लार्सन अँड टुब्रोने आपल्या कंपनीतील १४ हजार कर्मचा-यांना यंदा नारळ दिला आहे.
मुंबई- लार्सन अँड टुब्रोने आपल्या कंपनीतील १४ हजार कर्मचा-यांना यंदा नारळ दिला आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी आर. शंकररामन यांनी सांगितले की, व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत नसल्यास आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. व्यवसाय सुधारण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे कंपनीने खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. आमच्याकडे १.२ लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी आम्ही १४ हजार कर्मचा-यांना नारळ दिला आहे.
ते म्हणाले की, वित्त सेवा क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. तसेच खनिज व धातू क्षेत्रात स्पर्धा आहे. कंपनी आपल्या व्यवसायाकडे दुस-या नजरेने पाहत आहे. तसेच गरज पडल्यास डिजिटलाझेशनचा वापर करेल. जे चांगले काम करत नाहीत किंवा ज्यांची गती अत्यंत कमी आहे त्या कर्मचा-यांना ‘ले ऑफ’ दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
कंपनीचे बॅक ऑफिसचे काम अधिक डिजिटल केले जात आहे. कंपनीचा महसूल ४६,८८५ कोटी रुपये झाला असून नफा २,०४४ कोटी झाला. कंपनीने महसूल दोन लाख कोटी रुपयांवर नेण्यासाठी पाच वर्षाचे धोरण आखले आहे. जे व्यवसाय चांगली कामगिरी करत नाहीत त्यांचे पुनर्विलोकन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.