मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणाबाबत राज्यात जनमत जागृत केले. आता त्याचे परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवरही दिसत आहेत.
नांदेड- मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणाबाबत राज्यात जनमत जागृत केले. आता त्याचे परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवरही दिसत आहेत. नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातील दोन गावांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा गावक-यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील नरंगल येथील गावक-यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. राज्य घटनेतील तरतुदीनुसार, मराठा समाजाला आरक्षण देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. आरक्षणासाठी राज्यात शांततापूर्ण मार्गाने लाखो लोक रस्त्यावर उतरले. राज्यातील सर्व जिल्ह्यांत क्रांती मोर्चे निघाले.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली. त्यानंतर राज्यभर चक्काजाम आंदोलने करण्यात आले. त्या वेळी मागण्याची निवेदने सादर करण्यात आली; परंतु सरकार आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊनही मराठा आरक्षणाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.
मराठा समाजाची मागणी मान्य करण्यासाठी कोणतीही सकारात्मक कृती करत नाही. त्यामुळे सर्व गावक-यांनी बैठक घेऊन एकमुखाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे माजी सरपंच श्रीहरी देशमुख यांनी सांगितले.
कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, शेतक-यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा, शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, याही मागण्या करण्यात आल्या. त्यालाही सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय उरला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील वाहेगाव (देमणी) येथील ग्रामस्थांनीही मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती उपसरपंच भगवान शिंदे यांनी दिली. सरकार मराठा समाजाकडे व मराठा समाजाच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाने निवेदनाद्वारे केलेली एकही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. लोकशाही समाज व्यवस्थेत सर्वसामान्यांच्या मागण्यांची दखल सरकार घेत नसेल तर कशासाठी मतदान करायचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.