रेल्वे भाडेवाढीचा कोणताही दणका न देता केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी २०१४-१५साठी रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी लोकसभेत सादर केला.
नवी दिल्ली- रेल्वे भाडेवाढीचा कोणताही दणका न देता केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी २०१४-१५साठी रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी लोकसभेत सादर केला. पायाभूत प्रकल्पांसाठी थेट परदेशी गुंतवणुकीसह सार्वजनिक आणि खासगी उद्योगांच्या माध्यमातून रेल्वेला अधिक सक्षम करणारा अर्थसंकल्प गौडा यांनी सादर केला.
> जाणून घ्या रेल्वे अर्थसंकल्प २०१४-१५
अर्थसंकल्पात रेल्वे मंत्र्यांनी बुलेट रेल्वेची घोषणा केली. देशातील पहिली बुलेट रेल्वे मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. या यासाठी त्यांनी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सदानंद गौडा यांनी लोकसभेत सादर केला. यात नव्या भाडेवाढ धोरणानुसार रेल्वेला २०१४-१५ मध्ये १.६४ लाख कोटींचे उत्पन मिळण्याचा अंदाज असल्याचे गौडा यांनी सांगितले.यात त्यांनी गोवा- मुंबई, नागपूर- विलासपूर, नागपूर- सिंकदराबाद, नागपूर- कानपूर, दिल्ली- अमृतसर, दिल्ली- चंदीगड या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केली.
नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा पेक्षा रेल्वेतील सोयीसुविधांवर भर देणार असल्याचे गौडा यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. देशातील निवडक नऊ मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग १६० ते २०० किलो मीटर प्रति तास इतका ठेवणार असल्याचे गौड यांनी आपल्या भाषणात सांगितले.
गेल्या ३० वर्षात ६७४ पैकी ३१७ प्रकल्प पूर्ण झाले असून प्रलंबित प्रकल्पासाठी १,८२,००० कोटी रुपयांची गरज असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
देशात बुलेट रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात करणार, सर्व ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा देणार, पोस्ट ऑफीस आणि मोबाईल फोनवरुन तिकीट आरक्षणाची सुविधा विस्तारणार, रेल्वे स्थानक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवानांची भरती करणार असल्याची घोषणा गौडा यांनी केली.
देशातील प्रमूख शहरांना आणि धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी काही नव्या गाड्या सुरु करणार असून काही मार्गांचे सर्वेक्षण करणार असल्याची घोषणाही केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी लोकसभेत केली. तर कर्नाटकमधील गदग ते पंढरपूर या मार्गावर रेल्वे सुरु करणार असल्याची घोषणा गौडा यांनी केली.
दरम्यान, नव्या गाड्यांची घोषणा न केल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.
रेल्वे अर्थसंकल्प २०१४ मधील ठळक घडामोडी »»
» सर्व रेल्व स्थानकावर एफओबी, सरकते जिने आणि शौचालय
» मुंबईसाठी येत्या दोन वर्षात ८६४ लोकल गाड्या
» इंधनासाठी बायो डिझेलचा वापर
» रेल्वे स्थानकावर सोलर पॅनल बसवणार
» इशान्य भारतात २३ प्रकल्प
» दूध वाहतूकीसाठी विशेष रेल्वे धावणार
» देशभरात नव्या १८ मार्गासाठी सर्वेक्षण सुरु
» येत्या पाच वर्षात पेपर लेस रेल्वे कार्यालय, सर्व रेल्व स्थानकावर डिजीटल आरक्षण चार्ट बसवणार
» गोवा-मुंबई, नागपूर-विलासपूर, नागपूर-सिंकदराबाद, नागपूर-कानपूर या मार्गावर हायस्पीड रेल्वे
» दिल्ली-अमृतसर,दिल्ली-चंदीगड या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार
» सर्व ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा देणार
» मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा
» देशात बुलेट रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात करणार
» गदग (कर्नाटक) धार्मिक स्थळ ते पंढरपूर रेल्वे सुरु करणार
» नव्या भाडेवाढ धोरणानुसार प्रवासी भाड्यात वाढ करणार
» २०१४-१५ मध्ये १.६४ लाख कोटींचे उत्पन मिळण्याचा अंदाज
» ३,७०० कोटीच्या नव्या रेल्वे मार्गासाठी रेल्वेने ४१ हजार कोटी खर्च केले
» केवळ भाडेवाढीवर रेल्वेला अवलंबून राहता येणार नाही- रेल्वे मंत्री
» प्रवासी भाडेवाढीचा तोटा भरुन काढण्साठी मालवाहतुकीच्या भाड्यात वाढ
» ज्येष्ठ नागरिकांना फलाटावर सहज जाण्यासाठी रेल्वे स्थानकात सुविधा निर्माण करणार
» पोस्ट ऑफीस आणि मोबाईल फोनवरुन तिकीट आरक्षणाची सुविधा विस्तारणार
» रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी ७० हजार आरपीएफची जवानांची भरती करणार
» महिला डब्ब्याच्या सुरक्षेसाठी चार हजार महिला सुरक्षा रक्षकांची भरती करणार
» ५० स्थानकांवर स्वच्छतेचे काम आऊटसोर्स करणार, स्वच्छतेसाठी ४० टक्के रक्कम वाढवून देणार
» रेल्वे दरवाढ आवश्यक होती, दरवाढीमुळे आठ हजार कोटींनी उत्पन वाढेल
» बुलेट ट्रेनसाठी नऊ लाख कोटींची गरज
» दुपदरीकरण, त्रिपदीकरणाला पहिले प्राधान्य, त्यानंतर नवे रेल्वे मार्ग टाकण्याला देणार प्राधान्य
» रेल्वेच्या विकास प्रकल्पांसाठी ११,७९० कोटी बाजारातून उचलण्याचा प्रस्ताव
» दहा वर्षात जेवढे प्रकल्प मंजूर झाले त्यातील फक्त एक पूर्ण झाला
» पर्यायी उत्पन्नासाठी परदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न करणार
» रेल्वेचे ३५९ प्रकल्प प्रलंबित
» प्रथम प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य
» देशाच्या वाहतुकीत रेल्वेचा वाटा ३१ टक्के
» दररोज १२ हजार ५०० ट्रेन धावतात
» दररोज दोन कोटी ३० लाख नागरीक प्रवास करतात
» भारतीय रेल्वे अर्थव्यवस्थेचा आत्मा- रेल्वेमंत्री सदानंद गौडा
» भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी मालवाहतूक व्यवस्था
» प्रवासी आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देणार
» रेल्वे प्रतिक्षालय आणि अन्य सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर
» रेल्वेला प्रभावी आणि प्रवासीभिमुख बनवणार