म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे बुधवारी काढण्यात आलेल्या लॉटरीत ९७२ जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.
मुंबई- म्हाडाच्या बुधवारी काढण्यात आलेल्या लॉटरीत ९७२ जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे शहरातील विविध भागातील ९७२ घरांसाठीची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली. यंदाच्या सोडतीसाठी १ लाख ३६ हजार ४७७ अर्ज आले होते. त्यातील ९७२ विजेत्या अर्जदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
गगनाला भिडणा-या घरांच्या किमती पाहता स्वत:चे हक्काचे घर यंदा मिळेल का? अशी धाकधूक म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करणा-या लाखो अर्जदारांच्या मनाला लागून होती. अर्जदारांच्या मनावरील हे दडपण हलके करत, त्यांना स्फूर्ती देत आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात म्हाडाची यंदाची सोडत काढण्यात आली.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास रंगशारदा सभागृहात यंदाची सोडत काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे, सोडतीच्या देखरेख समितीचे कामकाज अध्यक्ष आणि माजी उपलोकायुक्त सुरेशकुमार, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, सहमुख्य अधिकारी चंद्रकांत डांगे आदी अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सकाळी ८ वाजल्यापासूनच रंगशारदा सभागृहाबाहेर अर्जदारांची लांबलचक रांग लागली होती. सोडतीतील मर्यादित आसनक्षमता पाहता सोडतीचे लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आले होते. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी दाखल झालेल्या अर्जावरूनच गरजूंची संख्या दिसून येत होती.
दरवर्षी निघणा-या म्हाडाच्या सोडतीला अर्जदारांचा मिळणारा प्रतिसाद आणि गरजुंची संख्या लक्षात घेता पुढच्या वर्षी तीन हजार घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी यावेळी सांगितले. यात गिरणी कामगारांच्या घरांचाही समावेश असेल असे ते म्हणाले.