पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात मंत्रिमंडळ फेरबदल केल्यानंतर महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात मंत्रिमंडळ फेरबदल केल्यानंतर महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिले. या विस्तारात काही मंत्र्यांना घराचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता असून काहींच्या कामात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. या विस्तारात कोणकोणत्या नव्या चेह-यांना संधी मिळणार, मित्र पक्षांना आणखी काही वाटा मिळणार का, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर सहकारनगरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडय़ात मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादमध्ये मराठवाडय़ातील प्रश्नांबाबत विविध क्षेत्रांतील नागरिकांना भेटून आढावा घेण्यात आला होता. रविवारी मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक होणार असल्याचे सांगितले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पावलावर पाऊल टाकत हा विस्तार होणार आहे.
प्रत्येक मंत्र्याचे काम पाहून बदल करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्र्यांना एक प्रश्नावली देण्यात आली आहे. या विस्तारात काही खाते बदल, तर काही नवीन चेह-यांना संधी मिळण्याची आशा आहे. मात्र, विस्तार नेमका कधी होणार याबाबत त्यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही.
या विस्तारात शिवसेनेचे दोन मंत्री पदे भरली जाण्याची शक्यता आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत त्यांचे समर्थक आग्रही आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत खडसे यांची भाषा सरकारविरोधात टोकदार झालेली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या कामावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांच्याबाबत काय निर्णय होतो हेही लवकरच समजणार आहे.
[EPSB]
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे शनिवारी दिली.
[/EPSB]