महाराष्ट्राचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या उमेदवाराला कपबशी निवडणूक चिन्ह देण्याची निवडणूक अधिका-यावर केलेली बळजबरी त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गाडीत नगर परिषद निवडणूक काळात सापडलेले ९१ लाख रुपये, त्याबद्दल त्यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, गुन्ह्यातील त्यांनी दिलेली कबुली याविरोधात मंगळवारी विधानसभेत प्रचंड वादळ उठणार असून दोन्ही मंत्र्यांना पळताभुई थोडी केली जाईल आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होईल.
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज मोठया वादळाने सुरू होत असून आपल्या उमेदवाराला ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह देण्याची सूचना करणा-या पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष गोंधळ घालणार आहेत. इतर मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे जानकरांना क्लीनचिट देतात की काय ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण मुख्यमंत्री बचावाला धावले तर विरोधक अधिक आक्रमक होण्याची लक्षणे आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक जानकर हे सरकारसाठी सुरुवातीपासून डोकेदुखी ठरले आहेत. विदर्भातील वडसा-देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीत मर्जीतील उमेदवाराला ‘कपबशी’ चिन्ह देण्याची सूचना निवडणूक अधिका-याला केल्यावरून निवडणूक आयोगाने जानकरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी होणार आहे.
सुभाष देशमुख आणि इतर मंत्रीही विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे हा आठवडा गरमागरमीत जाणार आहे. हा अखेरचा आठवडा असून वेळापत्रकाप्रमाणे १७ डिसेंबरला अधिवेशनाचे सूप वाजेल. पहिल्या आठवडयात नोटाबंदी आणि मराठा आरक्षणावरील चर्चा वगळता खास कामकाज होऊ शकले नाही. आजही काही होण्याची शक्यता कमी आहे. नुसता गोंधळ होईल. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी यासाठी मोठा दारूगोळा विरोधकांच्या हाती दिला आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १३ मंत्री भ्रष्ट असून त्यांच्यावर विविध आरोप यापूर्वी?झालेले आहेत. तसेच काही मंत्र्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांना क्लीनचिट दिली होती आणि विधान परिषदेला खोटी माहिती पुरवली, ते संभाजी पाटील-निंलगेकर हे फक्त कर्जाला जामीन आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्याच संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर ४२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा सीबीआयचा गुन्हा दाखल झालेला आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेमध्ये शेतक-यांची ७२ कोटींची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. शिवाय नगर परिषद निवडणुकीच्या काळात लोकमंगलच्या गाडीत ९१ लाख रुपये सापडले. त्याचा पंचनामा झाला आणि या गुन्ह्याची कबुली खुद्द सुभाष देशमुख यांना द्यावी लागली होती. कबुली देऊनसुद्धा त्यांना काही शिक्षा झाली नाही आणि आणखी एक मंत्री राजकुमार रावळ यांच्या दोंडाईच्या घरांच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यावर अनेक आरोप आहेत. या सगळय़ांचा पंचनामा मंगळवारी विधानसभेत होईल.