भाजपा ‘मेक इन इंडिया’च्या हवेत तरंगत आहे. वाजपेयींच्या काळात भाजपावर ‘इंडिया शायिनग’चे भूत चढले होते. तसाच हा मामला आहे. दोन वर्षापूर्वी मोदींची लाट होती. तिचा भाजपाला फायदा झाला. आता ती लाट नाही म्हणून सेनेने तलवार उपसायचे योजिले आहे. पण भाजपाला सारे कसे हिरवे हिरवे दिसते आहे.
येत्या ३१ ऑक्टोबरला म्हणजे चार महिन्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. लोकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन हे सरकार सत्तेत आले. अपेक्षापूर्ती तर सोडा, दररोज अपेक्षाभंगच जनतेच्या वाटय़ाला येत आहे. महागाई, शेतक-यांचे प्रश्न, दुष्काळ.. सरकार कधीही गंभीर दिसले नाही. चणे-फुटाणे देऊन भाजपाने शिवसेनेला सत्तेत सामील करून घेतले खरे, पण शिवसेनेने कधीही हे सरकार आपले मानले नाही. सत्तेची मलाई खाताना, तिने सरकारला झोडपणेही चालू ठेवले. खरे तर दिल्लीत आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतर, ती व्यवस्थित राबवणे हा भाजपा आणि शिवसेनेचा एकमेव अजेंडा असायला हवा होता. पण ‘इगो प्रॉब्लेम’मुळे सरकार भरकटत गेले. तुरीची डाळ २०० रुपये किलो झाली. भाज्या कडाडल्या. नोक-या आटल्या. तरुणांच्या हाताला काम नाही. मार्केट उठायला तयार नाही. लोकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आजचे ‘वाघ, सिंह’ रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यापेक्षा ‘युती हवी की नको’ हा त्यांना जीवन-मरणाचा प्रश्न वाटतो. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. शिवसेनेला ५० वर्षे झाल्यानिमित्ताने मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जंगी सभा केली. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये चर्छेचा फोकस काय होता तर, राज्यातील महापालिकेच्या येत्या निवडणुकांमध्ये युती करायची की नाही? लोकांच्या एकाही विषयाला कुणी हात घातला नाही. तीन वर्षाचा दुष्काळ. त्यात भर म्हणजे अजून पावसाचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत जनतेला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, यावर चर्चा करावी असे कुण्याही नेत्याला वाटले नाही. शिवसेनेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने युती नको, असे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी वेळ मारून नेली. महापालिका निवडणुकांना अजून आठ महिने बाकी आहेत. तोपर्यंत हे दोघे अशीच संभ्रमावस्था चालू ठेवतील. कार्यकर्त्यांना अंधारात ठेवणे कुठल्याही राजकीय पक्षाला आवडते. इथेही तेच सुरू आहे. नरेंद्र मोदींना मुंबई हवी आहे. त्यांना सेनेला संपवायचे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती होणार नाही. युती तुटल्याचा फोन करायला एकनाथ खडसे दिवाळीत मंत्रिमंडळात परतत आहेत. दोघेही स्वतंत्र लढतील. कुणाला बहुमत मिळाले नाही तर सरकारात बसले तसे महापालिकेत बसतील. राहिला प्रश्न सरकारचा. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार कोसळेल असे नाही. राष्ट्रवादी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहे. सत्तेची चटक लागलेल्या शिवसेनेला याचा अंदाज असल्याने सरकारमधून ती बाहेर पडणार नाही. आणखी तीन वष्रे सेनेची अशीच फरफट चालू राहील. सत्तेत राहायचे आणि विरोधी पक्षासारखे कचाकचा भांडायचे, अशी नौटंकी आहे. मराठी माणूस, हिंदुत्व हा फिल्मी मसाला आहे.
१९९५ मध्येही युती सरकार होते. तेव्हाही भांडणे होत. ती निपटवण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना मुंबईत यावे लागत असे. आताच्या भांडणांना मोदी किंवा अमित शहा हुंगत नाहीत. सामान्य माणसाचा जोर चालला तर तो ही युती आणि तिचे सरकार मुंबईच्या समुद्रात बुडवून निकाल लावतील. पण इथे जनतेला विचारतेय कोण? धर्म, भावनेचे मुद्दे उकरले की, लोक मते देतात, हे राजकीय पक्षांना छान ठाऊक आहे. ‘मराठी माणसे आपल्याशिवाय जातील कुठे?’ अशा गुर्मीत सेना आहे, तर भाजपा ‘मेक इन इंडिया’च्या हवेत तरंगत आहे. वाजपेयींच्या काळात भाजपावर ‘इंडिया शायिनग’चे भूत चढले होते, तसाच हा मामला आहे. दोन वर्षापूर्वी मोदींची लाट होती. तिचा भाजपाला फायदा झाला. आता ती लाट नाही, म्हणून सेनेने तलवार उपसायचे योजिले आहे. पण भाजपाला सारे कसे हिरवे हिरवे दिसते आहे. दोघेही कंटाळले आहेत. भांडणे आधीही व्हायची. पण ‘बेडूक’, ‘चुरनवाले बाबा’, ‘निजामाचे बाप’ असले शब्दप्रयोग प्रथमच ऐकू आले.
मुंबईतील ३६ आमदारांपैकी १७ आमदार भाजपाचे आहेत तर १३ शिवसेनेचे आहेत. त्यामुळे जागा वाटपात भाजपाला निम्म्यापेक्षा जास्त जागा हव्या आहेत. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत. त्यातल्या सव्वाशे जागा भाजपाला दिल्या तर मुंबई आपल्या हातून जाते हे शिवसेनेला पक्के ठाऊक आहे. १५० जागा लढवल्यानंतर सेनेच्या निम्म्या जागा निवडून येतात. जास्तीत जास्त जागा लढवल्या तरच जास्त जागा येतील, हे सूत्र सेना धरू पाहते आहे. ‘वेडीवाकडी युती करणार नाही’ असे उद्धव ठाकरे म्हणतात, ते या अर्थाने. गेल्या वेळी युती असताना २२७ पैकी भाजपाला ३० जागा मिळाल्या. एकटे लढल्यास दुप्पट घेऊ, असे भाजपाचे गणित आहे. दोघांनाही युती नको आहे. पण युती तोडल्याचे खापर दोघेही अंगावर घेऊ इच्छित नाहीत. युती तोडण्याचा निर्णय उलटला तर भाजपाचे फार काही बिघडणार नाही. पण भाजपाचे पत्ते सरळ पडले तर सेनेचे मरण आहे. कारण सेनेचा सारा जीव मुंबई महापालिकेत आहे. राज्य हवे की महापालिका? यापैकी एकाची निवड करायची झाली तर उद्धव ठाकरे महापालिका घेतील.
गेली २५ वर्षे ही महापालिका सेनेच्या ताब्यात आहे. तिथल्या कामांच्या ठेक्यांमध्ये सेनेचा जीव अडकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेची ही दुखती नस हेरली. रस्ते आणि नालेसफाईच्या कामातल्या घोटाळ्यांची चौकशी लावून त्यांनी सेनेला घेरले आहे. काँग्रेसच्या कुण्या मुख्यमंत्र्यालाही हे धाडस झाले नव्हते. सेनेला संपवले तर दिल्लीत वजन वाढते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सेनेची नाकेबंदी चालवली आहे. मुंबई हातची गेली तर सेनेची आíथक रसद तुटली म्हणजे सारेच संपले. सन्य पोटावर चालते आणि हल्लीचे राजकीय पक्ष पैशावर चालतात. म्हणून मुंबईची निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अग्निपरीक्षा आहे. ‘आपले सुरक्षाकवच’ म्हणून मुंबईकर सेनेकडे पाहत आले. पण आता शिवसेना पूर्वीची राहिलेली नाही. बाळासाहेबांची शिवसेना आक्रमकतेसाठी ओळखली जाई. ‘अरेला कारे’ म्हणणे, राडा संस्कृती आताच्या सेनेत अभावानेच दिसते. धाक, दरारा, दहशत कमी झाली आहे. अलीकडे तर सेना रस्त्यावर उतरणेही विसरली आहे. मुंबईत मराठी माणसाचा टक्काही कमी झाला आहे. त्यामुळे मराठी अस्मितेचे कार्डही आता चालणार नाही. सरकारात सामील होऊन सेनेने मोठी चूक केली, असे अनेक शिवसनिकांना वाटते. अशा हवेत सेनेला कोण वाचवणार? शत्रू चारही बाजूने उभा आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे मोजके अपवाद सोडले तर नेत्यांचीही फौज उरलेली नाही. विशेष म्हणजे बाळासाहेब नाहीत. राज ठाकरे यांची वेगळी सेना तलवारी पाजळते आहे. या पार्श्वभूमीवर परवाच्या सभेत स्पष्ट भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांना आतापासून वातावरणनिर्मिती करता आली असती. त्यांनी ती संधी गमावली. मोदींवर टीका करताना ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात, ही भानगड शिवसैनिकांनाही उमगलेली नाही. येत्या काळात उद्धव ठाकरे काय डावपेच लढवतात, ते पाहायचे.