पंतप्रधानांनी झापल्यामुळे नाचक्की झालेल्या शिवसेनेने ‘आम्हाला झापलेच नाही, फक्त चर्चा झाली’, अशी सारवासारव केली आहे.
मुंबई- आम्हाला झापलेच नाही, फक्त चर्चा झाली. ‘‘मी वर गेलो तर चांगले काम केले, असे बाळासाहेबांना सांगेल, तुम्ही काय उत्तर देणार?’’ एवढंच तर मोदी म्हणाले. अशी केविलवाणी सारवासारव शिवसेनेने केली आहे. पंतप्रधानांनी झापल्यामुळे शिवसेनेची जी नाचक्की झाली आहे. ती असल्या खुलाशांनी भरून निघणार नाही. शिवसेनेच्या या खुलाशावर ‘बूंद से गयी ओ हौदसे नही आती!’ अशी प्रतिक्रिया आता सामान्य माणसांतून उमटत आहे.
नोटा बंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात शिवसेनेने फूरफूर सुरू केली होती. इतकेच नव्हे तर नोटा बंदीच्या विरोधात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चातही शिवसेना सहभागी झाली होती. एकीकडे सत्तेत सामील व्हायचे आणि दुसरीकडे सरकारच्या विरोधातच बोलायचे या शिवसेनेच्या दुटप्पी धोरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेत, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची कानउघडणी केली होती. ‘‘मी जेव्हा वर जाईल तेव्हा मी चांगले काम करून आलो आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगू शकेल. तुमची हिंमत होईल का?’’ अशा शब्दात पंतप्रधानांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सुनावले होते. मोदी यांनी शिवसेनाप्रमुखांचे नाव काढताच खरे तर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खणखणीत भाषेत सुनवायला पाहिजे होते. मात्र त्यांनी तिथे नांगी टाकली. कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे धाडस शिवसेनेच्या एकाही खासदाराने दाखविले नाही. उलट यापुढे विरोधी पक्षांच्या वतीने काढण्यात येणा-या मोर्चाला आम्ही जाणार नाही, असे सांगत नांगी टाकली होती.
यापूर्वी महाराष्ट्रात आणि केंद्रात शिवसेना भाजपासोबत सत्तेत होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचा शब्द हा अंतिम शब्द मानला जात होता. शिवसेनाप्रमुखांनी एखाद्या विषयावर भूमिका घेतल्यानंतर ते कधीही मागे घेत नसत. शिवसेनाप्रमुखांच्या काळात अशी नोटबंदी झाली असती आणि त्याविरोधात शिवसेनाप्रमुखांनी भूमिका घेतली असती, तर त्यांनी कधी पुन्हा माघार घेतली नसती. आता शिवसेनेचा अपमान केला जातो, तसा अपमान केला असता तर शिवसेनाप्रमुखांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असता, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला झापल्याचे वृत्त जवळपास सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात झळकले होते. ते शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्याबाबत आज शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी खुलासा केला आहे. ‘‘आम्हाला झापले नाही, तर माध्यमांनी विपर्यास केला’’ अशा आशयाचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.