कबड्डी वर्ल्डकपला कालपासून गुजरातमध्ये सुरुवात झाली. प्रो-कबड्डी लीगमुळे जगभरात पोहोचलेली कबड्डी पाहता वर्ल्डकपची उत्सुकता लागून राहिली आहे.
अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ मजबूत आणि तुल्यबळ आहे. मात्र या संघात महाराष्ट्राचा एकही खेळाडू नसल्याची खंत वाटते. ज्या महाराष्ट्राने भारताला, जगाला कबड्डी खेळ दिला, त्याच महाराष्ट्राला विश्वचषक स्पर्धेत सापत्न वागणूक दिली गेली. संभाव्य संघात महाराष्ट्राचे काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, विशाल माने, सचिन शिंगाडे आणि गिरीश ईरनाक असे अर्धा डझन कबड्डीपटू होते.
मात्र एकालाही १४ जणांच्या अंतिम संघात स्थान देण्यात आले नाही. या कबड्डीपटूंना का वगळण्यात आले, भारतीय हौशी कबड्डी महासंघाला कुणीही जाब विचारला नाही. यातच सर्वकाही आले. संघ निवडीसाठी गुणवत्ता हा निकष लावला तर आमच्या कबड्डीपटूंकडे गुणवत्ता नाही का, असा प्रश्न विचारण्याचे धाडस महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या एकाही पदाधिका-याने केले नाही. महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना वर्ल्डकपमधून वगळण्यात आले, हे असोसिएशनला प्रसारमाध्यमांमार्फत कळले.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने चार दिवसांनंतर पत्रक काढून निषेध केला. केवळ निषेधाचे पत्र काढून चालणार नाही. पदाधिका-यांनी जाब विचारला पाहिले. आपल्या राज्य असोसिएशनचा राष्ट्रीय स्तरावर अजिबात प्रभाव नाही. हे यापूर्वी म्हणजे प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या आवृत्तीपासूनच दिसून आले. लीगच्या पहिल्या हंगामाचा उद्घाटन कार्यक्रमाला मुंबईत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा एकही पदाधिकारी मंचकावर दिसला नव्हता. त्यांना आमंत्रित केले नव्हते की त्यावेळची सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता म्हणून त्यांनी अंग काढून घेतले, हे कळले नाही. प्रो-कबड्डी लीगमध्येही महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना किती स्थान आहे. किमान २० ते २५ कबड्डीपटू महाराष्ट्राचे आहेत. याउलट सर्वाधिक कबड्डीपटू हरयाणाचे आहेत. त्यांनी प्रो-कबड्डी काबीज केली आहे. वर्ल्डकप संघातही तेच चित्र दिसले. आजवरच्या कबड्डी वर्ल्डकप जेतेपदात महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंचा मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्रात सवरेत्कृष्ट प्रतिसाद लाभला म्हणून प्रो-कबड्डी तरली आहे. मात्र या सर्व गोष्टी आता भूतकाळ झाल्या आहेत. हे झाले कबड्डीपटूंबाबत. आयोजनाबाबतही महाराष्ट्राला यंदा डावलण्यात आले. यापूर्वीचे दोन वर्ल्डकप महाराष्ट्रात झाले. पहिला वर्ल्डकप २००४ मध्ये मुंबईत झाला. मागील म्हणजे दुसरा वर्ल्डकप पनवेलमध्ये (रायगड) झाला. यंदाचा (२०१६) वर्ल्डकप गुजरातमध्ये होत आहे. गुजरातचे कबड्डीमध्ये काय योगदान आहे? प्रो-कबड्डी लीगचे चार हंगाम झाले. या हंगामातील सामने मुंबईसह (महाराष्ट्र), जयपूर (राजस्थान), हैदराबाद, पाटणा (बिहार), बंगळूरु (कर्नाटक), कोलकाता (पश्चिम बंगाल) नवी दिल्ली या शहरांमध्ये झाले. गुजरातमध्ये कबड्डीप्रेमी असते तर प्रो-कबड्डी लीगचे सामने का खेळवले नाहीत? गुजरातमध्ये कबड्डीची अजिबात ‘क्रेझ’ नाही. मात्र केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तसेच भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे सरचिटणीस दिनेश पटेल यांच्यामुळे तिस-या वर्ल्डकपचे यजमानपद गुजरात मिळाले. महाराष्ट्रात मुंबईसह अलिबागमध्ये झालेल्या वर्ल्डकपला चांगला प्रतिसाद मिळाला.
गुजरातमध्ये तशी गर्दी पाहायला मिळते का, याचे उत्तर लवकरच समजेल. वर्ल्डकपबाबत बोलायचे तर दुस-या आणि तिस-या वर्ल्डकपमध्ये एका तपाचे अंतर आहे. या दरम्यान म्हणजे २०११मध्ये महिलांचा वर्ल्डकप झाला. तो वर्ल्डकप कोलकत्यात रंगला. एकूणच विद्यमान वर्ल्डकप हा पुरुषांचा तिसरा आणि एकूण चौथा वर्ल्डकप आहे. यापूर्वीच्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये मिळून २७ देशांचे सहभागी झाले होते. आजवरच्या वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. दोन्ही खेपेस इराणचा संघ अंतिम फेरीत खेळला. दुस-या वर्ल्डकपमध्ये चांगलाच नडलाही. मात्र यजमानांनी वर्चस्व राखले. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जगभरातील १२ देशांचे संघ सहभागी झालेत. त्यात गतविजेता आणि यजमान भारतासह गतउपविजेता इराण, बांगलादेश, जपान, दक्षिण कोरिया, थायलंड हे आशियाई खंडातील देशांचा सहभाग आहे.
भारतात पुन्हा एकदा होत असलेला वर्ल्डकप गुजरातमध्ये होत नसला तरी यशस्वी व्हावा, ही अपेक्षा. मात्र संघ निवडीवरून महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाबद्दल महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने राष्ट्रीय असोसिएशनला जाब विचारण्याची आवश्यकता आहे. तसेच न झाल्यास गुणवत्ता असूनही महाराष्ट्राचे कबड्डीपटू संघाबाहेर तसेच गुणवत्ता नसलेले अन्य राज्यांचे कबड्डीपटू संघात असेच चित्र आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धात दिसेल.