल्या. सर्वानाच आयटीचे इतके वेड लागले की, सॉफ्टवेअर इंजिनीअरचे अभ्यासक्रम शिकवणा-या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागू लागल्या. त्यांच्या चकचकीत इमारती आणि तेथील दिमाखदार स्टाफ पाहूनच डोळे फिरत असत. त्यांचे डोनेशन्स लाखांच्या घरात गेले. ही एक लाटच आली होती.
तसेही आपल्याकडे नेहमी कसल्या ना कसल्या लाटा येतच असतात. पूर्वी कॉमर्सची लाट होती, नंतर अभियांत्रिकीची आली आणि नंतर सॉफ्टवेअरची लाट आली. नव्वदच्या दशकात लग्नाच्या बाजारातही सॉफ्टवेअर इंजिनीअरला पहिली मागणी असे. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, सध्या आयटी कंपन्यांना अगदीच वाईट दिवस आले आहेत. आयटीची सारी ऐट गेली आहे.
गेल्या दोन वर्षात भारतातील टीसीएस, इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दादा कंपन्यांचीही हालत झाली आहे. त्यांचे आर्थिक निष्कर्ष पाहिले असता त्यांच्या नफ्यात चांगलीच घट झाल्याचे दिसते. आर्थिक वर्ष २०१६ मध्ये तर या कंपन्यांनी अगदीच हाय खाल्ली आहे. टीसीएस आणि इन्फोसिससारख्या कंपन्यांनाही बदलत्या परिस्थितीचा फटका बसला आहे. आयटी कंपन्यांना फटका बसला आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदगतीने होत असलेल्या वाढीचा. किंवा थोडक्यात असे म्हणता येईल की जागतिक अर्थव्यवस्थेच्या खराब अवस्थेमुळे त्यांच्यावर ही आपत्ती ओढवली आहे.
आर्थिक र्वष २०१६ मधील तिमाहीतील निष्कर्ष पाहिल्यास आयटी कंपन्यांचे लक्ष्य चुकले असल्याचे स्पष्ट दिसते. बाजारातील वास्तवाचे आकलन करण्यात त्यांना अपयश आले आहे. अगदी इन्फोसिससारख्या कंपनीलाही बाजाराची नाडी ओळखता आलेली नाही.
आयटी कंपन्यांवर ही आपत्ती ओढवली ती कंपन्यांनी ऊर्जा, टेलिकॉम, उत्पादन क्षेत्रातील खर्च कमी केल्यामुळे. त्यात आयटी कंपन्यांचे नुकसान झाले आहे. कारण मूळच्या कंपन्याच्या उत्पादनांनाच मुळात जास्त मागणी नसल्याने आयटी कंपन्यांची सेवा घेण्यास त्या कचरत आहेत.
काहींनी तर आऊटसोर्सिग बंदच करून टाकले आहे. त्यातच नव्याने होत असलेल्या मागण्या या एसएमएसी (सोशल, मोबाईल, अॅनालिटिक्स आणि क्लाऊड) या क्षेत्रातील असून त्या हाती घेण्यासाठी भारतातील आयटी कंपन्या योग्य स्थितीत नाहीत, ही दुसरी गोष्ट आयटी कंपन्यांची चिंता वाढवणारी आहे.
याचा मोठा तोटा म्हणजे आयटी कंपन्यांचा बाजारातील हिस्सा कमी होत आहे. मुळात भारतातील आयटी कंपन्यांचे ६० टक्के उत्पन्न येते अमेरिकेतील बाजारपेठेतून. परंतु सध्या अमेरिकन बाजारपेठेचीच अवस्था खूप वाईट आहे. त्यातून सावरायला तिला अनेक वर्षे लागतील.
उत्पादने तयार असूनही तेथे खरेदीदार नाहीत. या संकटात सापडलेल्या अमेरिकन कंपन्या व्यावसायिक विस्तारावर खर्च करण्यास तयार नाहीत. त्याउलट त्या आपल्याकडील अतिरिक्त निधीचा उपयोग बाय बॅकची घोषणा करण्यासाठी वापरत आहेत. याचा साधा अर्थ असा की, अमेरिकन कंपन्या आता आयटी कंपन्यांची आऊटसोर्सिग सेवा घेण्यास उत्सुक नाहीत.
भारतीय आयटी कंपन्यांना आऊटसोर्सिगचा व्यवसाय मिळाला नाही तर त्या बुडणार आहेत. कारण त्यांचा व्यवसायच आऊटसोर्सिगवर अवलंबून आहे. परंतु हा धोका आज नाही तरी काही वर्षानी खरा होईल, असे जाणवते आहे. अमेरिकेतील व्यावसायिक उदास वातावरणाचे सावट भारतीय आयटी उद्योगावर पसरलेले दिसते. त्यामुळे इन्फोसिस आणि विप्रोसारख्या कंपन्यांनी काटकसरीचे उपाय योजण्यास सुरुवात केली. त्यातून ऑटोमेशनचा शिरकाव झाला. या ऑटोमेशनचे वेड आता इतके सर्वव्यापी झाले आहे की, सर्वच आयटी कंपन्यांनी कमीत कमी कर्मचा-यांमध्ये कंपनी चालवण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
उदाहरणार्थ जी इन्फोसिस दरवर्षी कॅम्पस मुलाखतीतून वीस हजार इंजिनीअर्सना नोक-या देत होती, तिने यंदा हा आकडा अवघ्या ३ हजारांवर आणण्याचे ठरवले आहे. विप्रोने तिच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. सर्वच आयटी कंपन्यांनी एन्ट्री लेव्हलच्या म्हणजे सुरुवातीच्याच रोजगारांसाठी आता नवीन इंजिनीअर घेणे बंद केले आहे. त्यासाठी ते आहे त्या कर्मचा-यांमधूनच कामे करून घेतली जाणार आहे.
बेंच स्ट्रेंग्थ कमीत कमी ठेवण्याकडे या कंपन्यांचा कल आहे. आपल्याकडील कर्मचा-यांना वेगवेगळी कौशल्ये शिकवून नवीन कर्मचारी घ्यायचेच नाहीत, हे त्यांचे धोरण भारतातील बेरोजगारी वाढवणारे आहे. इतर क्षेत्रात मंदी असताना आयटी क्षेत्रानेही मान टाकली तर भयंकर अनर्थ ओढवणार आहे.
खरे तर आयटी क्षेत्र हे रोजगार देणारे तिस-या क्रमांकाचे क्षेत्र आहे. प्रथम शेती, नंतर उत्पादन आणि त्यानंतर आयटी कंपन्यांत रोजगार दिले जातात. परंतु शेतीची तर कधीच वाट लागली आहे. शेतीत शेतकरी स्वत:चेच कुटुंबाचे पोट भरू शकत नाही, तेथे तो रोजगार काय देऊ शकणार. त्यामुळे जास्तीत जास्त लोक इतर क्षेत्राकडे वळले. परंतु उत्पादन क्षेत्राची वाढ खुंटली आहे. त्यामुळे रोजगाराचे महत्त्वाचे क्षेत्र निकामी झाले. आता पाळी आहे ती आयटी कंपन्यांची.
आयटी उद्योग एकेकाळी जो भारतात फोफावला होता तो आता क्षीण झाला आहे. त्यातून आता मोठया प्रमाणावर रोजगार मिळण्याची शक्यता अजिबातच नाही. आयटी कंपन्या संकटात सापडणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहेच, परंतु बेरोजगारी त्यामुळे कमालीची वाढणार आहे. त्याची चुणूक आजच पाहायला मिळत आहे. आयटी कंपन्या सोडून जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ते रोखण्यास कंपन्या अपयशी ठरत आहेत.
अगदी इन्फोसिससारखी कंपनीही त्यातून सुटलेली नाही. विशाल सिक्का सध्या कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांच्या काळात एका वर्षात तब्बल १२ एक्झेक्युटिव्हज सोडून गेले आहेत. विप्रोसारख्या कंपनीत कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण जूनच्या तिमाहीत १७.९ टक्के होते. त्यामुळे यांचा नफा सर्वात कमी झाला आहे.
आयटी कंपन्यांचे संकट हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट आहे, असे समजायला हवे. कारण त्यातून भारतात बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे. पूर्वीसारखे आता तरुण सॉफ्टवेअरचा कोणताही डिप्लोमा करून आयटी कंपनीत मोठया पगारावर नोकरी मिळवू शकणार नाहीत. आकडेवारीवरून आयटी उद्योगाचा भारतात विस्तार कसा झाला, याची कल्पना येते.
आयटी कंपन्यांचा उदय झाला तेव्हा १९९८ मध्ये आयटी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा होता १.२ टक्के. २०१२ मध्ये तो वाटा झाला ७.५ टक्के. इतक्या वेगाने आयटी उद्योग वाढला होता. २०१५ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न होते १४७ अब्ज डॉलर. म्हणजे ही वाढ झाली १३ टक्क्य़ांनी.
आयटी उद्योगाची मदार आहे निर्यातीवर आणि ते प्रमाण आहे ७७ टक्के. कारण येथून सॉफ्टवेअरची निर्यात केली जाते. परंतु ज्या अमेरिकेवर या उद्योगाला प्रमुख उत्पन्न येते, तेथेच कंपन्या संकटात असल्याने कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणून या आयटी कंपन्या अडचणीत आल्या आहेत. त्यांची अडचण मजा म्हणून पाहत बसण्यासारखी नाही. कारण लोकांना रोजगार मिळाले नाहीत तर गुन्हेगारीचा भस्मासुर निर्माण होतो. त्यातून अराजक उदयाला येते. आपण या अराजकाच्या उंबरठयावर तसेही बसलो आहोतच.