विधान मंडळात महिलांचे प्रश्न मांडणा-या शिवसेनेच्या सदस्या निलम गो-हे यांना अत्यंत वाईट शब्दांमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई- विधान मंडळात महिलांचे प्रश्न मांडणा-या शिवसेनेच्या सदस्या निलम गो-हे यांना अत्यंत वाईट शब्दांमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विधान भवनात महिलांचे प्रश्न मांडणा-या आमदारच सुरक्षित नसतील तर इतर महिला कशा सुरक्षित राहणार, असा सवाल शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केला. त्याला सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी जोरदार समर्थन केले.
शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर अत्यंत गलिच्छ भाषेत मेसेज पाठविले होते. याबाबत गो-हे यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
हा मुद्दा जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहात उपस्थित केला. जयंत पाटील म्हणाले की, निलम गो-हे या शिवसेनेच्या प्रवक्त्याही आहेत. काही वृत्त वाहिन्यांवर त्यांना चर्चेसाठी पाचारण केले जाते. त्यात आपली मते मांडताना काही प्रश्न उपस्थित केले म्हणून त्यांना अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या. अशा प्रकारची दडपशाही पुढे चालू राहिली, तर कुणीच आपले मत निर्भयपणे मांडू शकणार नाही. महिला आमदारच सुरक्षित नसतील इतर महिला सुरक्षित असतील, अशी अपेक्षा आपण कशी काय करणार, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या सदस्य निलम गो-हे यांच्याबाबतीत घडलेली ही घटना गंभीर आहे, असे सांगून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, ही माहिती मिळाल्यानंतर आपण त्यांना तातडीने फोन करून धीर दिला होता. त्यांनी या प्रकाराची तक्रारही केली आहे. अजून त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही. सत्ताधारी आमदारांबाबत हे घडत असेल तर त्याच्या मागे कोणत्या प्रवृत्ती आहेत, ते शोधून काढले पाहिजे, असेही मुंडे म्हणाले.
विधिमंडळाच्या दोन महिला आमदारांच्या बाबतीत धमकी देण्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहेत, असे सांगून सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, सरकारने याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. यामागे कोणत्या हीन प्रवृत्ती आहेत, त्यांची मानसिकता काय आहे, याबाबत सरकारने चौकशी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापती रामराजे निबांळकर यांनी दिले.