तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडयावर यंदा वरुणराजाने चांगली कृपादृष्टी केली आहे.
औरंगाबाद- तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडयावर यंदा वरुणराजाने चांगली कृपादृष्टी केली आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे या विभागाने सहा वर्षात दुस-यांदा सरासरी गाठली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आली असून, त्यामुळे रब्बी हंगामात पिकांखालील क्षेत्र वाढणार आहे.
तीन वर्षांपासून मराठवाडयाकडे पावसाने पाठ फिरवली होती. दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मराठवाडयात आतापर्यंत सरासरी ९९.६७ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाडयाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७७९ मि.मी. इतके आहे. त्या तुलनेत विभागात आतापर्यंत ७७६ मि.मी. पाऊस झाला आहे. १३ वर्षांत २०१० हे मराठवाडयात सर्वाधिक पावसाचे वर्ष राहिले. तेव्हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के पाऊस झाला होता.
त्यानंतरची दोन वर्षे पुन्हा विभागात मोठी तूट होती. २०१३मध्ये ११० टक्के पाऊस झाला. पुढची दोन वर्षे पुन्हा सरासरी केवळ ५० ते ५५ टक्के एवढाच पाऊस झाला.विभागात रब्बी पिकांखालील सरासरी क्षेत्र २० लाख ७७ हजार हेक्टर एवढे आहे.
दोन वर्षात अपु-या पावसामुळे त्यातील निम्म्या क्षेत्रावरही पेरा झाला नव्हता. यंदा हे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत रब्बीचे क्षेत्र ८ लाख ६४ हजार एवढे आहे. ते ८ लाख ९९ हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाने रांगव धरणाला धोका
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील चिखली रांगव धरणाच्या बाजूचा डोंगर खचून धरणाच्या बाजूला आल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे. तसेच रिंग रोडवर मोठा मातीचा ढीग आला आहे.
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या धरणाला कालव्याचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना सिंचनाचे पाणी मिळू शकत नसताना आता थेट डोंगरच खचल्याने या धरणाचा धोका वाढला आहे.
महाराष्ट्र सरकार जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या देखरेखीखाली रांगव धरणाची उभारणी झाली. रांगव धरण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. धरणाचे काम पूर्णत्वास गेले असताना मुसळधार पावसाने धरणाच्या दोन्ही बाजूचा डोंगर खचला आहे.
देवघर प्रकल्प धरणाचे दरवाजे उघडले
कणकवली- देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर शनिवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील फोंडाघाट, लोरे आणि वाघेरी परिसरातील घरे, गोठे तसेच शेतीचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत महसूलने केलेल्या पंचनाम्यात या परिसरात सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदार भारतभूषण रजपूत यांची भेट घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच धरणाचे अतिरिक्त पाणी सोडत असताना बाधित होणा-या गावांना माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार रजपूत यांनी सांगितले.
या परिसरात दोन दिवस महसूल आणि पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी होते; परंतु अतिरिक्त पाऊस झाल्याने शनिवारी धरणाचे दरवाजे २५ सेमीने खुले केले होते. यामुळे नदीला पूरसदृशस्थिती निर्माण झाली.
जिल्हाधिकारी पातळीवर याबाबत निर्णय घेऊन १२ सेंमी दरवाजे खुले ठेवण्यात आले; मात्र रविवारी सकाळी ९ वाजता पाण्याचा अतिरित विसर्ग थांबवण्यासाठी दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, देवधर धरणाच्या अतिरिक्त पाण्याला सोडण्यासाठी सक्षम असे कालवे नसल्याने पाणी भातशेतीत घुसले. यामुळे फोंडाघाट परिसरात धोका निर्माण झाला होता.