महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी लागणार आहे.
मुंबई- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी लागणार आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर राज्यभरात निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
नांदेड, जळगाव, पुणे, यवतमाळ, सांगली-सातारा आणि भंडारा-गोंदिया या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले.
महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेतल्याने निवडणुकीत ९८.३६ टक्के मतदान झाले. या सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीच्या कालावधीतच भाजपा सरकारने ५०० आणि १००० रुपयांची नोटाबंदी जाहीर केली होती. त्यामुळे जनतेत उसळलेल्या असंतोषाचे पडसाद या निकालातून उमटतात का? याकडेही निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होऊ शकली नसल्याने भंडारा- गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच तिहेरी लढत झाली. काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन आणि भाजपाकडून परिणय फुके अशी लढत झाली.
नांदेडमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर राजूरकर विरुध्द भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे असा सामना होता. येथे काँग्रेसकडे अधिक संख्याबळ आहे.
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदान अनिल भोसले, काँग्रेसचे संजय जगताप आणि भाजपाचे अशोक येनपुरे अशी लढत झाली. तर जळगावात भाजपाचे चंदुलाल पटेल विरुध्द अॅड. विजय पाटील रिंगणात आहेत. सांगली-सातारामध्ये काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे शेखर गोरे, अपक्ष शेखर माने आणि मोहनराव गुलाबराव कदम असे चार उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे मोहनराव कदम हे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. तर शेखर गोरे हे माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत.
यवतमाळ मध्ये मात्र काँग्रेसचे शंकर बडे विरुध्द शिवसेना-भाजपा तानाजी सावंत असा थेट सामना होता. राष्ट्रवादीचे उमेद्वार विद्यमान आमदार संदीप बाजोरिया यांनी माघार घेऊन सावंत यांना पाठिंबा दिल्याने येथे राष्ट्रवादीबाबत उलटसुलट चर्चा आहे.