मराठा आरक्षण आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असतानाही काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याने दुपारी हा बंद स्थगित केल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून मुंबईत करण्यात आली.
मुंबई- राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले असून त्यास काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असतानाही दुपारी हा बंद स्थगित केल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून मुंबईत करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. मोर्चेक-यांकडून शांतता राखण्याचे आवाहनही सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केले आहे. परंतू चेंबुरमध्ये बस पेटवली, काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि कळंबोलीत हवेत गोळीबार करावा लागल्याने सकल मराठा समाजाकडून पुकारलेला बंद स्थगित करण्यात आला आहे. तसेच मुंबई बंदला मुंबईकर आणि व्यापा-यांनी दिलेल्या प्रतिसादाबाबतही समन्वयकांनी आभार मानले.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळले होते.
नवी मुंबईत पोलिसांचा लाठीमार व हवेत गोळीबार
नवी मुंबईच्या कळंबोली येथे बंद दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने या दगडफेकीत पोलीस अधिक्षक संदीप पाटील जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करतानाच पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न करणा-या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळे कळंबोलीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
कळंबोलीमध्ये शेकडो मराठा आंदोलकांनी मोर्चा काढत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ठिय्या आंदोलन केले. काही आंदोलकांनी रस्त्यावरच टायर जाळल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे अनेक प्रवाशी रस्त्यातच अडकून पडले आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलीस अधिक्षक संदीप पाटील जखमी झाले. त्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांची गाडी फोडत या गाडीला पेटवून दिले. त्याशिवाय आंदोलकांनी रस्त्यावर जळते टायर फेकले. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यात पाच-सहा आंदोलक जखमी झाले. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाले आणि त्यांनी पुन्हा पोलिसांवर दगडांचा मारा सुरू केल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मुंबईत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचा या आंदोलनावर पहारा असून सोशल मीडियावरील प्रत्येक हालचाली सायबर सेलच्या रडारवर आहेत. सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांकडून विभागातील बारीक हालचालींवरही लक्ष ठेवले आहे. तसेच काही पोलीस साध्या वेशात या आंदोलनात सहभागी होत सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षही अलर्टवर आहे.
मानखूर्दमध्ये बेस्टची बस पेटवली
मानखुर्दमध्येही मराठा समाज रस्त्यावर उतरला असून मोहिते-पाटील नगरमध्ये आंदोलकांनी बसमध्ये पेट्रोलच्या बाटल्या फेकून बस पेटवण्यात आली. बस पेटवल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बसला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. कुर्ला आगाराची ५१७ क्रमांकाची ही बस आहे. ही बस सांताक्रुझवरून नेरूळला जात असताना मानखुर्द येथे दुपारी १.३० वाजता जमावाने पेटवली.
भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट
बंदच्या पार्श्वभूमीवर दादर आणि ठाणे भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या गाड्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांची कोंडी झाली आहे.
आणखी एका आंदोलकाचा मृत्यू
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान मंगळवारी विषप्राशन करणा-या औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (५५) यांचा आज मृत्यू झाला. आंदोलनातील हा दुसरा बळी असून त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. याआधी कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.
आंदोलकांचा ठाणे, जोगेश्वरीत रेल्वे रोको
ठाणे आणि जोगेश्वरीत आंदोलकांनी रेल्वे रोको करत सरकारविरोधातील संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी लोकल आणि एक्सप्रेसच्या गाड्यांवर चढून या गाड्या थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. तर काही आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवून लोकलवर दगडफेक केली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरू आहे.
मुंबई-ठाणे बंदची हाक दिल्यानंतर शेकडो मराठा तरुणांनी आज सकाळी ७.३० वाजता ठाण्याच्या तीन हात नाक्यावर मोर्चा काढला. हातातील भगवे झेंडे नाचवत आणि जोरजोरात घोषणाबाजी करत या आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत पूर्व द्रुतगतीमार्ग रोखून धरला. त्यामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. परिणामी या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलकांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.
मात्र नंतर या शेकडो आंदोलकांनी ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे रोको करत प्रवाशांची कोंडी केली. आंदोलकांनी ठाण्याहून कल्याणकडे जाणारी आणि सीएसएमटीहून आसनगावला जाणारी लोकल रोखून धरली. काही आंदोलकांनी ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणा-या धावत्या लोकल समोर जाऊन ही लोकल अडवली. सुदैवाने ही लोकल धीमी होती आणि नुकतीच सुरू झाली होती. त्यामुळे कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. आंदोलकांनी या तिन्ही लोकलच्या टपावर बसून जोरदार घोषणाबाजीही केली. तर काही आंदोलकांनी मनमाड-सीएसएमटी एक्स्प्रेसही अडवली. याचवेळी आंदोलकांनी लोकलवर दगडफेक केल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले.